धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे...

    07-Feb-2020   
Total Views | 190


dharmakshetra_1 &nbs


आपणही आज धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रात उभे आहोत
. आपला पक्ष धर्माचा पक्ष आहे. धर्म म्हणजे न्याय, नीती आणि सत्य. विरोधक काहीही म्हणोत, वाट्टेल ती टीका करोत, वाट्टेल ते आरोप करोत, त्यामुळे आपली बाजू कमजोर होत नाही. असत्य कधी टिकत नाही. ‘सत्यमेव जयते’ हे आपले ब्रीदवाक्य आहे. आपल्या देशाचेही ते ब्रीदवाक्य आहे.



कर्म केलेचि करावे,

ध्यान धरिलेचि धरावे।

विवरलेचि विवरावे, पुन्हा निरुपण।

रामदास स्वामी म्हणतात की, जीवनात अनेकवेळा एकच गोष्ट वारंवार करावी लागते. तेच तेच निरुपण पुन्हा पुन्हा करावे लागते. तसे काहीसे या लेखात होण्याची शक्यता आहे, पण त्याला नाईलाज आहे. जेव्हा विचारधारेचे कार्यकर्ते सत्तेत असतात, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये भरपूर उत्साह असतो आणि जेव्हा सत्ता जाते, तेव्हा मरगळ निर्माण होते, निरुत्साह निर्माण होतो. उत्साह निर्माण करणारे नेते नसतील आणि कार्यकर्त्यांना राजकीय कार्यक्रमात सतत गुंतवून ठेवण्याची त्यांच्याकडे प्रतिभा नसेल तर हा निरुत्साह मोठ्या प्रमाणात जाणवू लागतो.



रिकामे मन सैतानाचे घर असते’ अशा अर्थाची इंग्रजी म्हण आहे. सभोवताली घडणार्‍या घटनांमुळे कार्यकर्ता संभ्रमित होतो. त्याला असे वाटू लागते की, आपले विरोधक आपल्यावर हावी होत आहेत. आपल्या विरोधात जनमत तयार होत आहे. आपल्या विरोधात वेगवेगळे विषय घेऊन आपले विरोधक आंदोलन करीत आहेत. आपले काय होणार? आपण या वावटळीत टिकणार का? अशी आशंका त्याच्या मनात निर्माण होते. मग तो प्रश्न विचारू लागतो. तेव्हा असे लक्षात येते की, यातील बहुतेक प्रश्न रिकाम्या मनामुळे निर्माण झाले आहेत. यासाठी परिस्थिती काय आहे, ती तशी का आहे आणि तिला उत्तर काय, याचा विचार करावा लागतो. ‘धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे...’ या श्लोकाने भगवद्गीतेची सुरुवात होते. कुरुक्षेत्र म्हणजे रणांगणाचे क्षेत्र, पण भगवंतांनी पहिला शब्द ‘कुरुक्षेत्र’ असा नाही वापरला, त्यांनी ‘धर्मक्षेत्र’ असा शब्दप्रयोग केला. कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र कसे असेल? ते धर्मक्षेत्र यासाठी आहे की, कुरुक्षेत्रावर लढाई जरी कौरव-पांडवांची असली तरी ती ‘धर्म’ विरोधी ‘अधर्म’ यांची लढाई आहे. अधर्म करणारे संख्याबळाने जास्त आहेत. शक्तीमान आहेत. अस्त्र-शस्त्रसंपन्न आहेत. आपला हेतू साध्य करण्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. त्यांच्याशी लढायचे आहे. धर्माच्या बाजूने श्रीकृष्ण उभे आहेत आणि त्यांनीच आश्वासन दिलेले आहे की, ‘यतो धर्मोस्ततो जय:’



आपणही आज धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रात उभे आहोत
. आपला पक्ष धर्माचा पक्ष आहे. धर्म म्हणजे न्याय, नीती आणि सत्य. विरोधक काहीही म्हणोत, वाट्टेल ती टीका करोत, वाट्टेल ते आरोप करोत, त्यामुळे आपली बाजू कमजोर होत नाही. विरोधकांचे हे कामच आहे की, ते सांगत राहणार. तुम्ही धर्माच्या आधारे समाज तोडण्याचे काम करीत आहात, तुम्ही द्वेषाचे राजकारण करीत आहात, तुम्ही अधिकारवादी आहात, तुम्ही असहिष्णू आहात, तुम्हाला मुसलमानमुक्त भारत करायचा आहे, या भारतात अन्य धर्मीयांना स्थान नसेल, असे हिंदूराष्ट्र तुम्हाला करायचे आहे. हे आरोप ते सातत्याने करत राहणार. त्याची चिंता करण्याचे कारण नाही. कारण, हे सर्व असत्य आहे. असत्य कधी टिकत नाही. ‘सत्यमेव जयते’ हे आपले ब्रीदवाक्य आहे. आपल्या देशाचेही ते ब्रीदवाक्य आहे. कुरुक्षेत्रात समोर कोण उभे आहेत? जे स्वतःला ‘डावे’ म्हणतात, जे स्वतःला ‘उदारमतवादी’ म्हणतात, जे स्वतःला ‘मानवतावादी’ म्हणतात, जे स्वतःला ‘सहिष्णुतावादी’ म्हणतात, जे स्वतःला ‘सर्वांना समाविष्ट करून घेणारे’ म्हणतात, जे स्वतःला ‘अल्पसंख्याकांचे रक्षणकर्ते’ समजतात, अशी सर्व मंडळी येतात. पण हे सगळे लोक बौद्धिक दहशतवादी आहेत. टोकाचे असहिष्णू आहेत. यांचा मानवतावाद बेगडी आहे. स्वतःच्या विचारसरणीत जे बसत नाही, त्यांना ते अस्पृश्य मानतात. अल्पसंख्य त्यांच्या दृष्टीने वैचारिक लढाईतील पायदळ सैन्य आहे. ज्याला आघाडीवर आणायचे आणि गोळ्या घालायला लावायचे. ‘व्होटबँक’ या पलीकडे अल्पसंख्याकांची त्यांच्या दृष्टीने काही किंमत नाही.



या वैचारिक लढाईत त्यांनी अत्यंत हुशारीने अल्पसंख्याक म्हणजे मुसलमान यांना उतरविले आहे
. ज्या देशात तीस कोटी मुसलमान राहतात, त्यांना ‘अल्पसंख्य’ कोणत्या कसोटीने म्हणायचे? या मुसलमानांना त्यांनी केंद्र सरकार विरुद्ध उभे केले आहे. केंद्र सरकार राष्ट्रवादी मतांवर निवडून आलेले आहे. म्हणजे मुस्लीम समुदायाला त्यांनी राष्ट्रवादी विरुद्ध उभे केले आहे. ते दबक्या आवाजात म्हणतात की, “या सरकारने तुमचा तिहेरी तलाकचा विषय बंद केला. काश्मीरच्या मुसलमानांचे लाड करणारे ३७० कलम रद्द केले. रामजन्मभूमी हिंदूंना देऊन टाकली. आता तुमचे कसे होणार? यात पुन्हा नागरिकत्व कायदा आणला. तुमचे जे बांधव (?) बांगलादेश आणि पाकिस्तानामधून घुसले आहेत, त्यांना नागरिकत्व मिळणार नाही, असे हा कायदा सांगतो. रोहिंग्या मुसलमानांना नागरिकत्व नाही, असे हा कायदा म्हणतो. तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही धरणे धरा, शाहीनबागेत बसा. विद्यापीठात गोंधळ घाला, आम्ही तुमच्या मागे आहोत. आमचे सिनेकलाकार तुमच्या मागे येतील.” या लढाईसाठी त्यांनी काही सिद्धांत उभे केले आहेत. ‘उदारमतवाद’ हा एक सिद्धांत आहे. इंग्रजी ‘लिबरलिझम’चे हे भाषांतर आहे. ‘सिव्हिल सोसायटी’ हा त्यांचा दुसरा शब्द आहे. संविधान आणि संविधानातील मूलभूत अधिकार हा त्यांचा पुढचा विषय आहे. मानवाधिकार हा आणखी एक विषय आहे. डावी मंडळी उदारमतवादी असतात, असे म्हणणे म्हणजे अफजलखान भवानीचा भक्त होता, असे म्हणण्यासारखे आहे. त्यांच्या कळपात जे नसतात, त्यांना डावी मंडळी नवीननवीन शिव्या शोधून घालत असतात. जो त्यांच्या विचाराचा नाही, त्याला जगण्याचाही अधिकार नाही, असा त्यांचा रशियातील इतिहास आहे. चीनमधील इतिहास आहे. क्यूबातील इतिहास आहे.



दुर्योधन जसा म्हणत असे की
, सुईच्या अग्रावर राहणारी जमीनदेखील मी पांडवांना देणार नाही. त्याचेच भाऊबंद हे डावे म्हणतात की, ”आमच्याशी असहमत असणाऱ्यांना आम्ही सुखाने जगू देणार नाही, राज्य करू देणार नाही.अराजक निर्माण झाले तरी हरकत नाही,आम्ही सुराज्य होऊ देणार नाही.” डाव्यांची जगण्याची शक्ती राजसत्तेत असते. बंगाल, त्रिपुरा, केरळ या राज्यांत त्यांची सत्ता होती. बंगालमधील त्यांची सत्ता संपली, त्रिपुरा त्यांच्या हातातून गेले, आता फक्त केरळ राहिले आहे. या राज्यांच्या शक्तीच्या बळावर वेगवेगळ्या राज्यांतून लोकसभेत त्यांचे प्रतिनिधी जात. राज्यांच्या विधानसभेत जात. हिंदू जनतेने निवडून दिलेले केंद्र सरकार आल्यापासून हे हिंदूघातकी लोकसभेत जवळजवळ दिसेनासे झालेले आहेत. विविध राज्यांतील विधानसभेतून त्यांचे अस्तित्व पुसले जात आहे. केरळ ते फार काळ राखू शकणार नाहीत. याचबरोबर त्यांची सत्ता विद्यापीठामध्ये राहिली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ त्यांच्या सत्तेचा गड झाला. देशविरोधी कारवायांचा अड्डा अशी त्याची प्रतिमा देशात झालेली आहे. सामान्य माणूस म्हणतो की, हे विद्यापीठ बंद करून टाकले पाहिजे. शिक्षणक्षेत्रातील निर्णय घेण्याच्या स्थानावर डावी मंडळी बसविण्यात आली. काँगे्रस आणि डाव्यांमध्ये अलिखित करार झाला. या कराराप्रमाणे काँग्रेसने राजकीय सत्ता सांभाळावी, आम्ही बौद्धिक सत्ता संभाळतो. काँग्रेसच्या शासन काळात अनेक कम्युनिस्ट काँग्रेसमध्ये घुसलेले होते. मणिशंकर अय्यर त्यातील एक. दिवंगत गुजराल हेदेखील त्यातलेच. त्यांचे जिवलग मित्र म्हणजे दिग्विजय सिंग, पी. चिदंबरम, इत्यादी.



सत्तेत जसे ते घुसले
, आपले मित्र त्यांनी जोपासले, तसे प्रचारमाध्यमातही त्यांचे असेच जबरदस्त प्राबल्य निर्माण झाले. महाराष्ट्रातील कुमार केतकर हे त्यांचे परममित्र आहेत. प्रणव राय, बरखा दत्त, एन. राम, अशी काही नावे सांगता येतात. ही संख्या खूप मोठी आहे. बौद्धिक क्षेत्राच्या प्रत्येक ठिकाणी ही माणसे बसलेली आहेत. समाजाची बुद्धी कशी नासविता येईल, या एकाच विचाराने ते झपाटलेले आहेत. आपल्या पुराणवाङ्मयात एकापाठोपाठ एक असुरांच्या कथा येतात आणि या असुरांकडे कोणती ना कोणती शक्ती असते. या शक्तीच्या साहाय्याने ते सामान्य माणसाला आपल्या काबूत ठेवतात आणि सज्जन माणसांना म्हणजे ऋषीमुनींना छळत राहतात. या असुरांची जागा ज्यांनी घेतली आहे, त्यांना ‘डावे असुर’ म्हणायचे. राजकीय सत्तेतील आपले वर्चस्व गेले. मोदी कायम राहिले तर, ते कायमचे जाईल. बौद्धिक क्षेत्राच्या वर्चस्वाला धक्के बसू लागलेले आहेत. त्यांचे प्रणव रायसारखे, बरखा दत्तसारखे अनेकजण वेगवेगळ्या गफल्यात अडकलेले आहेत. त्यांच्या प्रतिमांना चांगलेच तडे गेलेले आहेत. अनेक विद्यापीठांचे कुलगुरू बदलले आहेत. ते देशतोडू विचारसरणीचे नाहीत. समाजाची बुद्धी नासविणार्‍या बुद्धीचे नाहीत. राजकीय सत्ता गेली, बौद्धिक सत्ता चालली, मग आम्हाला कुठे जावे लागेल? अर्थात काहीजणांना तिहारच्या तुरुंगात जावे लागेल. जसे चिदंबरम वारी करून आले आहेत, तशी वारी अनेकांना करावी लागेल आणि काहींना अडगळीत जावे लागेल.



त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न जीवनमरणाचा प्रश्न आहे
. अस्तित्त्व रक्षणाचा प्रश्न आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी म्हण आहे. डोकच जाण्याची वेळ आली आहे, ते वाचवले पाहिजे. म्हणून ते कुरुक्षेत्रात उतरले आहेत. सर्व शक्ती एकवटून उतरले आहेत. त्यांनी आपल्या विरोधात म्हणजे राष्ट्रवादी शक्तीच्या विरोधात वेगवेगळ्या लोकांना एकत्र करायला सुरुवात केलेली आहे. कालपरवापर्यंत, आपण कुणी कल्पनाही केली नव्हती की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनादेखील यांच्यात सामील होईल, पण ती सामील झाली आहे. विविध माणसे आणि पक्ष यांच्या कोणत्या दुर्बल जागा आहेत, हे डावे लोक उत्तम जाणतात. मुसलमानांची दुर्बल जागा भाजपविषयीचा अविश्वास आहे, फाळणीच्या पापाचे शल्य आहे. आंबेडकरी दलितांची दुर्बल जागा संघाविषयीचा पराकोटीचा द्वेष आहे. ख्रिश्चनांची दुर्बल जागा धर्मांतरास अडथळा आल्यास काय होईल, ही आहे. त्या सर्वांचा उपयोग डावे करतात, बुद्धी लावून करतात. त्यांच्या या बुद्धीकौशल्याला आपण दाद द्यायला पाहिजे.



अशा या कौरवसेनेशी आपल्याला लढायचे आहे
. अशा लढाया आपण इतिहास काळात अनेकवेळा लढल्या आहेत. देव आणि असुर संग्राम हा काही आपल्या दृष्टीने नवा नाही. परमेश्वर आपल्या बाजूने या युद्धात उतरेल, पण तेव्हाच जेव्हा आम्ही लढण्यासाठी रणांगणात असू. आम्ही लढण्याऐवजी रडण्यातच धन्यता मानू लागलो तर ईश्वर म्हणेल की, तुम्ही रडण्याच्याच लायकीचे आहात, रडत राहा. वार करण्याऐवजी हातात हार घेऊन जर आपण उभे राहणार असू तर मार बसण्यापलीकडे काही होणार नाही. महाराष्ट्रातील सर्व सुजाण मतदारांना माहीत आहे की, विश्वासघात करून हे सरकार अधिकारावर आलेले आहे. राज्यघटनेच्या कायदेशीर कलमांचे पालन झाले आहे, पण राज्यघटनेच्या मूल्यांची हत्या झाली आहे. फसवणूक एका राजकीय पक्षाचीच झाली आहे, असे नसून मतदारांची झाली आहे. तो खूप संतप्त आहे. त्याच्या मनात राग धगधगतो आहे. त्याला संधी मिळाली पाहिजे. ज्यांनी विश्वासघात केला, त्यांना शासन करण्यास तो आतूर आहे. हे लक्षात न घेता ‘आम्ही तुमच्याबरोबर सत्ता बनविण्यास तयार आहोत,’ अशी वक्तव्ये देणे, म्हणजे मायबाप मतदारांचा घोर अपमान करणे आहे. त्याचे फळ भोगावे लागेल. लढाई जिंकायची आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, “पुरुषार्थहिनता सोड, युद्धाला सज्ज हो, उचल धनुष्य आणि सोड बाण, कोणत्याही लाभ-हानीचा विचार न करता तुला हे कर्म केलेच पाहिजे. असुरी वृत्तीचे लोक आपल्या कर्मानेच मरतात, तू फक्त निमित्तमात्र हो.”

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121