अमेरिकन मरीन कोअर आणि मानसिक तणाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


america_1  H x


ताणतणाव हे फक्त मृत्यूच्या भीतीपुरतेच असतात, असंही नाही. इतर बारीकसारीक गोष्टीही असतात, ज्यामुळे तुमच्या युद्धक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ती कमी होऊ शकते, घटते आणि अशी ती घटणं म्हणजे पराभवाला आमंत्रणच! असाच काहीसा प्रकार 'अमेरिकन मरीन कोअर'च्या संदर्भात होतोय की काय, अशीच चिंता सेनाश्रेष्ठींना वाटू लागली.


'मरीन कोअर' असं म्हटल्यावर आपल्याला लगेच ते 'नेव्ही सील्स' आणि त्यांनी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये धाड घालून केलेला ओसामा बिन लादेनचा खात्मा आठवला असेल. पण, नौदलाव्यतिरिक्त 'मरीन कोअर' हे अमेरिकन सैन्यदलातील एक वेगळं दल आहे. साधारणपणे भूदल, नौदल आणि वायुदल अशी तीन दलं कोणत्याही देशाच्या सैन्यात असतातच. अमेरिकेचं सगळंच और आहे. या नेहमीच्या तीन दलांच्या जोडीला त्यांच्या संरक्षण खात्याच्या अखत्यारित आणखी पाच दलं येतात. 'मरीन कोअर', 'तटरक्षक दल', 'अवकाश सुरक्षा दल', 'सार्वजनिक आरोग्य सुरक्षा दल' आणि 'राष्ट्रीय महासागर आणि वातावरण प्रशासन कोअर' या आठ दलांना 'युनिफॉर्म्ड सर्व्हिसेस ऑफ युनायटेड स्टेट्स' असं आदराने म्हटलं जातं. या प्रत्येक दलाच्या ठरलेल्या कार्याबद्दल नि त्यांनी पार पाडलेल्या कामगिऱ्यांबद्दल सांगायचं म्हटलं तर एक लेखमालाच लिहावी लागेल. तेव्हा तूर्त आपण फक्त 'अमेरिकन मरीन कोअर'बद्दलच पाहू. 'अमेरिकन मरीन कोअर' हे दल अगदी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळापासून म्हणजे सन १७७५ पासून अस्तित्वात आहे. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध हे अमेरिकन देशभक्त आणि त्यांच्यावर राज्य करणारा ब्रिटन यांच्यातील युद्ध होतं, हे आपल्याला माहीतच आहे. ब्रिटन ही एक सागरी महाशक्ती होती. ब्रिटनशी टक्कर घेण्यासाठी स्वातंत्र्ययोद्धांनी लष्कर आणि नौदल दोन्ही अंगांनी तयारी केलेलीच होती. त्याकाळात विमानाचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे वायुदल नव्हतचं, पण स्वातंत्र्ययुद्ध भरात आल्यावर अमेरिकन सेनापतींना अशा एका सैन्यदलाची गरज भासू लागली की, जे दल भूमीवर किंवा समुद्रावर कुठेही सारख्याच क्षमतेने हालचाली करू शकेल. या गरजेतून 'मरीन कोअर' या नव्या दलाची निर्मिती झाली. हे दल स्वातंत्र्ययुद्धात लढलं. नंतर १८६१च्या यादवी युद्धात लढलं, १९१४ ते १९१८च्या पहिल्या महायुद्धात, १९३९ ते १९४५च्या दुसऱ्या महायुद्धात, १९५० ते १९५३च्या पहिल्या कोरियन युद्धात, १९६८ ते १९७५च्या व्हिएतनाम युद्धात आणि २००१ पासून आत्तापर्यंत सुरू असलेल्या अमेरिकेच्या दहशतवादविरोधी युद्धातही ते लढतंच आहे. एकंदरीत 'अमेरिकन मरीन कोअर' हे जगभराच्या सर्व व्यावसायिक सैन्यदलांमध्ये एक अतिशय कुशल, तरबेज आणि भूमी, समुद्र व आकाश अशा कोणत्याही क्षेत्रामधल्या युद्धाचा प्रदीर्घ अनुभव असलेलं असं मुरब्बी सैन्यदल आहे.

 

कोणत्याही क्षेत्रामध्ये शारीरिक आणि मानसिक ताणतणाव असतातच. सैन्यदलांमध्ये तर ते अधिकच असतात. कारण, इथे 'मृत्यू' नामक एका सर्वभक्षक शक्तीची सावली अखंडच तुमच्यावर असते. एकतर तुम्ही शत्रूला मृत्यूच्या जबड्यात ढकलत असता किंवा शत्रू तुम्हाला ढकलत असतो. म्हणजेच मृत्यूचं भय प्रत्येक क्षणाला तुमच्या मनात जागं असतं. या भीतीवर मात कशी करावी, किंबहुना भीतीचंच रूपांतर हिंमतीत कसं करावं, हेच तर सैनिकी प्रशिक्षणात घोटवून घेतलं जातं. पण, ताणतणाव हे फक्त मृत्यूच्या भीतीपुरतेच असतात, असंही नाही. इतर बारीकसारीक गोष्टीही असतात, ज्यामुळे तुमच्या युद्धक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ती कमी होऊ शकते, घटते आणि अशी ती घटणं म्हणजे पराभवाला आमंत्रणच! असाच काहीसा प्रकार 'अमेरिकन मरीन कोअर'च्या संदर्भात होतोय की काय, अशीच चिंता सेनाश्रेष्ठींना वाटू लागली. निमित्त घडलं 'मरीन कोअर'मधल्या 'कोर्स रिकनायसन्स' या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं. फार मोठ्या संख्येने शिकाऊ उमेदवार या प्रशिक्षणात नापास होऊ लागले किंवा स्वतःहून बाहेर पडू लागले. असं का बरं व्हावं? 'रिकनायसन्स' म्हणजे टेहळणी, चाचपणी, पूर्वपाहणी. कोणत्याही युद्धामध्ये शत्रूची तयारी आजमावण्यासाठी पूर्वपाहणी करणं फार महत्त्वाचं असतं. यावरून मग सेनापती आपले आडाखे बांधून व्यूहरचना करतो. 'अमेरिकन मरीन कोअर'मधलं 'फोर्स रिकनायसन्स' हे टेहळणी पथक अत्याधिक कुशल अशाच उमेदवारांमधून बनवलं जातं. त्याकरिता असलेला त्यांचा प्रशिक्षण वर्ग हा तब्बल २५ दिवसांचा असतो. 'मरीन कोअर' किंवा नौदल यातले उमेदवार निवडले जातात. पाठीवर रायफलीसह २३ किलो सामग्रीचं ओझं घेऊन १२ किमी धावणे, हातपाय बांधलेल्या स्थितीत ९० मीटर अंतर पोहणे, पाण्यात हातपाय न मारता, फक्त नाक पाण्याबाहेर ठेवून एक तासापर्यंत तरंगत राहणे असे शरीर आणि मनाचा कस पाहणारे कार्यक्रम त्यांच्या प्रशिक्षणात असतात.

 

प्रशिक्षण अधिकाऱ्यांना असं आढळलं की, या खडतर प्रशिक्षणात निम्मे उमेदवार नापास होतात आणि पास झालेल्यातले निम्मे, आम्हाला 'कोर्स रिकनायसन्स'मध्ये यायचं नाही,' म्हणून माघार घेतात. असं का होतंय? बरं, 'मरीन कोअर' किंवा नौदलातल्या त्यांच्या नेहमीच्या पथकातल्या सेवेसाठी त्यांची जी काही आवश्यक क्षमता आहे, ती कमी झालेय का? तर नाही. ती क्षमता योग्य तेवढी आहे. मात्र, टेहळणी पथकासाठी जी आणखीन जास्त तीव्र क्षमता हवी, ती त्यांच्याकडे नाही किंवा ती असूनही त्यांना ते काम नको आहे. असं का व्हावं? हे शोधून काढण्याचं काम सेनाश्रेष्ठींनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या केक वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. लेस्ली सॅक्सन या बाईंवर सोपवलं. प्रा. लेस्लीबाईंनी प्रशिक्षणासाठी आलेल्या नव्या १२१ लोकांच्या तुकडीला प्रत्येकी एक आयफोन आणि एक अॅपलचं इलेक्ट्रॉनिक घड्याळ दिलं. प्रशिक्षण चालू असताना उमेदवाराची शारीरिक स्थिती कशी राहील? कोणत्या कार्यक्रमात त्याचा रक्तदाब कमी-जास्त होईल? कोणत्या कार्यक्रमात हृदयाचे ठोके कमी-जास्त होतील? कोणत्या कार्यक्रमात शरीरातल्या कॅलरीज जास्त खर्च होतील? तसंच तो रोज किती अन्न आणि किती पाणी घेतो आहे? या सगळ्यांचा हिशोब अ‍ॅपल घड्याळाने ठेवला. आयफोनवरून त्याला रोज काही प्रश्न विचारले जात. मानसशास्त्रज्ञ माणसाच्या स्वभावाच्या काही वैशिष्ट्यांकडे विशेष लक्ष पुरवतात. त्यात हे लोक तर सैनिक आणि त्यात पुन्हा विशिष्ट दर्जाचे सैनिक. त्यामुळे त्यांचा स्वभाव कितपत मोकळा किंवा घुम्मा आहे? त्यांची सारासार विचार करण्याची क्षमता कितपत आहे? एकत्रित कामगिरी करताना ते एकमेकांना कितपत समजून आणि सांभाळून घेतात? प्रतिकूल परिस्थितीत ते डोकं फिरवून न घेता, शांतपणे विचार करुन मार्ग काढू शकतात का आणि ते समाजात, समुदायात मिसळण्याची गप्पा मारण्याची आवड असलेले आहेत, की कुणाशी फारसे न बोलणारे, एकलकोंडे असे आहेत? अशा विविध अंगांनी त्यांच्या मनाचा ठाव घेणारे, वेध घेणारे असे हे प्रश्न असायचे. लेस्ली बाई रोज नवे प्रश्न त्या उमेदवारांच्या आयफोनवर टाकून ठेवत असत. रोज दिवसभराचं प्रशिक्षण आटपलं की, उमेदवारांनी फुरसतीने त्यांची उत्तर पाठवायची असतं.

 

पंचवीस दिवसांच्या प्रशिक्षणामधल्या पहिल्या काही दिवसांतच लेस्लीबाईंना उमेदवारांचा मनोव्यापारांचा अंदाज येऊ लागला. त्यावरून त्यांनी असा आडाखा बांधला की, या तुकडीतले किमान ५६ टक्के व्यवस्थित उत्तीर्ण होतील. २१ टक्के लोक नापास होतील आणि २३ टक्के लोक स्वत:हून माघार घेतील. आता २३ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार माघार का घेतील, हेच तर त्यांना शोधायचं होतं. त्यांच्या मनोव्यापारांवरून लेस्लीबाईंनी काढलेला निष्कर्ष असा की, हे २३ टक्के प्राणी कमालीचे उत्साही, बडबडे, धमाल करणारे, लोकांमध्ये मित्रांमध्ये मिळणारे किंबहुना अशी मौजमजा करायला न मिळाल्यास बैचन होणारे असे आहेत. प्रशिक्षणाच्या काही विशिष्ट प्रकारांमध्ये त्यांना यातलं काहीही करायला मिळत नाही किंवा तो एकलकोंडेपणा त्यांना इतका असह्य वाटतो की नको ते रिकानाययन्स पथकात सामील होणं, असं त्यांना वाटू लागतं आणि ते सरळ माघार घेतात, ड्रॉप आऊट होतात. पण, मग जे व्यवस्थित उत्तीर्ण होतात ते उत्साही आणि धमाल करणारे नसतात का? तसं नव्हे. पण, मस्तीच्या वेळी मस्ती आणि तासन्तास शांतपणे दबा धरून बसणं ही कामगिरीची गरज असेल, तर तसं बसता येणं, हे त्यांना जमतं म्हणून ते उत्तीर्ण होतात. प्रशिक्षणाच्या अखेरीस लेस्लीबाईंचे निष्कर्ष आणि अंदाज जवळपास अचूक ठरले. आता यावरून सेनाश्रेष्ठी पुढे काय निर्णय घेणार आहेत, ते अजून बाहेर आलेलं नाही. प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा स्वभाव पहिल्या काही दिवसांतच ओळखून संभाव्य माघार घेणाऱ्या उमेदवारांना थोडा अधिक संयम, प्रशिक्षण देणं थांबवून खर्च कमी केला जाईल. काहीही झालं तरी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम मात्र तोच राहील. त्याच्या अवघडपणात, खडतरपणात थोडाही बदल केला जाणार नाही. कारण, अमेरिकेला कणखर, झुंजार, कुशल असं 'फोर्स रिकनायसन्स' पथक निरंतर कार्यक्षम ठेवायचं आहे. बाजारबुणगे नि शेंदाडशिपाई निर्माण करायचे नाही. जगातली सर्वच आधुनिक सेनादलं आपापल्या सैनिकांची क्षमता शक्य तितकी कमाल राहावी, म्हणून असे प्रयत्न करतात. कारण, आुधनिक युद्धे फार खर्चिक, महाग बनली आहेत. ती हरणे कुणालाच परवडणारे नाही.

 
 
@@AUTHORINFO_V1@@