गळचेपी कोणी कोणाची केली?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2019   
Total Views |



मोदींच्या विरोधाला वारेमाप प्रसिद्धी आणि ममताच्या निषेधाला कचऱ्याची टोपली दाखवली गेली असेल, तर कलावंतांच्या मताची माध्यमांनी गळचेपी केलेली आहे ना? मग नंतर मोदी विरोधातले पत्रक काढून त्यावर सह्या करण्याच्या आधी या संवेदनशील कलावंतांनी आपली सर्जनशीलता दाखवून, अशा मुजोर हुकूमशहा फॅसिस्ट संपादक पत्रकारांच्याच निषेधाचे पत्रक तातडीने काढायला हवे होते.


गेल्या आठवड्यात योगेश परळे यांच्या ‘रिझन’ नावाच्या पोर्टलसाठी माझी एक राजकीय मुलाखत घेण्याचे रेकॉर्डिंग पुण्यात चालू होते. त्यात विश्रांतीसाठी थांबलो होतो. तेवढ्यात नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांचा फोन आला. वास्तविक त्यांचा माझा परिचय नाही की कधी भेटलेलो नाही. पण, त्यांनीच ओळख करून दिली आणि माझा मोबाईल क्रमांक त्यांना शोधून मिळवावा लागल्याचेही सांगितले. निमित्त होते, माझ्या एका अशाच व्हिडिओचे. अक्षय बिक्कड नावाच्या तरुणाचे ‘द पोस्टमन’ नामक युट्युब चॅनेल आहे. त्यासाठी त्याने माझी छोटीशी मुलाखत ६०० कलावंतांच्या एका संयुक्त पत्रकाविषयी घेतली होती. देशातल्या या नाट्यचित्रपट इ. क्षेत्रांतील कलावंतांनी ‘मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीत मत देऊ नका’ किंवा ‘मोदींना पराभूत करा’ म्हणून काढलेले ते संयुक्त पत्रक, वाहिन्या व माध्यमातून खूप चर्चेचाविषय झाले. त्याचनिमित्ताने ही मुलाखत अक्षयने घेतली आणि युट्युबवर टाकलेली होती. ती ‘व्हायरल’ झाली. हे ‘व्हायरल’ म्हणजे काय, ते मला अजून न उमजलेले रहस्य आहे. पण, अधिकाधिक बघितल्या गेलेल्या किंवा चर्चिल्या जाणाऱ्या चित्रफितीला ‘व्हायरल’ म्हणतात, असा माझा समज आहे. असो. त्यात मी सरसकट त्या पत्रकावर सह्या करणाऱ्यांची ‘अभिजन बदमाशांची टोळी’ अशी संभावना केल्याने विजय केंकरे विचलित झाले होते. कारण, त्यांचीही त्यावर सही आहे. आपण बदमाश कसे, असा त्यांचा सवाल होता. त्याला उत्तर देताना मी स्पष्ट केले की, “आविष्कार स्वातंत्र्याविषयी हे कलाकार इतकेच संवेदनशील असतील, तर त्यांनी पंतप्रधान मोदी वा त्यांच्या सरकारच्या काल्पनिक गळचेपीपेक्षा आधी प्रत्यक्षात गळचेपी झालेल्या विषयावर निषेधाचा सूर लावला पाहिजे होता. तसा तो लावला नसेल, तर हे ताजे पत्रक निव्वळ भंपकपणा व बदमाशी आहे,” असा माझा आरोप आहे. त्यांनी आधीच्याही विषयावर निषेधाचे पत्रक काढल्याचा खुलासा केला आणि मी थक्कच झालो. हे आधीचे प्रकरण कुठले?

 

दि. १५ फेब्रुवारी, २०१९ रोजी बंगालमध्ये तेथील भाषेत ‘भोबिष्योतर भूत’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. अवघ्या दोन दिवसातच बंगालच्या पोलिसांनी थिएटर मालकांना धमक्या देऊन व ‘वरचे आदेश’ असल्याचे सांगून त्या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले. एका वदंतेनुसार त्या चित्रपटात तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर उपहास व टीका असल्याची चर्चा होती. सरकार व पोलीस त्यांचेच असल्याने त्यांनी ही गुंडगिरी केल्याचा निषेध याच ६०० कलावंतांनी अगत्याने करायला हवा. मोदींच्या काल्पनिक गळचेपी सरकारबरोबरच खऱ्याखुऱ्या गळचेपीचाही निषेध व्हावा, इतकीच माझी अपेक्षा होती. पण, माझ्या तरी वाचनात मागील दोन महिन्यात असे कुठले कलावंतांचे ममतांच्या निषेधाचे पत्रक प्रसिद्ध झालेले नव्हते. म्हणूनच मी या कलावंतांना पक्षपाती ठरवित ‘बदमाशांची टोळी’ म्हटलेले आहे. कारण, त्यांच्या पत्रकबाजी व निषेधातला पक्षपात आजवर कधीही लपून राहिलेला नाही. आपल्या डाव्या विचारसरणीसाठी त्यांनी मोदी वा भाजपच्या विरोधात दंड थोपटून उभे राहण्याचा त्यांनाही पूर्ण अधिकार आहे. पण, त्यांनी राजकीय कार्यकर्ता वा सामान्य नागरिक म्हणून मैदानात आले पाहिजे. ‘कलावंत’ वा ‘अभिजन’ असला मुखवटा लावण्याचे कारण नाही. कारण, ही मूठभर माणसे म्हणजे एकूण भारतीय कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्र अजिबात नसते. पण, त्यांना तसा मुखवटा चढवून त्यामागे आपला डाव्या राजकारणाचा चेहरा लपवायचा असतो. आजवर अनेक राजकीय पक्षांनी व डाव्यांनीही आविष्कार स्वातंत्र्याची जगभर व भारतातही गळचेपी केलेली आहे. त्यामुळे कलावंत म्हणून या मूठभरांनी निषेधाचे सूर लावण्याची मुळातच गरज नव्हती. राजकीय विरोध म्हणून खुलेआम मैदानात यायला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण, बदमाशी तेव्हा होते, जेव्हा तुम्ही आपल्या गुंडांना पाठीशी घालून इतरांच्या गुंडगिरीचा निषेध करता. मला तितकेच समोर आणायचे होते. पण, ते सत्य अनेकांना झोंबले.

 

पण, तेही बाजूला ठेवू. आपण विजय केंकरे यांचा दावा तपासून बघूया. त्यांच्या म्हणण्यानुसार, बंगालमधील चित्रपटाचे प्रदर्शन गुंडगिरी व पोलिसांचा बडगा उगारून बंद पाडण्यात आले, त्याचाही याच ६०० किंवा त्यातल्या बहुतांश कलावंतांनी पत्रक काढून निषेध आधीच केलेला आहे. ते खरे असेल, तर तो निषेध माझ्या वाचण्यात वा बघण्यात कशाला आलेला नाही? मी त्या फोननंतर अनेकांकडे अगदी पत्रकार मित्रांकडे चौकशी केली, तर कोणालाही ममताचा निषेध करणाऱ्या कलाकारी पत्रकाविषयी काडीमात्र माहिती नव्हती. कुठल्या वाहिनीवर बातमी नाही की चर्चा झाली नाही. कुठल्या वर्तमानपत्रात बातमी नाही की अग्रलेख वगैरे आला नाही. मग विजय केंकरे म्हणतात, “ते ममतांच्या निषेधाचे या ‘अभिजन कलाकारां’चे पत्रक गेले कुठे?” केंकरे खोटे बोलतात, असे मी अजिबात म्हणत नाही. त्यांनी सही केली असेल तर निदान त्यापैकी काही कलावंतांनी ममताचा निषेध करणारे पत्रक नक्की निघालेले व माध्यमाकडे पाठवलेले असणार. पण मुद्दा मोदी वा ममतांच्या निषेधाचा नसून, आविष्कार स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आहे. सह्या करणाऱ्या कलावंतांच्या मताची गळचेपी ममतांनी केलेली नाही की मोदींनी केलेली नाही. मोदीविरोधी पत्रक ठळकपणे प्रसिद्ध झाले आणि वाहिन्यांवरही त्याची भरघोस प्रसिद्धी झाली. फक्त तशी कुठलीही प्रसिद्धी ममतांच्या निषेधाला त्याच वाहिन्या व वर्तमानपत्रांनी दिलेली नाही, तर त्याला ममता किंवा मोदींना जबाबदार धरता येणार नाही. ती गळचेपी संबंधित वाहिन्यांचे व्यवस्थापन, संपादक व पत्रकारांनीच केलेली आहे. म्हणून मुद्दा आहे, तो माध्यमांनी कलावंत स्वातंत्र्याचा व मताच्या केलेल्या गळचेपीचा आहे. हे कलावंत खरोखरच आपल्या स्वातंत्र्याविषयी तितकेच संवेदनाशील असतील, तर माध्यमांनी आपल्याच केलेल्या गळचेपीविषयी तितकेच प्रक्षुब्ध व्हायला नकोत का? झाले का?

 

मोदींच्या विरोधाला वारेमाप प्रसिद्धी आणि ममताच्या निषेधाला कचऱ्याची टोपली दाखवली गेली असेल, तर कलावंतांच्या मताची माध्यमांनी गळचेपी केलेली आहे ना? मग नंतर मोदी विरोधातले पत्रक काढून त्यावर सह्या करण्याच्या आधी या संवेदनशील कलावंतांनी आपली सर्जनशीलता दाखवून, अशा मुजोर हुकूमशहा फॅसिस्ट संपादक पत्रकारांच्याच निषेधाचे पत्रक तातडीने काढायला हवे होते. अर्थात, तेही कोणा संपादक पत्रकाराने नक्कीच छापले नसते. पण, नंतर त्याच पत्रकारांना जेव्हा मोदी निषेधाचे पत्रक हवे होते, तेव्हा या ‘अभिजन कलावंतां’ना एक अट माध्यमांना घालत आली असती. आधी आमच्या ममता व माध्यमांची हुकूमशाही यांचा निषेध करणारे पत्रक प्रसिद्ध करा, मगच मोदींच्या निषेधाचे पत्रक तुम्हाला प्रसिद्धीला मिळू शकेल. पण तसेही झालेले नाही. आपली व्यक्तिगत गळचेपी व मुस्कटदाबी निमूट सहन करून या कलावतांनी ‘मोदींना मत देऊ नका’ असले आवाहन करणारे पत्रक माध्यमांना दिले. त्याचा अर्थ तेही तितकेच बदमाश भामटे असतात, जितके माध्यमातले भुरटे मोदींच्या विरोधात उर बडवित असतात. कारण, त्यांना आपल्या वा कुठल्याही आविष्कार स्वातंत्र्य वा गळचेपीशी काडीमात्र कर्तव्य नसते. त्यांच्यासह माध्यमांना व तत्सम पत्रकारांना मोदींच्या निषेधाचे वा विरोधासाठी निमित्त हवे असते. ते निमित्त खरेही असायची गरज नसते. खोटेही आरोप वा निमित्त पुरेसे असते. पडत्या फळाची आज्ञा म्हणतात, तसे हे भुरटे मोदींना शिव्याशाप द्यायला उतावळे असतात. तसे नसते तर माझ्याशी फोनवर संवाद साधताना केंकरेनी मला ममता विरोधातल्या निषेध पत्रकाला प्रसिद्धी मिळाल्याचा दाखला दिला असता. आताही वेळ गेलेली नाही. या गाजलेल्या पत्रकावर सह्या केलेल्या कोणीही कुठल्या माध्यमात त्यांचे ‘भोबिष्योतर भूत’ प्रकरणातले निषेधपत्रक मोदींच्या पत्रकापूर्वी प्रसिद्ध झाले वा वाहिनीवर झळकले, त्याचा दाखला द्यायला हरकत नाही किंवा ज्यांनी त्याला प्रसिद्धी देण्याची टाळाटाळ केली, त्यांचाही निषेध केल्याचा पुरावा जरूर द्यावा. ‘अभिजनां’ना ‘बदमाश’ संबोधल्याची माफी मागण्याच्या मी प्रतीक्षेत बसलो आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@