शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात भाजप आक्रमक !

१ नोव्हेंबर रोजी भाजपचे १ लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावणार

    30-Oct-2021
Total Views |

keshav upadhey_1 &nb


भाजपचे १ लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावणार; भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली माहिती


मुंबई:
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अल्प मदत देणाऱ्या ठाकरे सरकारच्या काळ्या कारभाराच्या निषेधार्थ येत्या १ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करतील, असे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रदेश पॅनेलिस्ट प्रेरणा होनराव उपस्थित होत्या.
 
 
गेल्या दोन वर्षांपासून वादळे, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या हाती सरकारी मदतीचा एक पैसादेखील पडलेला नसल्याने राज्यातील शेतकऱ्याची सरकारने फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या या संतापात सहभागी होऊन त्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
 
उपाध्ये यांनी सांगितले की, ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच राज्यात निसर्ग वादळामुळे वाताहत झाली. हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि पुढील किमान दहा वर्षे पुन्हा उभे राहता येणार नाही अशी अपरिमित हानी झाली. या शेतकऱ्यांकरिता ठाकरे सरकारने मदतीची जोरदार घोषणाबाजीही केली. पण त्या मदतीचा पैसा वर्षानंतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच स्पष्ट झाले. मदत का मिळाली नाही याची माहिती घेतो, असे बोलघेवडे आश्वासन देऊन मुख्यमंत्री ठाकरे मुंबईत परतले, पण मंत्रालयाकडे मात्र फिरकलेच नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यास न्याय मिळालाच नाही.
 
 
सेलिब्रिटींच्या बचावासाठी सरकारमधील मंत्र्यांची कारकिर्दपणाला लावून त्यांच्यासाठी कामे बाजूला ठेवून किल्ला लढविणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का, असा सवालही उपाध्ये यांनी केला.
१३ ऑक्टोबरला ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींच्या मदतीचा गाजावाजा केला. अजूनही त्यापैकी एक पैसाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला नाही. केवळ संकटग्रस्त भागांचे दौरे करणे आणि मदतीच्या घोषणा करणे यात काही अर्थ नाही असे खुद्द मुख्यमंत्रीच म्हणाले होते. त्यांना आपल्या या वाक्याची आठवण असेल व थोडीशी जरी लाज असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीमधून किती शेतकऱ्यांना लाभ झाला, कोणाकडे पैसा पोहोचला, याचा संपूर्ण राज्याचा तपशील जनतेसमोर उघड करावा असे आव्हान उपाध्ये यांनी दिले.
 
 
 
महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांवर बलात्कार, अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. महिलांना न्याय देण्यासाठी सरकारने वेळोवेळी केलेल्या घोषणांचे काय झाले, कोणत्या उपाययोजना अंमलात आल्या आणि किती गुन्हेगारांना कोणत्या शिक्षा झाल्या, हेदेखील जाहीर करण्याची हिमत ठाकरे सरकारने दाखवावी, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत खंडणी वसुली आणि टक्केवारीपलीकडे कोणतेही विकास काम किंवा जनहिताची कोणतीही योजना न आखणाऱ्या व कोणत्याही योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या निष्क्रिय सरकारच्या निषेधार्थ काळ्या फिकी लावून आंदोलन करणारे कार्यकर्ते जागोजागी सरकारला जाब विचारतील, व काळ्या कारभाराचे वाभाडे काढून जनतेसमोर सरकारचे स्वार्थी रूप उघड करतील असेही उपाध्ये यांनी नमूद केले.