‘पासष्ट’च्या घरातले ‘पक्षाध्यक्ष’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2019   
Total Views |

 



घरात नि दारात केतकर-कुलकर्णी असताना काँग्रेस इतरत्र अध्यक्ष कशाला शोधते आहे? कुठल्या तंत्रज्ञ वा रणनीतिकाराची काँग्रेसला गरजच काय? या दोघांना बुद्धिबळाचा पट आणून द्यावा आणि त्याच्या पासष्टाव्या घरात त्या दोघांना बसवावे. काम झालेच म्हणून समजा. त्यासाठी ‘पासष्ट’ घरे असलेला बुद्धिबळाचा पट कुठून आणायचा, ते कुमार केतकर सांगू शकतील.


राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याला आता महिन्याचा काळ लोटला आहे. इतक्या दिवसांमध्ये त्या पक्षाला आपला नवा अध्यक्ष निवडता आलेला नाही किंवा राहुलनाच अध्यक्षपदी कायम राहाण्यासाठी पटवण्यातही श्रेष्ठी यशस्वी झालेले नाहीत. कारण, प्रश्न ‘या पराभवाची जबाबदार कोणाची
असा नसून, ‘येऊ घातलेल्या पराभवाची जबाबदारी कोण घेणार,’ असा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक नेत्याची हीच ‘गुणवत्ता असते की, त्यांना कुठलीही ‘जबाबदारी नको असते. साहजिकच त्यांना असा अध्यक्ष किंवा नेता लागतो, जो जबाबदारी घेईल आणि तरीही तोच कर्तृत्ववान असल्याची इतरांनी ग्वाही द्यायची असते. परिणामी, राहुल भले राजीनामा देतील, पण तो स्वीकारायचा कोणी, असा घटनात्मक प्रश्न पक्षासमोर उभा आहे. जर पक्षाने त्यांना अध्यक्षपदी निवडलेलेच नसेल, तर पक्षाला राजीनामा तरी स्वीकारण्याचा अधिकार कसा असेल? २०१३ च्या अखेरीस राहुल पक्षाचे उपाध्यक्ष झालेले होते. पण, त्यापूर्वी कधी पक्षात असे पद उपलब्ध नव्हते की, कोणी उपाध्यक्षही झालेला नव्हता. मग अचानक आता हे पद आले कुठून वा राहुलना ते मिळालेच कसे? कोणी असा प्रश्न विचारण्याची हिंमत तरी केलेली होती का? अकस्मात एकेदिवशी दोन दशकांपूर्वी सोनिया पक्षाध्यक्ष झाल्या, तेव्हा तरी त्यांना कोणी त्या पदावर आणून बसवले होते? आणि त्याचा आधार काय होता? असे प्रश्न तेव्हा विचारले गेले नसतील, तर आता कोण विचारणार? पण, आज ज्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष आहे, त्याला त्यापासून मोक्ष देण्याची कुवत असलेले अनेकजण सध्या काँग्रेस गोतावळ्यात आहेत. पण त्याकडे कोणाचेच लक्ष जात नसेल, तर सगळेच बुचकळ्यात पडण्यालाही पर्याय नाही ना? कुमार केतकर पक्षाचे खासदार आहेत आणि सुधींद्र कुलकर्णी राहुल गांधींचे सल्लागार असल्याचे कोणा काँग्रेस नेत्यांना कशाला आठवत नाही? इतके कर्तबगार अध्यक्ष काँग्रेसला शोधूनही मिळणार नाहीत ना?


कुठल्याही राजकीय पक्ष वा संघटनेला मोक्ष हवा असेल, तर तिने शांतपणे ग्रंथप्रामाण्यवादी पुस्तकपंडितांना शरण जायचे असते. कारण, पुस्तकपंडितांना व्यवहाराशी कधी कर्तव्य नसते. त्यात केतकर किंवा त्यांच्यासारखे काँग्रेसवादी बुद्धिवंत खूप उच्चपातळीवर आहेत. पण, राहुल यांच्या जागी पर्यायी अध्यक्ष शोधताना कोणाचेच लक्ष तिकडे गेलेले दिसत नाही. सुशीलकुमार शिंदे किंवा अशोक गेहलोत अशा नावांची उगाच चर्चा चाललेली आहे. त्यांच्याकडून काय साध्य होऊ शकते? ते पक्षाला पराभवापासून वा़चवू शकत नाहीत किंवा नव्याने ऊर्जितावस्थाही आणू शकत नाहीत. अशावेळी बुडणार्‍या पक्षालाही तो प्रगतिपथावर असल्याचाच खोटा दिलासा देणार्‍यांची गरज असते. लोकसभेतील पराभवानंतर सुधींद्र कुलकर्णी यांनी ‘नॅशनल हेराल्ड या काँग्रेसच्या अधिकृत दैनिकात राहुल गांधींच्या नैतिक विजयाची ग्वाही दिलेली होती ना? जगातला इतर कोणी शहाणा वा राजकीय अभ्यासक त्या व्यवहारी पराभवातला विजय सिद्ध करू शकला होता का? पण, ती किमया कुलकर्णी यांनी दाखवली आहे आणि अशा जादूचीच सध्या काँग्रेसला गरज आहे. तिथे व्यवहारी निवडणुका लढलेले वा मुख्यमंत्री म्हणून कारभार हाकलेले शिंदे-गेहलोत काय दिवे लावू शकणार आहेत? त्यापेक्षा कुमार केतकर आणि सुधींद्र कुलकर्णी काँग्रेसला सुखनैव मुठमाती देण्याचे काम करू शकतील. आपण संपलो कधी आणि कसे, याचा थांगपत्ता कुठल्याही राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना वा पक्षालाही लागणार नाही. दुर्दैव इतकेच की, अजून अशा कर्तबगार दोघांचे नावही कुठे चर्चेत आलेले नाही की राहुल गांधींपर्यंत त्या दोघांना कोणी जाऊच देत नसावा का? अन्यथा फतवा काढूनच राहुलनी या दोघांना अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमून टाकले असते. मग मोदींची भीती कोणाला बाळगण्याचे कारण उरले नसते. कारण, मोदी कसे संपणार, याचे पंचाग केतकरांनी खूप पूर्वीच एका वाहिनीच्या ‘कट्ट्यावर बसून मांडलेले आहे.


मला याचीच गंमत वाटते की, केतकर राहुलना सल्ला देतात आणि त्यांचा सल्ला नरेंद्र मोदी काळजीपूर्वक उपयोगात आणतात. याकडे तरी कोणा काँग्रेसवाल्याने थोडे गंभीर होऊन बघायला नको का? मध्यंतरी केतकरांनी हमीच दिलेली होती की, मोदींचा सतराव्या लोकसभेत दारूण पराभव होणार आहे आणि त्यातून त्यांना ‘अयोध्येचा श्रीराम अवतरला तरीही वाचवू शकणार नाही. हा इशारा केतकरांनी मोदींना किंवा भाजपला दिलेला नव्हता. तो काँग्रेस व राहुलना दिलेला होता. त्याचा अर्थ असा होता की, मोदींनी अयोध्येतील रामाच्या मंदिराच्या उभारणीत फसावे आणि त्यांचा राजकीय निवडणुकीत पराभव व्हावा. सापळा खूप छान व सोपा होता. पण, कपिल सिब्बल किंवा अन्य काँग्रेसवाल्यांनी केतकरांना तो सापळा लावूच दिला नाही. मोदींच्या पहिल्या कारकिर्दीत मंदिराच्या कामात जितके अडथळे आणता येतील, तितके आणले आणि मोदी त्यापासून अलगद दूर राहिले. परिणाम असा झाला की, मोदींनी अध्यादेश काढला नाही किंवा संघाच्या कुठल्या संस्थेला मंदिराची उभारणी करण्यास मुभा दिली नाही. सर्वोच्च न्यायालयात सिब्बलांनी अडथळे आणले नसते, तर मंदिराचा मार्ग मोकळा झाला असता आणि मोदींचे सरकार व भाजप मंदिरातच फसत गेला असता. त्यांनी पुलवामा, बालाकोट किंवा गरिबांना गॅसजोडणी वा वीजपुरवठ्याच्या गोष्टीच केल्या नसत्या. त्यापेक्षा मंदिराच्या उभारणीसाठी छाती फुगवून मोदी प्रचारात मिरवले असते. अयोध्येतला राम आपल्याला निवडणुका जिंकून देईल, अशा भ्रमात मोदी राहिले असते, तर राहुलना ‘७२ हजार रुपयात निवडणूक सहज जिंकता आली असती. पण, केतकरांचा इशारा मोदींनी गंभीरपणे घेतला. रामाच्या मंदिरापेक्षाही पुलवामा बालाकोटवर भर दिला आणि पुन्हा एकदा लोकसभा जिंकली. रामाची मदत घेण्यापेक्षा त्यांनी केलेल्या कामाच्या बळावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याचे श्रेय केतकरांचे नाही, तर काय अमित शाहांचे आहे?


आताही इतके मोठे बहुमत मिळवल्याने नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार कसे मस्तवाल होऊन गाळात जाणार आहे, त्याचे पंचांग केतकरांनी एका संकेतस्थळावर प्रदीर्घ लेखातून मांडलेले आहे. म्हणजेच अशा वेळी मोदी सरकारला कुठलाही प्रतिकार करण्यापेक्षा मस्तवाल होऊ देणे, असा सापळा केतकरांनी सुचवलेला आहे. पण, तिकडे पुन्हा कुणाही काँग्रेसवाल्याचे लक्ष नाही. सगळे मूर्ख लेकाचे राहुल यांची समजूत घालून अध्यक्षपदी कायम राखण्यात गर्क आहेत. विधानसभा लढवण्याचे मनसुबे रचण्यात रमलेले आहेत. पण, मोदींना केतकरी सापळ्यात अडकवण्याचा विचारही कोणा काँग्रेसवाल्याच्या मनाला शिवलेला नाही.


दुसरे सुधींद्र कुलकर्णी. त्यांना नैतिक विजयानेही सत्ता मिळवण्याची किमया साधलेली आहे. राहुलना पक्ष सांभाळता येत नसेल आणि निवडणुका जिंकून सत्ता मिळवणे शक्य नसेल, तर निवडणुकांशिवायच सत्ता मिळवण्याला काँग्रेसने प्राधान्य देणे भाग आहे ना? मग ती किमया ज्याला साधली आहे, त्याचाच सल्ला बहुमोलाचा नाही का? त्यात फक्त कुलकर्ण्यांचाच हातखंडा आहे. त्यामुळे जुन्यापान्या कुणा नेत्यांना काँग्रेसची सूत्रे सोपवण्यापेक्षाही केतकरांना पक्षाध्यक्ष करावे आणि कुलकर्ण्यांना महासचिवपदी नेमले, तर किती बहार येईल ना? हुड्डा किंवा अशोक चव्हाणांना बाजूला ठेवूनही हरियाणा व महाराष्ट्रात काँग्रेसला नैतिक विजय संपादन करता येतील. कार्यकारिणी वा श्रेष्ठी असल्या सर्व दगदगीतून राहुलना कायमची मुक्ती मिळून जाईल. मराठीत आपण म्हणतो ना, काखेत कळसा नि गावाला वळसा? घरात नि दारात केतकर-कुलकर्णी असताना काँग्रेस इतरत्र अध्यक्ष कशाला शोधते आहे? कुठल्या तंत्रज्ञ वा रणनीतिकाराची काँग्रेसला गरजच काय? या दोघांना बुद्धिबळाचा पट आणून द्यावा आणि त्याच्या पासष्टाव्या घरात त्या दोघांना बसवावे. काम झालेच म्हणून समजा. त्यासाठी ‘पासष्ट घरे असलेला बुद्धिबळाचा पट कुठून आणायचा, ते कुमार केतकर सांगू शकतील. त्यांनी त्यावर यापूर्वी दोनदा अग्रलेखरूपी प्रबंध लिहिलेले आहेतच.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलोकरा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@