राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते आक्रमक
अल्पेश करकरे (मंत्रालय प्रतिनिधी) : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झालेले दिसले. विरोधी पक्षाने राज्य सरकारच्या कामांचा खरपूस समाचार घेतला. तसेच इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदार आज सायकलनं विधीमंडळात पोहचले. आणि ही कॉंग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ मीडिया इव्हेंट असल्याटी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे, नाना पाटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसने केलेले आंदोलन राज्यसरकार विरोधात असावे असे मतंही यावेळी त्यांनी व्यक्त केले. तसेच यवतमाळ दुर्घटनेबाबत बोलताना 'या प्रकरणातलं खरं- खोटं आता मुख्यमंत्र्यांनीच सांगावं' असा टोलाही लगावला. वीजपुरावठा खंडित करण्याचा प्रयत्न म्हणजे, ठाकरे सरकारची मोगलशाही असाही स्पष्ट आरोप फडणविसांनी केला. मुख्य म्हणजे वरळीतील पब पार्टीची धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर "वरळीचे लोक लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे ऐकतात, कोरोनाबाबतचे कोणतेही नियम पाळत नाहीत." असं म्हणत फडणविसांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. "कोरोना फक्त शिवजयंतीला असतो का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले, "मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार काहीच का करत नाही? या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा." आणि त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. "विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी वैधानिक विकास महामंडळ घोषित करू" असं पवार यांनी स्पष्ट केलं.