‘फ्रंटलाईन वॉरियर’ असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, दररोज पत्रकार परिषदेतून नेमकी माहिती देणारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, लाखो गरजूंना मदत पुरविणारे शेकडो स्वयंसेवक, स्वयंसेवी संघटना यांचा उल्लेख ‘कोरोना वॉरियर्स’ असा करणे अगदी संयुक्तिक ठरेल.
कोरोनाविरोधातील लढ्यात भारत आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी उतरला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सर्वोत्तम समन्वय साधला गेला आहे. काही तुरळक अपवाद वगळता राजकारण न करता सर्व राजकीय पक्षदेखील अतिशय समंजसपणे वागत आहेत. देशाता आता कोरोनाबाधितांचा आकडा हा २० हजारांच्या पुढे गेला आहे, त्यात दररोज वाढही होत आहे. मात्र, जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात अद्यापपर्यंत तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या फैलावाचा म्हणजेच रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता कमी झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा जवळपास चार दिवस एवढा होता, आता तो वेग सात ते आठ दिवसांवर आला आहे. काही भागांमध्ये तर त्यात आणखी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे देशभरातील ६१ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे जगाच्या तुलनेत भारत कोरोनाचा सामना चांगल्याप्रकारे करीत असल्याचे म्हणता येईल.
देशव्यापी ‘लॉकडाऊन’चा एक महिन्याचा कालावधी गुरुवारी पूर्ण झाला. या एक महिन्याच्या कालावधीत चाचणी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे, अशी माहिती आयसीएमआरच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी बोलताना अनेक महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधले. त्यातली सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, बदलत्या परिस्थितीनुसार भारताने चाचणी करण्याची पद्धती बदलली. त्यामुळे विषाणू फैलावाच्या बदलत्या ‘पॅटर्न’ला ओळखणे शक्य झाले आहे. देशातील वैद्यकीय सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करणे आणि मृत्युदर कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालय प्रशासनासोबत गेल्या महिन्याभरापासून दैनंदिन संवाद साधण्यात येत आहे. त्याचप्रमाणे देशात सध्या प्राणवायूची पुरवठा पुरेसा व्हावा, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत जास्त रुग्णांना त्या टप्प्यातच बरे करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. आयसीएमआरच्या अध्यक्षांनी दिलेली ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. कारण, गेल्या ३० दिवसांत नेमके काय घडले, त्याचा लेखाजोखा त्यांनी मांडला आहे. त्यामुळे यापुढील परिस्थितीदेखील कशा प्रकारेल हाताळली जाणार आहे, त्याचा अंदाज यातून येतो.
भारतासारखा अजूनही विकसनशील असलेला, तिसर्या जगाचे प्रतिनिधित्व करणारा देश कोरोनाच्या संकटात पूर्णपणे हतबल होईल. अमेरिकेसारख्या महासत्तेने जेथे गुडघे टेकले, तेथे भारताची काय कथा... असा सूर अनेक परदेशी प्रसारमाध्यमांनी सुरुवातीला लावला होता (त्यात काही देशी माध्यमेही होतीच). मात्र, त्या सर्वांना तोंडावर पाडण्याचे काम भारतातील तुलनेने चांगल्या परिस्थितीने केले आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधला गेलेला समन्वय. त्यामुळे ‘फ्रंटलाईन वॉरियर’ असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, दररोज पत्रकार परिषदेतून नेमकी माहिती देणारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, लाखो गरजूंना मदत पुरविणारे शेकडो स्वयंसेवक, स्वयंसेवी संघटना यांचा उल्लेख ‘कोरोना वॉरियर्स’ असा करणे अगदी संयुक्तिक ठरेल.
कोरोनाविरोधातील लढ्यात सर्वांत महत्त्वाचे शस्त्र म्हणजे देशातील आरोग्य व्यवस्था. ज्या देशांच्या आरोग्य व्यवस्थांचे गोडवे गायले जायचे, ज्या देशांमध्ये उपचार घेण्यासाठी जगभरातून गर्दी व्हायची, त्याच देशांना हतबल झालेले जगाने पाहिले आहे. अर्थात, त्यामागे कोरोना धोक्याचे गांभीर्य वेळीच न ओळखणे हे सर्वांत मोठे कारण. भारताने मात्र वेळीच आवश्यक ती पाऊले उचलल्यामुळे आज आपण तुलनेने चांगल्या परिस्थितीत आहोत. कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताची नेमकी काय तयारी आहे, याची साद्यंत आकडेवारी केंद्र सरकारने नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, फार्मासिस्ट, रुग्णालये आदींची माहिती सरकारने जारी केली आहे. त्यामुळे भारतात काहीही सकारात्मक घडत नाही, असा सतत रडका सूर लावणार्यांनी वेळात वेळ काढून संकेतस्थळावरील माहिती वाचणे अतिशय आवश्यक गरजेचे आहे.
देशात सध्या एकूण १ कोटी, २४ लाख, ८६ हजार, ६५९ ‘कोरोना वॉरियर्स’ देशवासीयांच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. त्यापैकी ९ लाख, २७ हजार एमबीबीएस डॉक्टर, तर जवळपास दीड लाख एमबीबीएसचे विद्यार्थी आहेत. अशाचप्रकारे परिचारिका, आरोग्य कर्मचारी, प्रशिक्षित आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, एनएसएस, एनसीसी, माजी सैनिक असे सर्व मिळून कोट्यवधी लोक आज कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर राज्यवार माहितीदेखील दिली आहे, त्यात महाराष्ट्राची स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत चांगली असल्याचे लक्षात येते. म्हणजे महाराष्ट्रात १ लाख, ४५ हजार, ८४८ एमबीबीएस डॉक्टर, तर १६ हजार, ९०० एमबीबीएस विद्यार्थी आहेत. परिचारिकांची संख्याही महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात आहे. अन्य आकडेवारीही पाहता देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर, परिचारिकांसह सर्व आरोग्य रक्षकांना केंद्र सरकारने ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच उपलब्ध करुन दिले आहे. देशात आतापर्यंत ७२३ कोविड रुग्णालये स्थापन करण्यात आली असून, त्यात दोन लाख खाटा उपलब्ध आहेत. त्यात २४ हजार अतिदक्षता खाटा (आयसीयू बेड) आणि १२ हजार १९० व्हेंटिलेटरचा समावेश आहेत. देशात यापूर्वी ‘पीपीई किट’चे उत्पादन केले जात नव्हते. मात्र, आता ७७ उत्पादक त्यांचे उत्पादन करीत असून सध्या १ कोटी, ८८ लाख ‘पीपीई किट्स’ तयार केले जात आहेत आणि त्यांचा पुरवठाही सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे देशात सध्या २५ लाख ‘एन ९५’ मास्क उपलब्ध आहेत, आणखी अडीच कोटी मास्क मागविण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण सामर्थ्यानिशी कार्यरत आहे, असे स्पष्ट होते.
संकेतस्थळावरील संपूर्ण माहितीचा आढावा घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, देशात आरोग्यव्यवस्था अगदीच तोकडी नाही. अर्थात, त्यात अद्यापही प्रगती करण्याची नितांत गरज आहे. कोरोनाविरोधातील लढ्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्य व्यवस्थेकडे पुन्हा एकदा गांभीर्याने बघण्याची एक संधी देऊ केली आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजेभारतीय रेल्वेने तबब्ल पाच हजार डब्यांचे रुपांतर कोरोना रुग्णांसाठीच्या विलगीकरण कक्षामध्ये केले आहे, अशा सुमारे २० हजार खाटा तयार आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाचे संकट टळल्यानंतर त्यांचा वापर देशातील दुर्गम भागासाठी करणे शक्य होणार आहे. त्याचप्रामणे आयसीएमआरसह देशातील अन्य संशोधन संस्थादेखील कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. देशात आता आगामी काळात वैद्यकीय संशोधनाकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष पुरविणे गरजेचे झाले आहे, जेणेकरून अशा संकटांमुळे पुन्हा देश ठप्प होणार नाही. त्याचप्रमाणे आवश्यक त्या वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन देशातच करण्यास प्राधान्य द्यावे लागेल आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे भक्कम करावे लागेल. कारण, चीनमधून आलेले ‘पीपीई किट्स’, चाचणी किट्स हे सदोष निघाल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या विषाणू फैलावाचा सामना करावा लागल्यास त्यासाठी स्वयंपूर्ण होणे आता गरजेचे झाले आहे. देशातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जादेखील आता अधिक वाढवावा लागणार आहे. एकूणच कोरोना संकट हे देशातील आरोग्यव्यवस्थेसह संपूर्ण व्यवस्थेला आत्मपरीक्षण करण्यास लावणारे ठरत आहे.