राष्ट्रीय नौकानयन दिवस : ५ एप्रिल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

vicharvimarsh_1 &nbs


दि. ५ एप्रिल हा ‘राष्ट्रीय नौकानयन दिवस’ आहे. आपल्याला डिसेंबरचा पहिला सप्ताह हा ‘नौदल सप्ताह’ म्हणून माहीत आहे. तशीच ५ एप्रिलची प्रसिद्धी होणं आवश्यक आहे.


आपला भारत देश हा समुद्रवलयांकित आहे. आपल्या देशाच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीची लांबी आहे ७,५१६ किलोमीटर. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचा, त्याच्या किनार्‍यापासून पुढे २०० सागरी मैल इतक्या अंतरापर्यंतचा, समुद्रातला आणि हवेतला प्रदेश हा रीतसर त्या देशाच्या मालकीचा असतो. या हिशोबाने भारताची एकंदर किनारपट्टी २३ लाख, ५ हजार, १४३ चौ.किमी इतक्या लांबीची आहे. म्हणजेच भारत हा एक ‘दर्यावर्दी’ देश आहे; तरीही आज भारताच्या जनमानसात सर्वात दुर्लक्षित विषय जर कोणता असेल, तर तो म्हणजे नौकानयन. आज अत्याधुनिक जगात व्यापारी मालवाहतुकीसाठी रेल्वे, रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध आहे. त्या मार्गांनी मालवाहतूक होतेदेखील. पण, सर्वात स्वस्त वाहतूक म्हणजे नौकानयनच. तरीही त्याबाबत समाजामध्ये प्रचंड अज्ञान आहे.

माझा स्वतःचा सख्खा मामा ‘नेव्ही’मध्ये ‘कॅप्टन’ होता. पांढर्‍या शुभ्र पोषाखात डोक्यावर ‘पीकॉक कॅप’ घालून तो जेव्हा टॉक-टॉक बूट वाजवत घरी येई, तेव्हा आम्हा भाचवंडांना कोण आनंद होत असे. पण, ‘तू नेमकं काय काम करतोस?’ असं त्याला मोठ्या माणसांपैकी कुणी कधी विचारल्याचं मला तरी आठवत नाही. १९८०च्या आसपास केव्हातरी मी स्वतः गो. नी. दांडेकरांचं ‘दर्याभवानी’ आणि दि. वि. गोखले यांचं ‘पहिले महायुद्ध’ ही दोन पुस्तकं लागोपाठ वाचली आणि हल्लीच्या साहित्यिक भाषेत बोलायचं, तर मला एकदम ‘युद्धभान’ आलं. वेगवेगळ्या युद्धांवरची पुस्तकं शोधून-शोधून मी त्यांचा फडशा पाडत सुटलो. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या लोकांमध्ये कुणी निवृत्त किंवा सेवारत सैनिक आहेत का, याचा शोध घेऊ लागलो आणि मला एकदम धक्काच बसला. अरे, खुद्द मामाच ‘कॅप्टन’ आहे की!

मी अत्यंत उत्सुकतेने त्याला भेटलो. त्यावेळी तो पश्चिम किनार्‍यावरच्या एका छोट्या बंदरात, मुख्य बंदर अधिकारी म्हणून कार्यरत होता. ‘मामा, मला सांग की, १९६५ आणि १९७१च्या भारत-पाक युद्धांमध्ये तू कोणकोणत्या जहाजांवर होतास? तुला प्रत्यक्ष ‘अ‍ॅक्शन’मध्ये भाग घ्यायला मिळाला का?’ मी उत्सुकतेने प्रश्नांची फैर झाडली. ‘तुला कुणी सांगितलं मी ‘नेव्ही’त होतो म्हणून?’ मामाने मिश्किलपणे मला प्रतिप्रश्न केला. ‘म्हणजे काय? आम्ही कित्येकदा तुझ्याबरोबर आलोय की ‘भाऊच्या धक्क्या’वर किंवा ‘बॅलार्ड पिअर’ला तुझी बोट बघायला. तुझ्या कॅप्टनच्या केबिनमध्ये पण बसलोय,” मी लहानपणीचे ते प्रसंग आठवत आश्चर्याने म्हणालो. “अरे बाळा, ‘नेव्ही’चे दोन प्रकार असतात. एक ‘डीफेन्स नेव्ही’ म्हणजे लढाऊ नौदल आणि दुसरा ‘मर्चंट नेव्ही’ म्हणजे व्यापारी नौदल. यापैकी मी ‘मर्चंट नेव्ही’मध्ये होतो. त्यामुळे मी युद्धात असण्याचा प्रश्नच नव्हता.” खो-खो हसत मामा उत्तरला. माझी उत्सुकता केळीच्या सालावरून घसरावं, तशी धाडकन खाली आपटली. व्यापारी नौदल म्हणजे फक्त विविध प्रकारच्या मालाची ने-आण. त्यात तोफा, बंदुका, पाणबुड्या, विमानवाहू नौका यांची घनचक्कर लढाई नाही, म्हणजे काही गंमतच नाही.

यातला ‘मी’ हा प्रातिनिधिक धरला, तर एकंदर हिंदू समाजाची हीच स्थिती आहे. लष्करी नौकानयन काय नि व्यापारी नौकानयन काय, कुणालाच कसलीही धड माहिती नाही. माहिती करून घ्यावी, अशी इच्छाही नाही, हे जास्तच वाईट. मुळात व्यापारी नौदलाला म्हणजे व्यापार करण्यासाठी तर्‍हेतर्‍हेचा माल घेऊन एका बंदरातून दुसर्‍या बंदराकडे जाणार्‍या जहाजांच्या काफिल्याला संरक्षण देण्यासाठी लढाऊ नौदलाची निर्मिती झाली. व्यापारी जहाजांना मुख्य धोका असायचा तो अन्य प्रतिस्पर्धी व्यापार्‍यांकडून किंवा त्याहीपेक्षा म्हणजे चाचे लोकांकडून. चाचे म्हणजे समुद्रावरचे डाकू, लुटारू, दरोडेखोर.

आधुनिक काळात म्हणजे इ. स. १६०० साली लंडनमध्ये ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’ची स्थापना करून इंग्रजांनी नौकानयनाला संघटित रूप दिलं. म्हणजे ‘ईस्ट इंडिया’ कंपनीची व्यापारी जहाजं स्वतःच्या किंवा इतर खासगी व्यापार्‍यांच्या मालाची ने-आण करत, प्रवाशांची ने-आण करत, तर कंपनीची लढाऊ जहाजं या व्यापारी किंवा प्रवासी जहाजांच्या काफिल्यासोबत राहून त्यांचं संरक्षण करीत असत. इंग्रजांप्रमाणेच भारत आणि आग्नेय आशियातील अन्य देशांसोबत मोठा व्यापार करणार्‍या ‘फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी’, ‘डच ईस्ट इंडिया’ कंपनी यासुद्धा होत्याच. अधिकृतरीत्या या कंपन्यांचा त्या-त्या देशातील सत्ताधार्‍यांशी काही संबंध नसून त्या खासगी मालकीच्या कंपन्या होत्या. या सगळ्यांपेक्षा व्यापार आणि लढाऊ शक्ती या दोन्ही दृष्टींनी त्यावेळी पोर्तुगीज जास्त प्रबळ होती. ते खासगी कंपनीचा बुरखा न घेता उघड-उघड आपल्या राजाच्या नावाने व्यापार, लढाया आणि जोरदार बाटवाबाटवी करीत होते.

पुढे मराठ्यांनी सिद्दी आणि पोर्तुगीज यांचे सामर्थ्य संपवले. इंग्रजांनी फ्रेंच आणि डच यांना संपवले. अखेर इंग्रजांनी मराठ्यांना संपवले आणि पूर्वेकडचं संपूर्ण नौकानयन इंग्रजांच्या ताब्यात आलं. भारतीय व्यापार्‍यांचा समुद्री व्यापार एकतर खूपच मर्यादित होता आणि युरोपीय दर्यावर्दींप्रमाणे संघटित तर तो कधीच नव्हता. परिणामी, ‘इंग्रजी ईस्ट इंडिया’ कंपनीने जेव्हा संपूर्ण भारत जिंकला, तेव्हा स्वतः ‘ईस्ट इंडिया’बरोबरच इतर काही जहाज कंपन्या भारतीय नौकानयन व्यवसायावर घट्ट पकड ठेवून होत्या. त्यापैकी काही कंपन्या एकच होऊन सन १८३७ साली एक जबरदस्त कंपनी निर्माण झाली. तिचं नाव ‘पेनिन्शूलर अ‍ॅण्ड ओरिएंटल स्टीम नेव्हिगेशन कंपनी’ किंवा लोकप्रिय नाव ‘पी अ‍ॅण्ड ओ’ सन १८५६मध्ये ‘पी अ‍ॅण्ड ओ’च्या जोडीला आणखी एक जबरदस्त जहाज कंपनी आली- ‘ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी’ किंवा ‘बी.आय.’ पुढच्याच वर्षी म्हणजे १८५७ साली भारतीय क्रांतिकारकांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ उर्फ ‘कंपनी सरकार’ विरुद्ध क्रांतीचा वणवा पेटवला. तो असफल झाला. १८५८ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने कंपनी सरकारचा बुरखा फेकून देऊन भारतावर रीतसर व्हिक्टोरिया राणीचं राज्य सुरू असल्याचं घोषित केलं.

मात्र, भारतातून बाहेर जाणारा माल किंवा बाहेरून भारतात येणारा माल हा ‘पी अ‍ॅण्ड ओ’ आणि ‘बी. आय.’ याच कंपन्यांच्या मार्फत नेला-आणला जाई. म्हणजेच भारताच्या व्यापारी नौकानयनावर इंग्रजांचीच पूर्ण पकड होती आणि या व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी खुद्द ‘ब्रिटिश रॉयल नेव्ही’ सन १८६३ पासून तैनात करण्यात आली. पुढे १८९३ मध्ये खास भारतीय नौकानयन मार्गांच्या संरक्षणसाठी ‘रॉयल इंडियन मरिन’ असं एक छोटं लढाऊ नौदल निर्माण करण्यात आलं. पोर्तुगीजांनी सन १५३४ मध्ये वसई जिंकली. लवकरच त्यांच्या असं लक्षात आलं की, स्थानिक कारागीर हे युरोपीय कारागिरांपेक्षाही अधिक कुशल आहेत. पोर्तुगीजांनी आगाशी या विरारनजीकच्या गावात जहाजबांधणी कारखाना सुरू केला. इथे बांधलेली भक्कम जहाजं युरोपात जाऊ लागली. इंग्रजांनी सन १६१२ मध्ये सुरतमध्ये वखार उघडली. त्यांनाही हाच अनुभव आला. सुरतच्या स्थानिक कारागिरांनी बांधलेली उत्कृष्ट जहाजं युरोपात जाऊ लागली. १६६५ मध्ये इंग्रज मुंबईला आले. सन १७३६ मध्ये त्यांनी आपला सुरतेचा प्रमुख मिस्त्री लवजी नसरखानजी वाडिया यालाच मुंबईला आणलं. पुढच्या काळात ‘वाडिया शिपबिल्डर्स’नी ‘ईस्ट इंडिया’ कंपनीसाठी शेकडो उत्कृष्ट जहाजं बांधली.


परंतु, ही सगळी बुद्धिमत्ता, हे कौशल्य फुकट होतं. प्रबळ इंग्रज धन्याला आणखी प्रबळ करण्यासाठी गुलाम भारतीयांची ही सगळी गुणवत्ता खर्ची पडत होती. सैनिकी नौदल पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात होतं, यात आश्चर्य नव्हतं. परंतु, व्यापारी नौदलावरदेखील पूर्णपणे त्यांचीच पकड होती. कुणाही भारतीय व्यापार्‍याला नौकानयन कंपनी काढायला इंग्रज सरकारची परवानगीच नव्हती मुळी. इंग्रज फार फार सावध होते. त्यांना मनोमन माहीत होतं की, ‘हे भारतीय म्हणजे हिंदू लोक खरं पाहता सर्वच बाबतीत आपल्याला भारी आहेत. ज्या क्षेत्रात त्यांना मोकळीक द्याल, त्यात ते बघता-बघता आपल्या पुढे निघून जातील. रेल्वे आम्हाला भारतात आणायची नव्हती. पण, त्या नाना शंकरशेटजींमुळे नाईलाज झाला. आता समुद्र हे मात्र खास आमचंच क्षेत्र आहे. आमची मक्तेदारी आहे. तिथे आम्ही या हिंदूंना घुसू देणार नाही.’

इंग्रजांच्या या धोरणाला पहिल्या महायुद्धाने धक्का दिला. १९१४ ते १९१८ या कालखंडात जर्मनीबरोबर झालेलं हे महायुद्ध ब्रिटन-फ्रान्स-अमेरिका या दोस्त राष्ट्रांनी जिंकलं. पण, ब्रिटनची या युद्धात अतोनात हानी झाली. फार मोठ्या संख्येत मनुष्यबळ आणि संसाधनं नष्ट झाली. त्यामुळे इंग्रजांना नाईलाजाने भारतीयांना व्यापारी नौकानयन कंपनी स्थापन करण्याची परवानगी द्यावी लागली. ही सुवर्णसंधी साधली वालचंद हिराचंद दोशी या द्रष्ट्या उद्योगपतीने. दोशी घराणं मूळचं गुजरातमधल्या वांकानेरचं. कित्येक पिढ्यांपूर्वी ते सोलापूरला स्थायिक झाले. तिथे ते कपडा उद्योग आणि सावकारी करीत असत. वालचंद हा मात्र वेगळा माणूस होता. पिढ्यान्पिढ्यांचा धंदाच फक्त न करता ते रेल्वेबांधणी व्यवसायात उतरले. आजचे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरचे खंडाळ्याच्या घाटातले बोगदे वालचंदशेटनी बांधलेले आहेत. तानसा तलावापासून मुंबई शहरापर्यंतचे अजस्त्र नळ वालचंदशेटनी टाकलेले आहेत.

१९१४ मध्ये युरोपात महायुद्ध सुरू झालं, तेव्हा भारतीय संस्थानिकांनी आपापली सैन्यदलं इंग्रजांच्या मदतीला पाठवली. ग्वाल्हेर संस्थानच्या शिंदे महाराजांनी तर कमालच केली. कॅनडा पॅसिफिक स्टिमशिप कंपनीचं ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ हे प्रवासी जहाजच त्यांनी विकत घेतलं. त्याचं रुपांतर हॉस्पिटल शिपमध्ये केलं आणि ‘लॉयल्टी’ असं त्याचं नवं नाव ठेवून सैनिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी ते इंग्रजांकडे सुपूर्द केलं. १९१८ साली महायुद्ध संपल्यावर ‘लॉयल्टी’चा उपयोग संपला. वालचंद हिराचंदनी १९१८ मध्ये शिंदे सरकारकडून ते जहाज विकत घेतलं. नरोत्तम मोरारजी आणि किलाचंद देवचंद या आपल्या मित्रांना बरोबर घेऊन एक ‘नौकानयन’ कंपनी काढली. शिंदे सरकारचा मान ठेवण्यासाठी तिला नाव दिलं- ‘दि सिंदिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी.’ आधुनिक भारताची पहिली पूर्णपणे स्वदेशी नौकानयन कंपनी. भारताच्या पूर्व किनार्‍यावरील चोल आणि पांड्य, पश्चिम किनार्‍यावरील चेर, विजयनगर आणि हिंदवी स्वराज्य या सागरी सत्तांच्या अस्तानंतर उदयाला आलेली पहिली संघटित व्यापारी पूर्णपणे भारतीय कंपनी.आणि या कंपनीचं पहिलं जहाज ‘स्टिम शिप लॉयल्टी’ ५ एप्रिल, १९१९ रोजी मुंबईहून लंडनकडे माल घेऊन निघालं. ‘पी अ‍ॅण्ड ओ’ नि ‘बी. आय.’ यांच्या नाकावर टिच्चून एक भारतीय कंपनी समुद्री व्यापारात उतरली.म्हणून दि. ५ एप्रिल हा ‘राष्ट्रीय नौकानयन दिवस’ आहे. आपल्याला डिसेंबरचा पहिला सप्ताह हा ‘नौदल सप्ताह’ म्हणून माहीत आहे. तशीच ५ एप्रिलची प्रसिद्धी होणं आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@