पवारांना 'पर्याय' हवाय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2019   
Total Views |

modi_1  H x W:



जनतेला ‘पर्याय’ हवा होता, म्हणून मोदींना दिल्लीच्या राजकारणात यावे लागले. म्हणजे मोदीच मुळात राजकीय ‘पर्याय’ म्हणून आलेले आहेत. त्यांना ‘पर्याय’ जनतेला हवा आहे, हे पवारांना कधी उमजले?



महाराष्ट्रात आपली मुलूखगिरी संपवून शरद पवार दिल्लीत गेले आणि त्यांनी तेथील पत्रकारांना देशातील राजकारणाविषयी महत्त्वाची माहिती दिली
. त्यांच्या मते, देशातले विरोधी पक्ष मोदींना पर्याय उभा करू शकलेले नाहीत. विरोधी पक्षांचे हे मोठे अपयश आहे, असा आपला निष्कर्ष पवारांनी सांगितला. पण, त्यात नवीन ते काय? लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून आता सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे आणि मतदारानेच मोदींना पर्याय नसल्याचा कौल दिला आहे. मात्र, तो समजून घ्यायला वा लक्षात यायला पवारांनाच इतका उशीर झाला आहे. कारण, लोकसभेचे निकाल लागल्यावर पवारांना त्यात काहीतरी काळेबेरे दिसलेले होते. त्यांनी भाजप व मोदींचा तो विजय मान्य केला नव्हता किंवा विरोधकांचे अपयश प्रामाणिकपणे मान्य केलेले नव्हते. उलट त्या निकालानंतर आयोगाकडे मतदान यंत्राविषयी तक्रार करण्यात त्यांचाही पक्ष आघाडीवर होता. त्यात तक्रारीत तथ्य असेल, तर ती मोदींची वा भाजपची लबाडी होती. यंत्राद्वारे जनमत आपल्या खिशात घालून मोदी विजयी झालेले होते.



त्यामुळे पर्याय उभा करण्याचा विषयच येत नव्हता
. साहजिकच आज पवार खोटे बोलत असावेत किंवा त्यावेळी लोकसभा निकालानंतर त्यांनी खोटेपणा केलेला असावा. अर्थात, पवार सहसा खरे बोलत नाहीत. ते नेहमीच आपल्या शब्दात अशी गफलत करून ठेवतात की, त्याचे प्रत्येकाला वेगवेगळे अर्थ काढता यावेत. त्यामुळे आताही मोदींना पर्याय उभा करण्यात विरोधक अपयशी ठरले, असे त्यांचे बोलणे किती गंभीरपणे घ्यायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्या अशा बोलण्यातून व वागण्यातून त्यांनी आपल्याच संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा सत्यानाश करून घेतला आहे. त्यामुळे आताही आपण निदान वयाला शोभणारी विधाने करावीत, इतकेही त्यांना भान राहत नसेल तर ठीकच आहे. त्यांच्याकडून तशी अपेक्षाही कोणी करीत नाही, अन्यथा त्यांनी बाकी निष्कर्ष काढण्यापेक्षा अगोदर पर्याय म्हणजे काय, त्याचा तरी अभ्यास केला असता. मग ‘मोदींना पर्याय’ वगैरे मुक्ताफळे उधळली असती. पण, तसे वागण्या-बोलण्यापलीकडे पवारांना तरी पर्याय कुठे आहे?



उदाहरणार्थ
- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यापासून त्यांनी आपल्याला जनतेने विरोधातच बसायचा कौल दिला असल्याची भाषा वारंवार केलेली होती. सरकार कोण बनवणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तरी पवारांनी महायुतीकडे बोट दाखवलेले होते. ती जबाबदारी शिवसेना-भाजपची असल्याचे आवर्जून सांगणारे पवार, तेव्हा प्रत्यक्षात तीन पक्षांची मोट बांधून सत्तासूत्रे आपल्या हाती येण्यासाठी अखंड धडपडत होते. पण, तोंडावर बोलताना मात्र विरोधी पक्षात बसण्याची भाषा चालू होती. आताही ते मोदींना ‘पर्याय’ म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ काय घ्यावा मग? मुळात मोदी भाजपच्या नेतृत्वपदी कशामुळे आले, त्याकडे तरी पवारांनी कधीतरी गंभीरपणे बघावे. त्याला आता सहा वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. २०१३च्या मध्यापासून मोदी राष्ट्रीय राजकारणात उतरले. तेव्हा ते यशस्वी किंवा सत्ताधारी भाजपचे दिल्लीतील राष्ट्रीय नेता वगैरे नव्हते.


देशामध्ये ‘युपीए’ नावाची आघाडी धुमाकूळ घालत होती आणि त्या राजकीय अराजकाला रोखण्यासाठी कुठलाच विरोधी पक्ष पुढाकार घेत नव्हता. बाबा रामदेव किंवा अण्णा हजारे अशा राजकारणबाह्य लोकांना जनतेचा प्रक्षोभ दृगोचर करण्याचे काम हाती घ्यावे लागलेले होते. विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते सरकार विरोधातला आवाज उठवू लागले होते. पण, त्या विस्कळीत राजकीय विरोधाला संघटित करून पर्यायी राजकारणाची दिशा देऊ शकणारा कोणीच नेता दृष्टिपथात नव्हता. त्या परिस्थितीतून नरेंद्र मोदींचा राजकीय क्षितिजावर उदय झाला आणि जनतेला हवा असलेला पर्याय उभा राहिला. थोडक्यात, शरद पवार ज्या युपीएचे मंत्री होते व राज्यकारभारात सहभागी झालेले होते, त्यावर जनतेला ‘पर्याय’ हवा होता, म्हणून मोदींना दिल्लीच्या राजकारणात यावे लागले. म्हणजे मोदीच मुळात राजकीय ‘पर्याय’ म्हणून आलेले आहेत. त्यांना ‘पर्याय’ जनतेला हवा आहे, हे पवारांना कधी उमजले?


खरे सांगायचे तर युपीएमध्ये सत्तेच्या एका नगण्य खुर्चीत बसून पवार दिवाळखोरी निमूटपणे बघत होते. त्यावेळी त्यांना ‘पर्याय हवा’ असल्याचे समजायला हवे होते. मोदींना राष्ट्रीय राजकारणात यावेच लागले नसते. युपीएचा कारभार इतका अराजकाचा झालेला होता की, जनता हैराण होऊन गेली होती आणि रामदेव वा अण्णांमध्ये ‘पर्याय’ बघू लागली होती. अशावेळी पवारांनी पुढाकार घेतला असता, तरी त्यांना मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांना पर्याय उभा करता आला असता. जनतेलाही दिल्लीबाहेरच्या कुणाचा शोध घेण्याची पाळी आली नसती. पण, तेव्हा पवार आपल्या क्षुल्लक सत्तापदासाठी गप्प बसून राहिले आणि मोदींना ‘पर्याय’ होऊन पुढे यावे लागले होते. जनता अजून मोदींना कंटाळलेली नाही. असती, तर ‘चौकीदार चोर हैअसल्या बाष्कळ प्रचाराला प्रतिसाद देऊन मतदाराने भाजपचे केंद्रातील सरकार जमीनदोस्त केले असते.


त्यापेक्षा मतदाराने ‘महागठबंधन’ म्हणून मंचावर हात उंचावणार्‍यांना जमीनदोस्त करून टाकले. त्यातून जनतेने आपल्याला मोदी हवे असल्याचा कौल दिलेला नाही, तर पर्याय म्हणून जे काही दशावतारी नाटक रंगवले जात होते, तसे काहीही नको असल्याचाच निर्वाळा दिला आहे. त्याच्या परिणामी पुन्हा नरेंद्र मोदी एकहाती बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत. त्यातला एक संदेश असा आहे की, पवार ज्याला ‘पर्याय’ म्हणतात, तो पर्याय नसल्याचाही निर्वाळा मतदाराने दिला आहे. त्यामुळे असली विधाने करून उथळ प्रसिद्धी मिळवण्याचा खेळ करण्यापेक्षा पवारांनी राज्यात उभी केलेली ‘महाविकास आघाडी’ चांगले काम करून उत्तम ‘पर्याय’ कसा ठरू शकेल, यासाठी आपली बुद्धी खर्ची घालावी. तेही छोटे काम नाही.


महाराष्ट्रात तीन पक्षांना एकत्र आणून सत्तेत बसवताना पवारांची आपल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री ठरवताना दमछाक झालेली आहे. अजितदादा या पुतण्याला पर्याय असू शकेल, असा कोणी उपमुख्यमंत्री देण्यात ज्यांना अपयश आले आहे. त्यांनी देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानाला पर्याय देण्याच्या गमजा कराव्यात, यातच पवारांची राजकीय प्रगल्भता समजू शकते. बाकीचे विरोधक सोडून द्या, खुद्द पवारांनी गेल्या साडेपाच वर्षांमध्ये भाजप वा मोदींना राजकीय पर्याय उभा करण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले? ममता किंवा जगनमोहन रेड्डी अशा तुलनेने अल्पवयीन नेत्यांनी आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये भाजपशी टक्कर तरी दिली आहे. पण, महाराष्ट्राच्या एका विभागात आपले बस्तान टिकवताना पवारांची दमछाक होते. त्यामुळे ‘पर्याय’ शब्दाची त्यांची व्याख्या कोणती, असा प्रश्न पडतो.


‘जुगाड राजकारण’ करून आयुष्य खर्ची घालण्याला ते यश मानत असतील, तर विरोधकांचे अपयश मोठेच म्हटले पाहिजे. अगदी राहुल गांधीसुद्धा तीन राज्यांमध्ये भाजपशी टक्कर देऊ शकले. पण, ‘स्ट्राँग मराठा’ म्हणून मिरवणार्‍या पवारांना ‘जुगाड’च्या पलीकडे झेप घेता आलेली नाही. दीड वर्षांपूर्वी बंगळुरूच्या मंचावर कुमारस्वामी यांच्या समवेत हात उंचावून पवार स्वत: उभे होते. तेव्हाही त्यांना तोच ‘महागठबंधन’ मोठा पर्याय वाटलेला होता. कारण, त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकणार नसल्याचे त्यांनी एकदाही कुठे म्हटलेले नव्हते. उलट आज ‘महाविकास आघाडी’ची गोधडी शिवतानाचा उत्साहच तेव्हाही त्यांच्या अंगी दिसलेला होता. मग आज हे ‘पर्याया’चे शहाणपण कुठून सुचलेले आहे? कुठेही ‘पर्याय’ उभा करण्यात सातत्याला महत्त्व असते आणि विश्वासार्हता हाच त्याचा मजबूत धागा असतो. त्यातच दिवाळखोरी करण्याला राजकारण समजणार्‍या पवारांनी ‘पर्याय’ हा शब्द वापरण्याने विनोद नक्की होऊ शकतो. त्यामुळे अशा गंभीर राजकीय प्रश्नातले गांभीर्य मात्र संपून जाते.
@@AUTHORINFO_V1@@