शिकारी कोण? सावज कोण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2019   
Total Views |


 


“मोदीला शिव्या द्या, माझी निंदा करा, पण भारतीय सेना व शौर्याला अपमानित करू नका,” हे मागील दोन-चार दिवसांतील आवाहन सामान्य भारतीयाच्या काळजाचा ठाव घेणारे आहे. त्यामुळे मोदींची शिकार करण्यास निघालेले विरोधी पक्षाचे शिकारी स्वत:च शिकार होऊन गेलेले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी एक गोष्ट पाच वर्षांपूर्वीच्या प्रचारात नेहमी सांगायचे. काल-परवा त्यांनी ‘इंडिया टुडे’च्या एका समारंभात त्याच गोष्टीची आठवण उपस्थितांना करून दिली. पण, त्यातला आशय किती श्रोत्यांच्या ध्यानात आला असेल अशी शंकाच आहे. कारण, तेव्हाही लोकांनी हसून टाळ्या वाजवल्या होत्या आणि याहीवेळी टाळ्या वाजल्या. ती गोष्ट अशी, दोन मित्र अभयारण्यात शिकारीला जातात आणि शुकशुकाट असल्याने पाय मोकळे करण्यासाठी जीपच्या बाहेर पडून फिरत असतात. त्यांची बंदूक गाडीतच राहिलेली असते आणि अचानक त्यांच्यासमोर वाघ येतो. तो गुरगुरू लागतो, तर दोघेही मित्र भयभीत होतात. त्यांना काही सुचत नाही. अखेर त्यातला धूर्त माणूस सावधपणे आपल्या खिशातला बंदुकीचा परवाना काढून वाघाला दाखवतो. बंदूक आणि परवाना यातला फरक ज्यांना परिणामांच्या संदर्भाने ओळखता येईल, त्यांच्यासाठी अशी गोष्ट बोधकथा असू शकते. ज्यांना आशयाचा गंध नसतो, त्यांच्यासाठी अशा गोष्टी कामाच्या नसतात. ते दुष्परिणामातून सुटू शकत नसतात. सध्या पुलवामाचा हल्ला आणि पाकिस्तानात बालाकोटवर भारताने केलेला हवाई हल्ला, यांचे राजकारण रंगलेले आहे. त्यात या गोष्टीतला आशय व्यवस्थित बसणारा आहे. कारण, यानिमित्ताने देशातील जनतेच्या भावना संवेदनशील झालेल्या आहेत आणि पाकिस्तानला नामशेष करा, म्हणून सामान्यजन वाघासारखे गुरगुरत आहेत. अशा वेळी हल्ला खरेच झाला काय आणि असेल तर खरोखर किती जिहादी मारले गेले? हे प्रश्न क्षुल्लक असतात. जेव्हा सामान्य जनता पाकची नाचक्की बघायला उत्सुक असते, तेव्हा तशा कल्पनेच्या विरोधात बोलणेही वाघाला अंगावर घेण्यासारखे असते. तोच मूर्खपणा मोदीविरोधकांनी मागील दोन आठवड्यांपासून मनसोक्तपणे करत आहेत. त्याची किंमत त्यांना आगामी लोकसभा मतदानात मोजावी लागणार आहे.

 

खुळेपणा एकदा सुरू झाला, मग त्याला कुठे थांबवायचे त्याचा कोणालाही अंदाज येऊ शकत नाही. राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावाच्या वेळी राफेलचा डंका वाजवला. तिथून या खुळेपणाला प्रारंभ झाला होता. त्याला तेव्हा प्रसिद्धी माध्यमांमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली, म्हणून विरोधी पक्ष त्या खुळेपणात खेचले गेले आणि आता कुठे जाऊन थांबावे, याचाही अंदाज त्यापैकी कोणाला येत नाही अशी दशा झालेली आहे. राफेल खरेदीत भ्रष्टाचार वा गफलत झाल्याचा कुठला क्षुल्लक पुरावाही मागील आठ महिन्यात राहुल वा कोणाला देता आलेला नाही. अगदी सर्वोच्च न्यायालयापासून प्रत्येक व्यासपीठावर त्या आरोपाचे रितसर खंडन झालेले आहे. पण, नवे काही खुसपट काढून राहुल नवा आरोप करतात आणि नव्याने खुळेपणा सुरू होतो. मग प्रसिद्धीसाठी मोदी व त्यांच्या सरकारवर कुठलेही बिनबुडाचे आरोप करून खळबळ माजवणे हा नित्याचा उद्योग झालेला आहे. त्याचाच एक भाग असा की, मोदी वा भाजपने काहीही म्हणावे, मग त्याच्यावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह लावायचे हा नियमच झालेला आहे. अशा ओघात पुलवामाची घटना घडली आणि तेव्हा मोदींच्या नावावर खापर फोडणारा नवा विषय विरोधकांना मिळाला. पुलवामानंतर पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ होणार अशी चर्चा चालू असताना, भारतीय हवाईदलाने थेट पाकिस्तानात घुसून हल्ला केला. आता त्याचे कौतुक करायचे, तर मोदींची ‘५६ इंची छाती’ मान्य करावी लागणार, म्हणून आधी मोदी सरकारचे नावही न घेता हवाईदलाचे कौतुक करण्यात आले. पण, सामान्य जनतेसाठी हल्ल्याचे श्रेय तत्कालीन सरकारला मिळत असल्यामुळे विरोधकांना पवित्रा बदलावा लागला.

 

‘हल्ल्याचे कौतुक’ म्हणजे ‘श्रेय मोदी सरकारचे’ असे होत असल्याने हल्ल्याविषयीच शंका घेण्याचा पर्याय शोधण्यात आला. पण, अशा शंकांनी विरोधक सेनेवर हवाईदलावरच संशय घेत असल्याचे आयते चित्र तयार झाले आणि यालाच ‘खुळेपणा’ म्हणतात. हवाईदलाचे ‘अभिनंदन’ करून विषय संपवला असता. पुन्हा विरोधक अन्य आर्थिक-सामाजिक विषयाकडे वळले असते, तर भाजप वा मोदींना त्या हल्ल्याचे राजकीय भांडवल करण्याची संधी नाकारली गेली असती. पण, तितका शहाणपणा विरोधकांकडून कोणाला अपेक्षित आहे? त्यांना मोदींना विरोध करण्यापेक्षा मोदींची हेटाळणी व टवाळी करण्यात अधिक स्वारस्य आहे. साहजिकच हवाईदलासह भारतीय सेनेचे कौतुक भाजप वा मोदींनी करताच, हल्लाच शंकास्पद करण्याशिवाय विरोधकांना पर्याय उरला नाही. वास्तविक तोच मोदी वा भाजपने विरोधकांसाठी लावलेला सापळा होता. जंगलात श्वापदाला मारण्यासाठी सापळा लावला जातो आणि चहुकडून आवज करून त्या जनावराला सापळ्याच्या दिशेने ढकलले जात असते. बेभान होऊन सावज पळत सुटते. मग, सापळ्यात येऊन फसते किंवा बंदुकीच्या आवाक्यात येते. मोदींना प्रत्येक बाबतीत खोटे पाडण्याच्या हव्यासाने बेभान झालेल्या विरोधकांना त्याचे भान राहिले नाही. राफेलच्याच झिंगेत रमलेल्या राहुल गांधींसह काँग्रेसला त्याचे स्मरण उरले नाही. मोदी बोलले की विरोध, या आवेशात मग त्यांनी मोदींच्या पुलवामा किंवा बालाकोटच्या विषयावरही विरोध हाती घेतला आणि व्यवहारात विरोधकांची भाषा सेना व हवाईदलाच्या विरोधात बोलण्यात आली. हवाईदल वा सेनेच्या शौर्याविषयी शंका वा टवाळी केव्हा होऊन गेली तेही अजूनही विरोधकांना समजलेले नाही. बंदूक आणि बंदुकीचा परवाना यातला फरक तसा असतो. विरोधक जनभावनेच्या वाघाला तत्त्वाचे खुलासे देत आहेत. आम्ही सरकारवर टीका करतो आहोत आणि सैन्याच्या शौर्याविषयी आम्हाला शंका नाही, असे लाजिरवाणे खुलासे देण्याची वेळ आलेली आहे. पण, जनमानसात विरोधक सेनेचेही विरोधक वा पाकिस्तानवादी ठरून गेले आहेत. याला म्हणतात सापळा!

 

मोदींनी मोठ्या कुशलतेने व धूर्तपणे विरोधकांच्या हव्यासाचा आपल्या राजकीय सापळ्यासाठी उपयोग करून घेतला आहे. विरोधक आपल्या विरोधात प्रत्येक गोष्टीचा गैरवापर बेभानपणे करतात हे ओळखून, इथे मोदींनी विरोधकांना अतिशय गाफील असताना अलगद पकडले आणि आपल्या सापळ्यात ओढले. पुलवामा घातपाताचा दोष मोदींच्या माथी मारताना हवाई प्रतिहल्ल्याचे श्रेय नाकारण्यात विरोधक इतके वाहवत गेले की कुठला आरोप कोणाविरुद्ध होतो, याचेही भान या अर्धवटांना राहिले नाही. पण, मोदी सावध होते आणि बालाकोट हल्ल्यावर शंका घेतली जाताच मोदींनी सफाईने विरोधकांचा चेहरा सेनाविरोधी किंवा पाकवादी असा रंगवून घेतला. ज्या देशात पाकला साध्या क्रिकेट सामन्यात पराभूत केल्यावर जल्लोश होतो, त्या देशात पाकिस्तानावर हवाई हल्ला भारताने केल्यास किती जोश असेल? त्याच्या विरोधात शंका वा शब्द कोण ऐकून घेईल काय? असली भाषा वाहिन्या वा बौद्धिक वर्तुळात शोभते. सामान्य भारतीयाला तोच देशद्रोह वाटत असतो आणि तिथेच मोदींनी चतुराईने डाव विरोधकांवर उलटवून टाकला आहे. “मोदीला शिव्या द्या, माझी निंदा करा, पण भारतीय सेना व शौर्याला अपमानित करू नका,” हे मागील दोन-चार दिवसांतील आवाहन सामान्य भारतीयाच्या काळजाचा ठाव घेणारे आहे. त्यामुळे मोदींची शिकार करण्यास निघालेले विरोधी पक्षाचे शिकारी स्वत:च शिकार होऊन गेलेले आहेत. हे इतके कमी होते म्हणून की काय, सध्या दिग्विजय सिंग पुन्हा बोलू लागले आहेत. काँग्रेससह विरोधकांची नौका आगामी लोकसभेत बुडवायला एकटे राहुल गांधी पुरेसे असताना असे अनेक दिग्गज मैदानात आलेले असतील, तर त्यांच्या पराभवासाठी कोणी कशाला कष्ट घ्यायला हवेत? गळ्यात हार घालून खाटीकखान्याकडे धावत सुटलेल्या बोकडाला साक्षात ब्रह्मदेवही वाचवू शकत नसतो ना?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@