ठाणे : 'मला मरण पत्करावे लागले तरी मी मरायला तयार आहे', पण व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्याविरोधात निकराने लढण्याच निर्धार अनंत करमुसे यांनी केला आहे. रविवारी मध्यरात्री १२ वाजता पोलीस ठाण्यात चल, असे सांगून करमुसे यांना पोलीस राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले. बंगल्यावर २५ जणांच्या गटाने करमुसे यांना पोलीसांसमोर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. ही लढाई केवळ माझी नाही तर व्यक्तीस्वातंत्र्य असणाऱ्या प्रत्येकाची आहे, ती मी लढणारच, असा ठाम निर्धार करमुसे यांनी केला आहे.
रविवारी रात्री बारा वाजता पोलिस ठाण्यात चल, असे सांगून करमुसे यांना पोलिस त्याच्या राहत्या घरातुन उचलतात, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन जातात आणि त्यांना तिथे २५हुन अधिक गुंड पोलिसांसमोर त्यांना मारहाण करतात. लॉकडाऊनच्या परिस्थितीत असा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर करमुसे धीर एकवटून पोलिस ठाण्यात आले मात्र, पोलीसांनी त्यांच्याविरोधातच तक्रार केली. कायदयाची पायमल्ली आणि मंत्रीपदाचा गैरवापर करत वैचारिक विरोधकाला दंडुकेशाहीने गप्प करण्याचा प्रकार रविवारी रात्री ठाण्यात घडला असुन आता याविरोधात सगळीकडे निषेध व्यक्त होत आहे.
राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या दबावातून हा प्रकार घडला असल्याचा आरोप करमुसे यांनी केला आहे. आव्हाडांच्या बंगल्यात तरूणाला मारहाण करीत असलेले तरूण व या सगळ्यांना आदेश देणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ठाण्यात होत आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आव्हाड यांनी त्याविरोधात ट्विट, व्हीडिओ, व्हॉटसअप मॅसेज करून पंतप्रधानाच्या आवाहनाची खिल्ली उडवली. आव्हाडांच्या या भुमिकेचा वैचारिक विरोध करत ठाण्यातील अनंत करमुसे यांनी एक पोस्ट शेअर केली. करमुसे यांना रविवारी रात्री पोलिसांनी घरातून पोलिस ठाण्यात चल, असे सांगून घरातून बाहेर बोलवले आणि आव्हाड यांच्या विवियाना मॉल शेजारील बंगल्यावर नेले.
तेथे आव्हाड उपस्थित होते. त्यांनी 'त्या तरूणाला तू का लिहीले विचारेल असता, तुम्ही मंत्री असुन पंतप्रधानाच्या विरोधात लिहीतात तर मी तुमच्या विरोधात भूमीका घेतली तर माझे काय चुकले, असा प्रतिप्रश्न केला. त्यानंतर बंगल्यातील पंचवीसहून अधिक गुंडांनी अनंतर करमुसे यांना बेदम मारहाण केली. त्यातीलच एका गुंडाच्या फोनवरून अनंत करमुसे यांच्या घरी फोन लावुन करमुसे यांची पोस्ट हटवण्यास सांगण्यात आले. मारहाणी नंतर पोलिसांनी करमुसे पोलिस ठाण्यात गेले. मात्र, पोलीसांनी करमुसे यांच्या विरोधातच तक्रार दाखल केली आहे. करमुसे यांना उपचारासाठी नेण्यानंतर पुन्हा करमुसे यांनी पोलिसात येऊन घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरला. अपहरण, संचारबंदीचा कायदा मोडणे, जिवे मारहाण करणे अशा कलमाखाली करमुसे यांनी तक्रार दाखल केली. गेली दोन दिवस पोलिसांनी हे प्रकरण दाबुल ठेवले होते अखेर करमुसे यांच्या आग्रही भुमिकेमुळे आज पोलिसांनी पंचनामा केला. करमुसे यांच्या सोसायटीचे सिसीटिव्ही फुटेजसह सर्व पुरावे नोंदविण्यात आले आहेत.
'घरात तीन वर्षांची एक व एक १४ वर्षांची मुलगी आहे तसेच रात्री बारा वाजता जर पोलिस ठाण्यात घेऊन गेलात तर पत्नी तणावाखाली येईल.' अशी विनंती केली असतांनाही १० मिनिटात परत सोडतो असे खोटे सांगुन पोलिसांनी करमुसे यांना पोलिस गाडीतुन पोलिस स्टेशनमध्ये न नेता थेट जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले व तेथे त्याच्या उपस्थितीत करमुसे यांना मारहाण झाली आणि पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतली.
निरंजन डावखरे यांनी घेतली भेट
ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल, असे आमदार निरंजन डावखरे यांना आश्वासन देले असुन आमदार व भाजपा ठाणे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी करमुसे यांची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणालाही संरक्षण न देता कडक कारवाई करावी अशी मागणी आता ठाण्यातुन होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात लक्ष पिडीत तरूणाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सांगितले.
''मोदी तुझा बाप लागतो का?''
मंत्री असुन तुम्ही पंतप्रधानांवर टिका करता मग आम्ही तुमच्या केली तर काय असे तरूण म्हणतो मोदी तुझा बाप लागतो का, असे बोलत आमदार आव्हाडांच्या बंगल्यातील गुंडांनी अनंत करमुसे यांना बेदम मारहाण केली, असा आरोप करमुसे यांनी केला आहे.
प्रसंगी मरणही पत्करेन !
'ही लढाई केवळ माझी नाही तर व्यक्ती स्वातंत्र्याची आहे. मी चुकलो असेल तर कायद्याने शिक्षा द्यावी पण केवळ वैचारिक विरोधापोटी रात्री बारा वाजता मंत्र्याच्या बंगल्यावर होत असलेली मारहाण कुठल्याही कायदयात बसते. आम्ही निकराने हा लढा लढणार. सामान्य माणसाचे व्यक्ती स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भले मला मरण पत्करावे लागले तरी मी मरायला तयार आहे असा निर्धार अनंत करमुसे यांनी व्यक्त केला.