घरचं झालं थोडं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2019   
Total Views |



मागील दोन आठवड्यात प्रियांकाच्या कर्तबगारीने मोदींची निद्रिस्त लाट उघड दिसायला लागली. तेव्हा अनेक दिल्लीकर बुद्धिमंतांचाही भ्रमनिरास झाला आणि त्यावेळी त्यांना मराठीतली प्रसिद्ध उक्ती आठवली असेल, ‘घरचं झालं थोडं आणि व्याह्याने पाठवलं घोडं.’


बुडणाऱ्या माणसाला वाचवावे, अशी कोणाचीही इच्छा असते. पण, अशा कामात बुडणाऱ्याचेही सहकार्य अपेक्षित असते. म्हणजे असे की, बुडण्यातून आपले प्राण वाचवावे, यासाठी त्यानेही प्रयत्न करायचे असतात; अन्यथा वाचवायला जाणाऱ्यालाही सहकार्य न बुडणारा बुडवू शकतो. कारण, बुडणाऱ्याला वाचवताना त्यानेच हातपाय गाळलेले असतील, तर त्याचे वजनच (ज्याला इंग्रजीत ‘डेडवेट’ म्हणतात) त्याच्या विरोधात असते आणि ते त्याला बुडवत असते. तो भार वाचवायला जाणारा सहन करू शकत नसतो. आज काँग्रेस पक्षाची स्थिती काहीशी तशीच झाली आहे. कारण, त्या पक्षाला गांधी खानदानाच्या पलीकडे कोणी आपले नेतृत्व करू शकेल, असे वाटत नाही आणि या घराण्याचे आजकालचे वंशज बुडणाऱ्या पक्षाला अधिकच खोलात घेऊन जाण्यास धडपडत असतात. राहुल गांधी यांनी मागील पाच वर्षांत प्रयत्नपूर्वक तशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहेच. पण, आता त्यांच्या मदतीला धाकट्या भगिनी प्रियांका वढेरा आल्या आहेत, असे म्हणायची वेळ आलेली आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रियांकाला पक्षात आणावे म्हणून प्रयत्न करणाऱ्यांची अपेक्षा पक्षाला उभारी मिळावी, अशी होती. फक्त पक्षाचे समर्थकच नाहीत, तर नरेंद्र मोदी व भाजपच्या सरकारमुळे निराश्रित झालेल्या दिल्लीतल्या अनेक बुद्धिमंतांनाही प्रियांकाच काँग्रेससह आपल्यालाही गाळातून बाहेर काढतील, अशी अपेक्षा होती. म्हणूनच पूर्वाश्रमीचे कुठलेही कर्तृत्व नसतानाही नुसत्या घोषणेनंतर त्या संपूर्ण उत्तरप्रदेशात काँग्रेसचा डंका पिटणार; अशी वर्णने सुरू झालेली होती. पण, मागील दोन आठवड्यात प्रियांकाच्या कर्तबगारीने मोदींची निद्रिस्त लाट उघड दिसायला लागली. तेव्हा अनेक दिल्लीकर बुद्धिमंतांचाही भ्रमनिरास झाला आणि त्यावेळी त्यांना मराठीतली प्रसिद्ध उक्ती आठवली असेल, ‘घरचं झालं थोडं आणि व्याह्याने पाठवलं घोडं.’

 

यातील ‘थोडं’ कोण आणि ‘घोडं’ कोण? आधीच राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष होऊन काँग्रेस छानपैकी डबघाईला आणलेली आहेच. त्यात आता प्रियांकांची भर पडलेली आहे. त्या आपल्या आजीसारख्या दिसतात, अशी आवई पिकवून दिशाभूल करता येते. पण, जिथे कसोटीची वेळ येते, तिथे नुसत्या दिसण्याने भागत नसते. लढायची वेळ आल्यास पळ काढून चालत नाही. काही दिवसांपूर्वी अमेठीत प्रियांका फिरत होत्या आणि कोणीतरी त्यांना निवडणूक लढवण्याविषयी प्रश्न विचारला, तर “वाराणसीतून उभी राहू का?” असा प्रतिप्रश्न करून त्यांनी खळबळ माजवली. अशा विधानांना ‘हेडलाईन’ आणि प्रसिद्धी मिळते, याची जाणीव त्यांना असावी. पण, त्याचे परिणामसुद्धा असतात. ते परिणाम झटकून टाकता येत नाहीत. एका जागी असे विधान केल्यावर तशी ‘हेडलाईन’ मिळालीही; पण, नंतर तोच विषय प्रियांकांचा पाठलाग करू लागला. जिथे जातील तिथे त्यांना किंवा पतिदेव रॉबर्ट वाड्रा यांना त्याविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले. आता ‘गरजले पण बरसणार नाही,’ असे ठामपणे सांगता येत नसते. म्हणून मग टाळाटाळ सुरू झालेली होती. त्यामुळे वाड्राने आपली पत्नी सज्ज असल्याची भाषा केली, तर प्रियांकांनीही पक्षाने आदेश दिला, तर वाराणसीतही लढण्यास तयार असल्याची दर्पोक्ती दिली. पणा तशी वेळ आली, तेव्हा मग घाम फुटला. वाराणसी म्हणजे एक नुसता मतदारसंघ नाही, तर पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे आणि तिथून लढायचे तर पराभवाची तयारीही ठेवायला हवी. जी हिंमत मागील खेपेस केजरीवाल यांनी दाखवली आणि पूर्वी राजनारायण इत्यादींनी दाखवलेली आहे. पण, गांधी खानदानाला पराभवाची मोठी भीती वाटते. त्यांना गुंगीत झोपलेल्या सावजाला मारण्याची शिकार करण्यात पुरुषार्थ वाटत असतो. मग त्यांनी साक्षात शिकारी वाघाच्या गुहेत घुसण्याची हिंमत कशी करावी? ते काम सामान्य स्मृती इराणी करू शकतात. प्रियांकाना तितके क्षुद्र काम कसे जमणार ना?

 

ही वस्तुस्थिती प्रत्येक काँग्रेसवाला जाणतो आणि म्हणूनच कोणीही त्यावर बोलायचे टाळलेले होते. हा डाव आपल्यावरच उलटण्याची भीती काँग्रेसच्या मुरब्बी जाणकार नेत्यांना होती. म्हणून तसा कोणी हुशार नेता त्यावर जास्त बोलत नव्हता. पण, अलीकडे जे काही तोंडाळ वाचाळवीर काँग्रेसने प्रवक्ते म्हणून भरती केलेले आहेत, त्यांना परिणामांची कशाला फिकीर असेल? त्यांनी लंब्याचवड्या गप्पा करायला मागेपुढे बघितले नाही आणि अमेठीत प्रियांकांनी केलेल्या गंमतीचा त्यांच्यासाठीच मग राजकीय फास होऊन गेला. त्यात अधिक फसू नये म्हणून मग मोदींनी अर्ज भरण्याच्या दिवशी त्याचीच चर्चा चालू झाल्यावर त्याला पूर्णविराम देण्याकरिता लगबगीने वाराणसीत गेल्यावेळी पुरता तोंडघशी पडलेल्या उमेदवाराचे नाव काँग्रेसने जाहीर केले. त्यामागचा हेतू चुकीचा म्हणता येणार नाही. त्यांना प्रियांकांना फास लागण्यातून सुरक्षित करायचे होते. पण, तसे करण्यासाठी दोन दिवस आधी अजय राय यांचे नाव घोषित करता आले असते आणि मोदींच्या भव्य रोड शोच्या दिवशी त्यावर चर्चाच होऊ शकली नसती. पण, ऐन रोड शोचा रंग चढत असताना दुसरेच नाव घोषित झाल्याने प्रियांकांनी पळ काढल्याचा अर्थ लावला गेला आणि काँग्रेस अधिकच गाळामध्ये फसत गेली. तसे झाल्यावर खुलासे व उत्तरे देत बसण्यास अर्थ नसतो. कोळ्याच्या जाळात फसलेला कीटक जितका सुटण्याची धडपड करतो, तितका अधिकच फसत जातो. काँग्रेसचे प्रवक्ते व नेत्यांनी नेमकी तशी आपल्या पक्षाची दुर्दशा करून टाकलेली आहे. ते जितके खुलासे देत आहेत, तितके अधिकच सापळ्यात फसताना दिसत आहेत. प्रियांकाची विधाने चित्रीत व ध्वनिमुद्रित झालेली व नोंदलेली असताना हे प्रकरण माध्यमांनीच पिकवलेल्या अफवा असल्याचे खुळे खुलासे अधिकच केविलवाणे आहेत. पण आता सामान्य प्रवक्त्यांना बाजूला सारून पित्रोडा वा राजीव शुक्ला असले उपरे नेते अधिक दिवाळखोरी करू लागले आहेत.

 

प्रियांका व त्यांचा पतीही लढायला राजी असताना राहुलनी आपल्या भगिनीला उमेदवारी नाकारली, अशी एकूण चर्चा होती आणि तशी ती राहिल्याने फारसे काही बिघडणार नव्हते. पण, पित्रोडा यांनी प्रियांकांनाच राहुलनी निर्णय घ्यायला सांगितले आणि तिनेच माघार घेतल्याचे सांगितले. मग शुक्ला यांनी वेगळा युक्तिवाद करीत राहुलनी त्यावर निर्णय घेतल्याची घोषणा केली. म्हणजे पक्षात काय चालले आहे, त्याचा थांगपत्ता गांधी कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनाही नसावा, अशी खात्री पटायला हरकत नाही. असे खुलासे लोकांचे व पत्रकारांचे समाधान करण्यापेक्षा अधिकच प्रश्न निर्माण करीत असतात. त्यामुळेच प्रियांका घाबरल्या की राहुलना आपल्या भगिनीला लढवणे असुरक्षित वाटले, याची चर्चा सुरू झाली. मुळात त्याची गरज होती काय? सपा-बसपा यांनी सोबत घेतले नाही म्हणून राहुलनी स्वबळावर उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतला होता आणि त्यासाठी प्रियांकाना मैदानात आणल्याची चर्चा ही झाकली मूठ होती. प्रत्यक्षात आजपर्यंत अमेठी-रायबरेलीतही प्रियांकांना आपला करिष्मा दाखवता आलेला नाही. म्हणूनच मतमोजणी व निकाल लागण्यापर्यंत फुगा फुगलेला ठेवण्यात धन्यता मानायची असते. म्हणूनच वाराणसीत लढण्याची भाषा किंवा तत्सम वाचाळता गरजेची नव्हती. आधीच बंधुराज धमाल करीत आहेत. त्यात आता भगिनीची भर पडली आहे. हे घरातलेच थोडे म्हणायचे, तर शुक्ला वा पित्रोडा अशा व्याह्यांनी आपापली घोडी दामटण्याची गरज होती काय? पण, पक्षच एक अराजक असेल, तर कोण कोणाला वेसण घालणार आणि कोण कशाला लगाम लावणार? अशी स्थिती आज काँग्रेसची आहे. त्यात काँग्रेसचा जीर्णोद्धार बाजूला राहिला आणि दिल्लीसह देशातले बुद्धिमंत मात्र गाळात रुतत चालले आहेत. त्यातल्या काहीजणांनी आता वाराणसीतून माघार घेणाऱ्या प्रियांका व काँग्रेसला शेळपट म्हणण्यापर्यंतही मजल मारली आहे. मतदान संपेपर्यंत काय काय होईल ते बघायचे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@