वित्तीय नियोजनाची पंचसुत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2020   
Total Views |

budget_1  H x W
 

 
कंपन्या असोत की व्यक्ती असोत, वित्तीय नियोजन हे महत्त्वाचेच. वित्तीय नियोजनाचा विचार करताना आपण आपली मराठी म्हण ‘अंथरुण बघून पाय पसरावे’ ही लक्षात घ्यावी. सध्याच्या सतत दबाव आणणार्‍या ‘मार्केटिंक’च्या जमान्यात आपल्याला सर्व माध्यांवर पैसे उडविण्याच्या जाहिरातीच जास्त दिसतात यांचा ही परिणाम मानवी मनांवर होतो. तेव्हा, नेमके कसे करावे हे वित्तीय नियोजन त्याची आज थोडक्यात माहिती घेऊया.
 

१. बजेटची आखणी

 

प्रत्येकाने मासिक व वार्षिक अशी दोन ‘बजेट’ तयार करावयासच हवीत. आपले उत्पन्न किती? संभाव्य खर्च किती व शिल्लक किती? या ‘बजेट’ला अनुसरुन जर, आर्थिक व्यवहार केले, तर आर्थिक गाडा बर्‍याप्रकारे चालू शकेल. जर ‘बजेट’ केलेले नसेल, तर बर्‍याच अनावश्यक गोष्टी खरेदी केल्या जातात. ‘कोरोना’ने आपल्याला एक चांगला धडा दिला आहे, तो म्हणजे योग्य खर्च व जरुरीपुरता खर्च. ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे जनतेच्या अनावश्यक खर्चावर बराच आळा बसला आहे. मात्र, उद्या ‘कोरोना’ गेल्यावरही ही आर्थिक शिस्त पाळणे तितकेच गरजेचे आहे.

 

२. विम्याचे नियोजन

 

भारतीयांच्या विमा खरेदीच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात अशी माहिती समोर आली आहे की, भारतीय लोकांचे जीवनविमा उतरविताना योग्य नियोजन नसते. सुरक्षिततेच्या दृष्टीने जीवन विम्याचे संरक्षण हवे. पण, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या गरजेनुसार विमा पॉलिसीची निवड करावयास हवी आणि आपल्याकडे तीच नेमकी बरेचदा केली जात नाही. जीवनविमा व्यवहारांत ‘मिस सेलिंग’ (गरज नसेलेली पॉलिसी विकत घेणे) फार मोठ्या प्रमाणावर होतो. विमा एजंट व्यक्ती त्यांना चढ्या दराने ‘कमिशन’ मिळेल, अशाच पॉलिसी गिर्‍हाईकांना उतरायला आग्रह करतात व त्यांच्या आग्रहाला बळी पडून बर्‍याच विमाधारकांकडे त्यांना गरज नसलेल्या नको त्या पॉलिसी असतात.

 

एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी की, गुंतवणूक म्हणून विमा पॉलिसीत गुंतवणूक करु नये. कुठल्याही विमा पॉलिसीत कधीही विमाधारकाला सहा टक्क्यांहून अधिक परतावा मिळत नाही. याहून अधिक परतावा मिळणारे व सुरक्षित असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. साधारणपणे उत्पन्नाच्या दहा पट रकमेचा विमा उतरवावा. समजा, एखाद्याचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये असेल, तर त्याने 50 लाख रुपयांचा विमा उतरवावा. आरोग्यविमा मात्र, जितक्या जास्तीत जास्त रकमेचा उतरविता येईल तेवढा उतरवावा. कारण, भविष्यात कोणत्या व्याधींनी आपले ग्रस्त होऊ, याची शाश्वती आज देता येत नाही. दुर्दैवाने, भारतात आरोग्य क्षेत्राच्या नाड्या प्रामुख्याने खासगी आस्थापनांच्या हातात असल्यामुळे व वैद्यकीय खर्चात सातत्याने वाढ होत असल्यामुळे आरोग्य विमा मात्र, जास्तीत जास्त रकमेचा घेणे चांगले. बहुतेक व्यक्ती युनिट संलग्न इन्शुरन्स योजनेतील (जो ‘युलिप’ म्हणून ओळखला जातो) ‘अ‍ॅण्डॉव्हमेन्ट’ किंवा ‘कॅश-बॅक’ योजनांमध्ये विनाकारण गुंतवणूक करतात. कारण, या योजना एकतर खर्चिक असतात व दीर्घमुदतीच्या असतात. याऐवजी अन्य बरेच पर्याय उपलब्ध असूनही भारतात युलिपधारकांचे फार मोठे प्रमाण आहे. जीवनविम्याचा करार हा दीर्घकालीन असतो म्हणून कोणतीही जीवनविमा पॉलिसी घेताना घिसडघाई करु नये. पूर्ण विचारांतीच ती घ्यावी, तर कित्येक लोकांकडे जीवनविम्याचे संरक्षण पुरेसे नसते. जीवनविम्याचा पुरेशा व योग्य रकमेचा ‘टर्म प्लान’ विकत घेणे, हा आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने योग्य निर्णय ठरु शकतो.

 

३. अडचणीच्या वेळेसाठी तयार नसणे

 

कोणाच्या आयुष्यात कधी अडचणीची वेळ येईल, हे सांगता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतातच. अशावेळी पैशांची गरज लागू शकते. बर्‍याच जणांची यासाठी तरतूद नसतेच, हे पूर्णत: चुकीचे आहे. अडचणीच्या वेळेसाठी आर्थिक नियोजन हे करावयास हवे! कोरोनामुळे सध्या कित्येकांना पगार मिळत नाही. कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. कित्येकांना अर्धा पगार मिळत आहे, अशावेळी ज्यांचे अडचणीच्या वेळेसाठी आर्थिक नियोजन नसेल, त्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पना करा. आपल्या देशात सरकारनेच सर्व करावे, अशी चुकीची संकल्पना घेऊन लोक वावरतात. सरकारची कर्तव्ये जरुर आहेत पण, ती एका मर्यादेपर्यंत. प्रत्येकाला चमच्याने भरविणे हे सरकारचे काम नाही. प्रत्येकाकडे आणीबाणीच्या परिस्थितीत पुढील दोन महिन्यांचा खर्च करता येईल, इतक्या रकमेची तरतूद हवी. जर अशी तरतूद नसेल, तर त्यांना चढ्या दराने कर्जे घ्यावी लागतात व त्यामुळे ती व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकली जाते किंवा गुंतवणुकीतून बाहेर पडते व ज्या भविष्यातील उद्देशाने गुंतवणूक केलेली असेल, तो उद्देश सफल होईलच, याची खात्री उरत नाही. अगोदर गुंतवणूक तज्ज्ञांचे असे म्हणणे होते की, सहा महिन्यांचा खर्च चालू शकेल इतकी रक्कम सहज पैसे मिळणार्‍या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवावी. बँकांच्या मुदत ठेवी यात गुंतवणुकीतून सहज बाहेर पडता येते. गुंतवणूक रक्कम पूर्ण किंवा काही प्रमाणात पटकन हातात येऊ शकते. पण, कोरोनामुळे आता गुंतवणूकतज्ज्ञ म्हणतात की, पुढील १२ महिन्यांच्या खर्चाची जी रक्कम असेल ती सहज पैसे मिळणार्‍या गुंतवणूक योजनांत गुंतवावी.

 

४. योग्य गुंतवणूक करा

 

भारतीयांना बचत करायला आवडते, पण बचत करणे व गुंतवणूक करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आयुष्यात शक्य असेल तितक्या लवकर गुंतवणुकीत सुरुवात करावी. कित्येक व्यक्ती ४० वर्षानंतर गुंतवणुकीचा विचार करतात. हा आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने चुकीचा निर्णय असतो. जेवढी तुमची गुंतवणूक जास्त, तेवढे म्हातारपण सुखकारक! निदान आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या हा वेगळा भाग. सर्वप्रथम कोणाच्या तरी सांगण्यावरुन गुंतवणूक करु नका. गुंतवणूक करताना तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक करीत आहात, त्या योजनेची संपूर्ण माहिती करुन घ्या व ही गुंतवणूक करणे तुम्हाला गरजेचे आहे काय? लाभदायक आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाल्यानंतरच गुंतवणूक करा. तुमच्या कमी कालावधीच्या व दीर्घ कालावधीच्या गरजा लक्षात घेऊनच गुंतवणूक करा.

 

५. म्युच्युअल फंड्सचा पर्याय

 

लोकांची हल्ली म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे पावले वळू लागली आहेत. विशेषत: ‘सिस्टिमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’ (एसआयपी) मध्ये गुंतवणूक वाढत चालली आहे. याबाबतीतही म्युच्युअल फंड कंपन्या तुमचा पैसा कोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतविणार आहेत, त्याची माहिती करून घ्या. गरज पडल्यास या विषयातील तज्ज्ञांचे मत नक्की विचारात घ्या. Bit.ly/2CAhpg7 या वेबसाईटवर ५० चांगल्या म्युच्युअल फंडांची माहिती तुम्हाला मिळू शकेल.

 

तसेच, गुंतवणूक करताना ‘नॉमिनेशन’चा तक्ता नक्की भरावा. फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक असल्यास मृत्युपत्र/ इच्छापत्र करावे, नाहीतर गुंतवणूकदारांच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसांना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे योग्य तितकी आणि योग्य तिथे गुंतवणूक करा. गुंतवणुकीचे कायद्याने ठरविलेले सर्व सोपस्कर पूर्ण करा. यशस्वी गुंतवणूकदार व्हा, मन:स्ताप झालेले गुंतवणूकदार होऊ नका. मनस्ताप व्हावा म्हणून मुद्दाम कोणी चुकीची गुंतवणूक करीत नाही, पण गुंतवणूक करतेवेळी योग्य काळजी न घेतल्याने नंतर मात्र मन:स्ताप होऊ शकतो. कधी कधी प्रारब्धाचाही भाग असतो. उदाहरण द्यायचे तर पीएमसी बँकेचे ग्राहक, सिटी को-ऑप बँकेेचे ग्राहक व अन्य बँकांचे ग्राहक बँक सुस्थिर असताना त्यांनी गुंतवणूक केली असणार. पण त्यांना कोठे माही होते की, या बँकांचे संचालक फसवणूक करु शकतात. याला गुंतवणूकदाराने आपले प्रारब्ध समजायचे. पण, प्रारब्ध म्हणून सोडूनही द्यायचे नाही, तर योग्य काळजी घ्यायची, दक्षता बाळगायची.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@