सरकारची जबाबदारी पूर्ण करण्यातून व त्यातल्या त्रुटी वा उणिवांसाठी नित्यनेमाने माफी मागून मोदी पुढे चालले आहेत. जे काही होते, त्याचे श्रेय सामान्य कर्मचारी अधिकारी इत्यादिकांना देतात आणि सहकार्यासाठी जनतेचेच मुक्तपणे आभार मानतात. पण, ते आभार विरोधकांना मिळून श्रेयही विरोधकांनी मिळवण्याची संधी गमावली आहे. म्हणून त्याला ‘कर्मदरिद्रीपणा’ म्हणावे लागते.
माझा एक समाजवादी मित्र आहे आणि अर्थातच तो पुरोगामी व कट्टर मोदीविरोधक आहे, हे वेगळे सांगायला नको. मार्च महिन्यात कोरोनाच्या बंदोबस्ताच्या हालचाली सुरू झाल्या, तेव्हा त्याची आरंभीची प्रतिक्रिया योग्य होती. ‘जनता कर्फ्यू’साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आवाहन केल्याचे आपल्याला स्मरत असेल. त्याला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर संध्याकाळी देशाच्या कानाकोपर्यातून लोकांनी टाळ्या व थाळ्यांच्या गजरात आपल्या आरोग्यसेवक व सार्वजनिक कर्मचार्यांना अभिवादन केले. तेव्हा त्याने दिलेली प्रतिक्रिया बोलकी व उत्स्फूर्त होती. बाकी सगळे पुरोगामी विश्लेषक पत्रकार टाळ्या व थाळ्यांची टिंगलटवाळी करण्यात मशगुल असताना, या समाजवादी पत्रकार मित्राची प्रतिक्रिया नेमके भाष्य करणारी होती.
“२०२४च्या लोकसभेनंतर मोदीचं पुन्हा पंतप्रधान होणार,” अशी त्याची प्रतिक्रिया होती. कारण, त्याला जनमानस कळते आणि जो प्रतिसाद टाळ्या व थाळ्यांनी दिला, ती कोट्यवधी मते असल्याचे त्याला पूर्णपणे भान होते. त्या निव्वळ टाळ्या नव्हत्या, तर कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतरच्या भारताने व्यक्त केलेले ते मत होते, हे त्याला समजलेले होते. भले तो मोदीविरोधक वा मोदीद्वेष्टा असेल, पण त्याला मतांची जाण आहे आणि लोकशाहीत विचारधारेपेक्षा जनमताला मोल असते. त्यावर लोकशाहीचा डामडौल चालतो, इतकी जाणीव त्याला आहे. म्हणूनच त्याने तेव्हा देशभर वाजलेल्या टाळ्या व थाळ्यांचा नेमका अर्थ लावला होता. हीच जनता व तिचे इतके अफाट समर्थन देशाला कुठल्याही संकटातून बाहेर काढू शकणार आहे. मात्र, त्याचे एकहाती श्रेय मोदी घेऊन जाणार, हेच त्या मित्राचे खरे दुखणे होते. कारण, त्या टाळ्या नव्हत्या, तर कोरोनाच्या संकटकाळातला आपला प्रेषित उद्धारक तारणहार मोदीच असल्याच्या भूमिकेवर कोट्यवधी जनतेने केलेले ते शिक्कामोर्तब होते. मग मोदीभक्त वा समर्थक नसूनही त्याने अशी प्रतिक्रिया कशाला दिलेली असावी?
त्या समाजवादी मित्राची ती नुसती प्रतिक्रिया नव्हती किंवा त्याने केलेले ते मोदींचे अभिनंदन नव्हते. त्याने वेगळ्या शब्दात मोदी विरोधकांची केलेली ती हजामत होती. त्याला मोदींच्या यशाचा आनंद झाला नव्हता, तर देशभरचा सामान्य नागरिक पुन्हा एकदा मोदींच्या आहारी जात असल्याची ती वेदना होती. त्याहीपेक्षा मोठी बाब म्हणजे, त्याच्या विचारांचे कडवे मोदी विरोधक आत्महत्या करीत असल्याचे बघून त्याचा जीव व्याकुळला होता. अठरावी लोकसभाही हातून निसटल्याचे ते दु:ख होते. कारण, मोदींनी अशा आवाहन व कृतीतून काय साध्य केले, त्याचा नेमका अंदाज त्याला आलेला आहे. जेव्हा अशा कुठल्या मोठ्या संकटातून देश बाहेर पडतो व त्यासाठी सर्वस्वाने झटतो, तेव्हा खराखुरा त्याग सामान्य जनताच करीत असते. बांगला युद्ध व पाकिस्तानचा १९७१सालचा दणदणीत पराभव करायला इंदिराजी स्वत: रणभूमीवर लढायला गेलेल्या नव्हत्या.
पण, त्यांनी देशाच्या जनतेला आवाहन केले व सैन्याच्या पाठीशी आणून उभे केलेले होते. त्या युद्धाची किंमत व झळ सामान्य जनतेनेच सोसली होती. हौतात्म्य सामान्य सैनिकानेच पत्करले होते. पण, त्या विजयाचा तुरा इंदिराजींच्या मुकूटात झळकला होता. कारण, त्या युद्ध वा संकटात इंदिराजी देशाचे व पर्यायाने सैन्याचेही नेतृत्व करीत होत्या. अशा कालखंडात यश मिळवणार्या नेत्याकडे सामान्य जनता ‘प्रेषित’ वा ‘देवदूत’ म्हणून बघू लागते, हा मानवी स्वभाव आहे. आज अवघ्या जगाला कोरोनानामक महामारीच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी जे प्रयास चालू आहेत. त्यात हाल, त्रास व अडचणीचा मोठा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतो आहे. पोलीस वा डॉक्टर्स व परिचारिका वगैरे जीव धोक्यात घालून राबत आहेत. मग मोदी काय करीत आहेत? तर त्यांना धीर वा हिंमत देऊन लढायला, झुंजायला प्रवृत्त करीत आहेत. पर्यायाने सगळ्यांचे लक्ष देशाच्या पंतप्रधानाकडे आहे आणि सगळ्या आशा त्याच एका माणसाकडून बाळगल्या जात आहेत. त्यात आणखी कोणाला भागीदार होता आलेच नसते का?
साधी सरळ गोष्ट आहे. शरद पवार किंवा त्यांच्यासारखे विविध पक्षातले अनेक ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत. त्यांच्या गाठीशी प्रशासनापासून आपत्ती निवारणाचा प्रचंड अनुभव आहे. प्रशासनातल्या बारीससारीक गोष्टी व निर्णयाची प्रक्रिया सोपी करण्याच्या कल्पना त्यांच्यापाशी आहेत. त्यांनी अशा वेळी पुढाकार घेऊन पंतप्रधानांच्या मदतीला धावून गेल्यास ही लढाई अधिक सोपी झाली असती. जबाबदार्या वाटल्या गेल्याचे चित्र उभे राहिले असते. सगळेच निर्णय एकटे मोदी घेत नाहीत वा अनेक कल्पना व निर्णयामागे भिन्न पक्षीय पुढारी असल्याचे दिसून आले असते. जनतेला अशा संयुक्त कामातून उर्वरीत पक्ष व नेत्यांचे योगदान नजरेत भरले असते. त्याचा परिणाम असा झाला असता की, एकट्या मोदींना हे सर्व पेलवले नसते.
विरोधकांनी तक्रारी सोडून कामात व निर्णयात हातभार लावल्यामुळेच देश इतक्या मोठ्या समस्येला सामोरा जाऊ शकला, असेच आपोआप लोकांना वाटू शकले असते. अगदी संकट काळात गप्प राहूनही विरोधकांना त्याचे श्रेय घेता आले असते. पण दुर्दैव असे की, हे कर्मदरिद्री लोक सरकारच्या प्रयत्न व प्रयासांमध्ये सहभागी होण्यापेक्षा त्यात व्यत्यय वा अडथळे आणताना लोक बघत आहेत. त्याचा परिणाम जनमानसावर कसा होतो? ‘सी व्होटर’ नावाच्या संस्थेने त्यासाठी लोकमताचा आढावा घेतला आहे आणि त्यात ९३ टक्के लोकांनी मोदींना जबरदस्त पसंती दिल्याचे आढळून आलेले आहे. थोडक्यात, सगळेच श्रेय एकट्या मोदींच्या खात्यात जमा होत चालले आहे. किंबहुना, कोरोनाशी एकटे मोदी व त्यांचे सहकारी झुंजत आहेत आणि विरोधक मात्र त्यात अडथळे वा व्यत्यय आणत आहेत, असेच चित्र तयार झालेले आहे. त्याचेच प्रतिबिंब चाचणीत पडलेले दिसते. ‘लॉकडाऊन’चा महिना उलटून गेल्यावरही कंटाळलेले वा अडचणींनी ग्रासलेले बहुतांश नागरिकही, अजून महिनाभर घरात कोंडून राहायला सज्ज होतात, ते मोदींच्या नावावरचे शिक्कामोर्तब आहे.
विरोधक रोजच्या रोज ‘लॉकडाऊन’मुळे लोक थकले, ग्रासले वा पिडल्याच्या तक्रारी करीत असतानाच फोनवर लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन ही चाचणी झालेली आहे. त्यात ७३ टक्के लोक निर्धारपूर्वक, तर आणखी १९ टक्के लोक ठामपणे मोदींचे समर्थन करताना आढळले आहेत. यात मोदींची लोकप्रियता जितकी दिसत नाही, तितका विरोधकांवरचा लोकांचा राग प्रतीत होतो आहे. संकटात सरकारशी सहकार्य करून लोकांना दिलासा मिळण्याला विरोधकांनीही हातभार लावला पाहिजे. ही विरोधाची वा राजकारण खेळण्याची वेळ नाही, असे त्याच पिडलेल्या जनतेला वाटत असते. पण, तिला दिलासा देण्याच्या बाबतीत एकटे मोदी अगत्याने बोलताना निर्णय घेताना दिसतात. उलट त्यांचे विरोधक होत असलेले काम व कारभार यात सातत्याने काहीतरी उणिवा काढून व्यत्यय आणतात, अशी जी धारणा तयार होते, ती मोदींच्या प्रतिमेला उजाळा देत असते. तसे नसते तर अशाही काळात मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख इतका उंचावलेला दिसायचे काही कारण नव्हते. कारण, मोदी कुठली धर्मदाय संस्था चालवित नसून त्यांचे काम ही त्यांची जबाबदारीच आहे. ते सरकारचे कामच आहे. पण, तेही लोकांना उपकारक वा दिलासा देणारे वाटते. कारण, विरोधक त्यात सहभागी होण्यापेक्षाही नुसते तोंडाची वाफ दवडून व्यत्यय आणत आहेत.
अर्थात, त्याविषयी मोदींनी जाहीर तक्रार केलेली नाही. त्यापेक्षा त्यांनी आपल्याच बडबडीने जनमानसातून विरोधकांची प्रतिमा मलिन करून घेण्याची पूर्ण मोकळीक दिलेली आहे. यालाच ‘राजकीय आत्महत्या’ म्हणतात. सरकारची जबाबदारी पूर्ण करण्यातून व त्यातल्या त्रुटी वा उणिवांसाठी नित्यनेमाने माफी मागून मोदी पुढे चालले आहेत. जे काही होते, त्याचे श्रेय सामान्य कर्मचारी अधिकारी इत्यादिकांना देतात आणि सहकार्यासाठी जनतेचेच मुक्तपणे आभार मानतात. पण, ते आभार विरोधकांना मिळून श्रेयही विरोधकांनी मिळवण्याची संधी गमावली आहे. म्हणून त्याला ‘कर्मदरिद्रीपणा’ म्हणावे लागते.