‘सलामी स्लाईसिंग’ : जगाचा नकाशा बदलण्याचे चिनी षड्यंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

salami slaicing_1 &n


दुसर्‍या महायुद्धानंतर चीन ही एकमेव मोठी शक्ती आहे, जी इतर देशांच्या सीमारेषांमध्ये घुसखोरी करून सतत आपल्या सीमा वाढवत असते. भारत-चीनदरम्यान सीमा तणावाची परिस्थिती सोडविण्यासाठी लडाखमध्ये दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असताना जनरल बिपीन रावत यांनी चीनच्या ‘सलामी स्लाईसिंग’ रणनीतीविषयी भाष्य केले.


‘सलामी स्लाईसिंग’ म्हणजे काय?

खरंतर चीन ‘सलामी स्लाईसिंग’ या डावपेचाचा वापर अनेक वर्षांपासून करत आहे. पण, यामध्ये नेमके काय केले जाते? चीन जमिनीवर आणि समुद्रामध्ये हळूहळू, काही वेळा सांगूनही आपली सीमा पुढे सरकवतो. थोडी थोडी जमीन बळकवत राहतो. ‘सलामी स्लाईसिंग’चे, पुढे अजून मोठ्या ‘सलामी स्लाईसिंग’मध्ये रूपांतर केले जाते. अशाप्रकारे चीनने ‘अक्साई चीन’वरती पूर्णपणे कब्जा केला आहे आणि दक्षिण चिन समुद्रामध्ये ८० टक्के समुद्रावर आता चीनचे अधिपत्य आहे. सैन्याच्या भाषेमध्ये, ‘सलामी स्लाईसिंग’ या धोरणात बर्‍याच छोट्या कृती केल्या जातात. जमीन बळकवत राहणे, धमकावणे, ऐतिहासिक किंवा इतर पुरावा देऊन नवीन प्रदेश ताब्यात घेणे, पुन्हा पुन्हा निष्फळ चर्चा करत राहणे असा खेळ खेळला जातो. सीमा विवाद कधीच सोडवला जात नाही. कारण, अजून जास्त जमीन बळकावणे जास्त महत्त्वाचे असते.


गोळी न झाडता, नकाशा बदलला...

जमिनी सीमांवरती चीनने या डावपेचाचा वापर भारत, नेपाळ, भूतान, पाकिस्तान या देशांच्या विरुद्ध केलेला आहे. नेपाळमध्ये चीनच्या बाजूने असलेले कम्युनिस्ट सरकार असूनसुद्धा नेपाळमध्ये चीनने जमीन बळकावली आहे. समुद्रामध्ये दक्षिण पूर्व आशियामधील सगळ्या देशांच्या ‘एक्सक्लुझिव्ह इकोनॉमिक झोन’मध्ये चीनने ‘सलामी स्लाईसिंग’द्वारे प्रवेश केलेला आहे. ‘सलामी स्लाईसिंग’ केल्यानंतर दुसर्‍या राष्ट्राला चीन वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव देतो. अनेक प्रकारची दमदाटी करून आपण केलेली घुसखोरी त्यांना मान्य करायला भाग पाडतो. जर त्या देशाचा दबाव फारच वाढला, तर जिथे चार पावले आत आले होते, तिथून ते दोन पावले मागे जातो. जसे भारताच्या बाबतीत घडले. परंतु, काही घुसखोरी ही कायमची होऊन जाते. भारत हा एकुलता एक देश आहे, ज्याने चिनी ‘सलामी स्लाईसिंग’ला लष्करीरीत्या थांबवण्याचा प्रयत्न केला आणि चीनला गलवान खोर्‍यात, पेगाँग त्सो तलावाच्या दक्षिण किनार्‍यावर आणि कैलाश पर्वतावर एक मोठा धक्का दिला. मात्र, ही हिंमत इतर कुठल्याही देशाने दाखवलेली नाही. ‘सलामी स्लाईसिंग’ केलेल्या भागात चीन नंतर अजून नवीन दावे तयार करतो.


आता ६५० गावे चीन भारत, भूतान आणि नेपाळच्या सीमांजवळ निर्माण करत आहे. आधी कुठेही लोकसंख्या राहत नसलेल्या सीमांवर नवीन गावे वसवली जात आहेत, ज्यामध्ये तिबेटचे नागरिक आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरिता चिनी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते इथे वसवले जातील. नंतर या नागरिकांना आपल्या जनावरांना घेऊन पुढच्या भागात घुसखोरी करायला सांगितले जाते आणि असा दावा केला जातो की, ही चराऊ जमीन ऐतिहासिक दाव्याप्रमाणे आमचीच आहे, म्हणजे एक ‘सलामी स्लाईसिंग’च्या पुढे पुन्हा एकदा दुसरी ‘सलामी स्लाईसिंग’ केली जाईल. ‘सलामी स्लाईसिंग’मध्ये सीमा हळूहळू पुढे गेल्यामुळे कुठलाही देश एकदम लढाई करायला तयार नसतो. ‘हायब्रीड युद्धा’चा वापर करून चीन जगाला या सीमांवर लष्करी पर्याय वापरण्यापासून थांबवतो. म्हणजे लढाई न करता, एकही गोळी न झाडता चीनने अनेक देशांच्या जमिनी सीमांचा नकाशाच बदलला आहे. एवढेच नव्हे, तर हेच डावपेच चीन यापुढे मध्य आशिया आणि रशियाच्या बाबतीतही वापरणार आहे.

‘सलामी स्लाईसिंग’ दक्षिण चीन समुद्रामध्येही

‘सलामी स्लाईसिंग’चे डावपेच मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण चीन समुद्रात सुद्धा वापरले जात आहेत. ‘सलामी स्लाईसिंग’बरोबर अपप्रचार, दुष्प्रचार, मानसिक युद्ध, धमक्या देऊन देशांना घाबरवणे, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा गैरवापर करणे, हेसुद्धा केले जाते. दक्षिण चीन समुद्रामध्ये ‘चिनी कोस्ट गार्ड’च्या मदतीने मच्छीमार बोटी घेऊन पुढे सरकतो आहे. हेच वेगवेगळ्या समुद्री भागांमध्ये केले जात आहे. परंतु, केवळ ‘सलामी स्लाईसिंग’ केलेल्या भागामध्ये गस्त घालून किंवा पेट्रोलिंग करून आपली सीमा पुढे सरकणार नाही, हे माहीत असल्याने तिथे कायमचे वर्चस्व प्रस्थापित करणे गरजेचे आहे. समुद्रामध्ये गावांच्या ऐवजी कृत्रिम बेटे तयार केली जात आहेत. उदाहरणार्थ, खडकांवर भर टाकून तिथे कृत्रिम बेटांची निर्मिती केली जाते आणि नंतर तिथे स्वतःच्या मिलिटरी पोस्ट निर्माण करणे, शस्त्रांना तैनात करणे किंवा कृत्रिम हेलिपॅड किंवा विमानांच्या धावपट्ट्या तयार करणे, असे प्रकार सुरू आहेत. दक्षिण चीन समुद्रात ‘सलामी स्लाईसिंग’चे डावपेच वापरून चीनने आपल्या समुद्री सीमा पुष्कळ पुढे नेल्या आहेत.

चीनने कृत्रिम बेटांवरती मानव वस्ती स्थापन करणे, भाज्या लावणे, मच्छीमारांना तिथे वेळोवेळी आणणे, असे धंदे सुरू केले आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने समुद्रामध्ये दोन नवीन जिल्हे प्रस्थापित केले आणि त्यांची नावे आहेत आणि पारसल आणि स्पार्टली, जे याआधी इतर देशांच्या ताब्यात होते. चीनने लगेच कायदा पारित करून आपल्या ‘कोस्ट गार्ड’ म्हणजे तटरक्षक दलाला कायदेशीररीत्या या समुद्रामध्ये आलेल्या इतर देशांच्या बोटीवर फायरिंग करण्याचे अधिकार दिलेले आहेत.थोडक्यात, चीनने शस्त्रांचा वापर न करता, बंदुकीचा वापर न करता ‘सलामी स्लाईसिंग’च्या द्वारे जगाविरुद्ध एक नवीन प्रकारचे युद्ध छेडले आणि त्याला प्रत्युत्तर देणे भारत सोडून इतर कुठल्याही देशाला जमलेले नाही. भारताचे सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले आहे की, “आम्ही चीनच्या ‘सलामी स्लाईसिंग’ डावपेचांना पराभूत करू. परंतु, सगळ्या देशांच्या सीमांवर त्यांचे सैन्य तैनात नसल्यामुळे ‘सलामी स्लाईसिंग’ थांबवणे तितकेसे सोपे नाही.”

काय करावे?


या ‘सलामी स्लाईसिंग’च्या डावपेचांना थांबवायचे असेल, तर दक्षिण चीन समुद्रामधल्या सगळ्या देशांना आपल्या सीमांवर आपली सुरक्षादल किंवा तटरक्षक दलाची तैनाती खूप जास्त वाढवावी लागेल, तरच अशा प्रकारची घुसखोरी थांबवता येईल. परंतु, जी जुनी घुसखोरी झाली आहे त्याचे काय? तिथून चीनला कसे परत पाठवणार? म्हणूनच दक्षिण चीन समुद्रातील सगळ्या देशांना एकत्रित येऊन ‘क्वाड को-ऑपरेशन’सारखे मजबूत ‘सैनिकी एकजूट’ तयार करावी लागेल, ज्यामुळे एकत्रित कारवाई करून चिनी ‘सलामी स्लाईसिंग’ थांबवण्यात या देशांना यश मिळेल. त्यांना एकत्रित करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. कारण, चाणाक्याने म्हटल्याप्रमाणे ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो’ म्हणून या देशांना मदत करून भारत चीनला ‘टू फ्रंट’ लढाई लढण्यास भाग पाडू शकतो.

@@AUTHORINFO_V1@@