कर्करोग आणि विमा संरक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2020   
Total Views |

medivclaim_1  H



२०१८ साली सुमारे ७ लाख, ८० हजार व्यक्ती एकट्या कर्करोगाने मृत्युमुखी पडल्या. यापैकी ४ लाख, १ हजार पुरुष होते, तर ३ लाख, ७ हजार महिला होत्या, अशी माहिती ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रीव्हेन्शन अ‍ॅण्ड रिसर्च’ या संस्थेने जाहीर केली आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी भारतात प्रचंड खर्च होतो व तो खर्च सर्वांनाच परवडेल, असा निश्चितच नाही. परिणामी, भविष्य आपल्याला जरी माहिती नसले तरी प्रत्येकाने कर्करोगासाठीचे विमा संरक्षण अवश्य घ्यावे. त्याविषयी आज सविस्तर जाणून घेऊया...



सर्वसमावेशक मेडिक्लेम पॉलिसी - (Comprehensive Medical Policy) विमाधारकाने ही पॉलिसी जितक्या रकमेची उतरवलेली असेल, त्या रकमेपर्यंत एकूण दाव्याची रक्कम त्यासाठी असलेल्या नियमांनुसार संमत होऊ शकते. कर्करोगासाठी असलेल्या ‘मेडिक्लेम पॉलिसी’मध्ये, सर्वसमावेशक ‘मेडिक्लेम पॉलिसी’पेक्षा जास्त फायदे मिळू शकतात आणि गंभीर आजारांसाठीची (क्रिटिकल इलनेस) पॉलिसी घेतल्यास, यात कर्करोेगाशिवाय अन्य गंभीर आजारांचा दावाही संमत होऊ शकतो. सध्या देशात आरोग्य विमा पॉलिसी (मेडिक्लेम) विकणार्‍या, सार्वजनिक उद्योगातील आणि खासगी उद्योगातील मिळून एकूण १६ कंपन्या आहेत. यापैकी नऊ कंपन्यांकडे फक्त कर्करोगाला संरक्षण देणार्‍या पॉलिसी आहेत. पाच कंपन्यांकडे गंभीर स्वरुपाच्या आजारांना संरक्षण देणार्‍या पॉलिसी असून या पॉलिसींमध्ये कर्करोगाचे संरक्षण समाविष्ट आहे.


३० वर्षांच्या व्यक्तीने जर दहा लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण घेतले तर त्याला सर्वसमावेशक मेडिक्लेम पॉलिसीसाठी सुमारे ११ हजार रुपये इतकी रक्कम विम्याचा प्रीमियम म्हणून भरावी लागेल. फक्त कर्करोगाला संरक्षण देणार्‍या पॉलिसीसाठी रुपये तीन हजार ५०० रुपयांपर्यंत प्रीमियम भरावा लागेल, तर गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या पॉलिसीसाठी सुमारे चार हजार प्रीमियम भरावा लागेल. विमा उतरविताना जेवढे वय जास्त, तेवढी साहजिकच ‘प्रीमियम’ची रक्कमही जास्त. नियमित आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसीवर हॉस्पिटलमध्ये खर्च झालेल्या रकमेपैकी नियमांप्रमाणे काही रकमेचा दावा संमत केला जातो. ज्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, त्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी उपचारावर झालेला खर्च, तसेच हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठराविक दिवसांसाठी उपचारावर झालेला खर्च, या सर्व खर्चाचा दावा संमत होऊ शकतो. गंभीर स्वरुपाच्या आजारांसाठी असलेल्या पॉलिसीत तज्ज्ञ डॉक्टरांकडून आजाराचे निदान झाले की, रुग्णाला उतरविलेली विम्याची रक्कम पूर्ण दिली जाते. विशिष्ट आजारांसाठीची पॉलिसी घेतानाच, ती कोणत्या गंभीर स्वरुपाच्या आजारासाठी घेत आहोत, ते फॉर्मवर स्पष्ट करावे लागते. जर हृदयरोगासाठी पॉलिसी घेतलेली असेल, तर कर्करोगासाठी संरक्षण मिळणार नाही. यासाठी सर्व प्रकारचे गंभीर स्वरुपाचे आजार पॉलिसी घेतानाच, पॉलिसीत समाविष्ट करून घ्यावेत. यात रोगाचे निदान झाल्यावर दावा म्हणून एकदाच पूर्ण रक्कम मिळते.


‘अपोलो मुनीच हेल्थ इन्शुरन्स कंपनी’ची ‘आयकॅन’ ही पॉलिसी आहे. यामध्ये नियमित आरोग्य विमा, तसेच गंभीर स्वरुपाच्या आजारांना संरक्षण हे दोन्ही समाविष्ट करण्यात आले आहे. या पॉलिसीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागत नाही. पॉलिसीचा कालावधी तहहयात असतो. परिणामी, प्रीमियम अधिक भरावा लागतो. ‘टीअर २’ शहरांत, स्तनाच्या कर्करोगासाठी सुरुवातीस तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो व पुढील उपचारासाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. स्तनाच्या कर्करोगाच्या उपचाराच्या प्रत्येक सायकलसाठी ४० ते ४५ हजार रुपये खर्च येतो. फुप्फुसाच्या कर्करोगासाठी सुरुवातीला महिन्याला चार ते सहा हजार रुपये खर्च येतो. नंतर पुढील उपचारांसाठी तीन ते चार लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. तोंडाच्या कर्करोगासाठी तीन ते चार लाख खर्च येतो, तर शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपी या उपचारांसाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. रोग वाढलेला असेल, तर केमोथेरपीच्या सहा सायकलींसाठी ६० हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एवढा खर्च करणे सामान्यांना शक्य होऊ शकते काय? त्यामुळे विमा संरक्षण घेण्याशिवाय काहीही पर्याय नाही. भारतात होणार्‍या कर्करोगांपैकी ४७.२ टक्के कर्करोग पुरुषांना तोंडाचा, फुप्फुसाचा, पोटाचा, आतड्याचा व अन्ननलिकेचा होतो, तर महिलांना तोंडाचा (ग्रामीण भारतात महिलांचे तंबाखू खाण्याचे प्रमाण फार मोठे आहे.) गर्भाशयाचा, फुप्फुसाचा गॅस्ट्रोक होतो.




गंभीर स्वरुपाच्या आजाराची पॉलिसी कर्करोगाच्या पुढील पातळ्यांसाठी योग्य ठरते. कर्करोगासाठी विशिष्ट पॉलिसी आजाराच्या सर्व पातळ्यांवर योग्य ठरते. जर कुटुंबात कर्करोग, (हा संसर्गजन्य नाही) हृदयरोग, मेंदूचा आजार असा इतिहास असेल, तर अशांनी गंभीर स्वरुपाच्या आजारासाठीची पॉलिसी घ्यावयास हवी. चाळीशी ओलांडलेल्या महिलांनी व पंचेचाळीशी ओलांडलेल्या पुरुषांनी फक्त कर्करोगासाठी असलेली पॉलिसी घ्यायला प्राधान्य द्यायला हरकत नाही. नेहमीच्या सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसीत कर्करोगासाठी काही ‘एक्सक्लुजन क्लॉज’ असतात. (म्हणजे त्यात नमूद केलेल्या कारणांसाठी दावा संमत होणार नाही.) म्हणून ही पॉलिसी उतरविताना हे ‘एक्सक्लुजन क्लॉज’ समजून घ्यावेत, नाहीतर दावा दाखल केल्यावर अपेक्षाभंग होणार नाही. उदाहरणच द्यायचे तर ‘स्टार हेल्थ अ‍ॅण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनी’ त्यांच्या ‘स्टार हेल्थ गेन इन्शुरन्स पॉलिसी’ या ‘ओरल केमोथेरपी’चा खर्च देत नाही. त्यामुळे पॉलिसी निवडताना, ज्या कंपनीच्या पॉलिसीत कमीत कमी ‘एक्सक्लुजन क्लॉज’ असतील, अशा कंपनीचीच पॉलिसी विकत घ्यावी. जर परदेशात उपचार घ्यावयाचे असतील, तर गंभीर स्वरुपाच्या आजाराची पॉलिसी घ्यावी. कारण, यात एकदम रक्कम हातात मिळते. ती परदेशी चलनात रुपांतरित करून, परदेशात उपचार घेताना उपयोगी पडू शकते.




आरोग्य विमा पॉलिसीची मुदत एक वर्ष असते. मुदतपूर्ती पूर्वीच काही दिवस पॉलिसीचे नूतनीकरण करावे. नियमाने मुदतपूर्तीनंतर एक महिन्याच्या आत पॉलिसीचे नूतनीकरण करण्यात येते. पण, या मुदतपूर्तीनंतर व नूतनीकरणापर्यंतच्या कालावधीत आजार उद्भवला, तर त्या खर्चाचा दावा संमत होणार नाही. कारण, त्या कालावधीत पॉलिसी कार्यरत नव्हती. मुदतपूर्तीनंतर एक महिन्यानंतर पॉलिसीचे नूतनीकरण होत नाही. तरी पॉलिसी काढावी लागते व जुन्या पॉलिसीचे काहीही फायदे मिळत नाहीत. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या वेळेपासून २४ तासांच्या आत विमा कंपनी व टीपीए यंत्रणेला कळवायला हवे. ऑनलाईनही यासंबंधी सूचित करता येते. हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचे अगोदर ठरले असेल, अकस्मात हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले नसल्यास, विमा कंपनी व टीपीएला आगावू कळवावे. याला ‘इंटिमेशन नोटीस’ देणे असे म्हणतात. या नोटीसमध्ये काय काय तपशील द्यावा लागतो, याची माहिती ‘पॉलिसी डॉक्युमेंट’मध्ये दिलेली असते. नियमाप्रमाणे ठरवून दिलेल्या वेळेत न कळविल्यास, तांत्रिक मुद्द्यावर दावा असंमत होण्याचे प्रमाण फार मोठे आहे. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर नियमाप्रमाणे ठरलेल्या दिवसांच्या आतच (किती दिवसांच्या आत ते पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये नमूद केलेले असते.) दाव्याचे पेपर्स टीपीएला सादर करावयास हवेत, नाहीतर तांत्रिक मुद्द्यावर विम्याचा दावा असंमत होऊ शकतो. आरोग्य विमा ही बाब संवेदनशील आहे, हे नेहमी ध्यानात ठेवून कुठलाही नियम न तोडता कार्यवाही करत राहणे गरजेचे आणि पॉलिसीधारकाच्या हिताचे आहे.




भारतात सध्या ‘ओल्ड एज कॅन्सर’चे प्रमाण वाढले आहे. जसे कोरोनाचा प्रादुर्भाव उतारवयातील लोकांना होण्याचा धोका जास्त संभवतो, तसा उतारवयात कॅन्सर होण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे. उतारवयातील बर्‍याच व्यक्तींचे उत्पन्नाचे स्रोतही नसतात. म्हणून मध्यम वयातच किंवा तरुणपणापासूनच योग्य रकमेचा आरोग्य विमा उतरवावा. भारतात कर्करोगांवरील उपचार इतके महाग आहेत की येथील राजकारणी, सेलिब्रिटीसुद्धा परदेशात जाऊन कर्करोगावर उपचार घेतात. त्यांना किती खर्च येत असेल, याची कल्पनाही करवत नाही. शिवाय आरोग्य विम्याची जी प्रीमियम रक्कम भरली जाते, ती रक्कम आयकर सवलतीसही पात्र असते, हे ही लक्षात असू द्या.

@@AUTHORINFO_V1@@