मुंबई : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्यांना अद्यापही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
ट्विट करत नितेश राणेंनी सरकारवर निशाणा साधला. 'ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी... नुस्त बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा.', असा खोचक टोला भाजप नेते निलेश राणे यांनी लगावला आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून राज्यातील अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचं पॅकेजही जाहीर केलं होतं. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला असून त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.