नवी समीकरणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019   
Total Views |



शिवसेनेशी वाद नको म्हणूनही भाजपला मनसेशी अनेकदा हातमिळवणी करणे शक्य झालेले नव्हते. आता तो रस्ता नाशिकच्या महापौर निवडणुकीने खुला केला आहे. जिथे शिवसेना आपली भूमी सोडत जाईल, ती व्यापण्याची भाजपला शक्यता नसेल तर मनसेने तिथे आपले बस्तान बसवण्याला भाजपही रणनीती म्हणून प्रोत्साहन देऊ शकतो.



पत्रकारितेत किंवा राजकीय विश्लेषणात नवनवी समीकरणे मांडली जात असतात. विधानसभा निवडणुकांनंतर महायुती शिवसेनेने मोडून मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी नवे राजकीय समीकरण उभे केले. त्याचे अर्थातच पत्रकारांना कौतुक असल्यास नवल नाही. आजवर ज्या पक्षांनी परस्परांचे शत्रुत्वच केले, त्या पक्षांनी एकत्र येऊन सत्तस्थापना करणे, हे नवेच अतर्क्य समीकरण असते. पण, राजकीय घडामोडींमध्ये वा प्रक्रियेमध्ये एका बाजूचे नवे समीकरण उभे राहत असताना, पलीकडे दुसरेही समीकरण आकार घेत असते. सहसा असे समीकरण तत्काळ नजरेत भरणारे नसते, पण आकार घेत असू शकते. १९८४ मध्ये मुंबई-ठाण्यापुरती मर्यादित असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन लोकसभेच्या निवडणुका लढवण्याचे नवे समीकरण प्रमोद महाजन यांनी जुळवले. तेव्हा, त्याचे भवितव्य कुणाला माहिती होते? त्यावेळी वामनराव महाडिक व मनोहर जोशी असे दोन शिवसेना उमेदवार लोकसभेला उभे राहिले, ते भाजपच्या ‘कमळ’ निशाणीवरच लढले होते. अर्थात, ‘राजीव’ लाटेमध्ये सर्व पक्षांचा बोजवारा उडाला आणि भाजपलाही मोठा दणका बसला होता. त्यात सेनेचे दोन्ही शिलेदार ‘कमळ’ निशाणी घेऊनही पराभूत झाल्याचा इतिहास वेगळा सांगायला नको. ते समीकरण फार काळ टिकले नाही आणि काही महिन्यांमध्ये आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सेनेची साथ सोडून शरद पवारांनी जुळवलेल्या ‘पुलोद’ आघाडीशी संगनमत केलेले होते. पण, १९८४च्या त्या पहिल्या युतीमध्ये जे बीज पेरले गेले, त्याचे भरभरून पीक १९८८ नंतरच्या राजकारणात आले. १९९० मध्ये तर त्याच युतीला घाबरून शरद पवार यांनी काँग्रेसला रिपब्लिकन आठवले गटाशी आघाडी करण्यास भाग पाडलेले होते. पण, हे १९८४ मध्ये नगण्य वाटणारे सेना-भाजप समीकरण इतके फलदायी ठरू शकेल, असे महाजन वा बाळासाहेबांना तरी कुठे ठावूक होते? आजची कहाणी थोडीफार तशीच आहे.



आज महायुती मोडून शिवसेना मुख्यमंत्रिपद मिळवायला दोन्ही काँग्रेसच्या गोटात दाखल झालेली आहे आणि शरद पवार त्या नव्या आघाडीचे
‘प्रेरणास्थान’ झालेले आहेत. या हालचाली सुरू असताना एक किरकोळ मराठी पक्षाशी एका लहान महापालिकेसाठी भाजपने महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी हातमिळवणी केलेली आहे. नाशिक महापालिकेत भाजपची संख्या चांगली असली तरी त्यांचेच काही नगरसेवक विधानसभेच्या वेळी बंडाचा झेंडा घेऊन उभे राहिले होते. म्हणून आता आलेल्या महापौर निवडणुकीत भाजप साशंक होता. कारण, मुख्यमंत्रिपद मिळवायला शत्रुत्व घेणार्‍या शिवसेनेने महापालिकेतही भाजपला धडा शिकवण्यासाठी कंबर कसलेली होती. त्यासाठी नाशिकमध्येही दोन्ही काँग्रेससोबत घेऊन भाजपला घाबरवले होते. अशा वेळी अचानक तिथे नगण्य वाटणारा मनसे हा पक्ष भाजपच्या मदतीला धावून आला आणि तिथे भाजपचा महापौर बिनविरोध निवडून येण्यापर्यंत मजल गेली. मुद्दा त्या एका महापौरपदाचा नसून, गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये नामोहरम होऊन गेलेल्या मनसे या प्रादेशिक पक्षाचा आहे, नव्याने आपली जमीन शोधण्याचा आहे. २००९ मध्ये लागोपाठ मोठी मजल मारत निघालेल्या राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष मोदी लाटेनंतर भरकटत गेला होता. त्यातून सावरण्यासाठी त्यांना नवनवे प्रयोग व कसरती कराव्या लागलेल्या आहेत. शिवसेनेशी वाद नको म्हणूनही भाजपला मनसेशी अनेकदा हातमिळवणी करणे शक्य झालेले नव्हते. आता तो रस्ता नाशिकच्या महापौर निवडणुकीने खुला केला आहे. यात आज मनसेची असलेली ताकद दुय्यम असून त्याची विस्ताराची क्षमता मोलाची आहे. मनसे हा शिवसेनेतून बाजूला झालेला गट असून शिवसेनेला पर्यायी असा नवा प्रादेशिक पक्ष होऊ शकतो. जिथे शिवसेना आपली भूमी सोडत जाईल, ती व्यापण्याची भाजपला शक्यता नसेल तर मनसेने तिथे आपले बस्तान बसवण्याला भाजपही रणनीती म्हणून प्रोत्साहन देऊ शकतो.




उदाहरणार्थ
, आयुष्यभर काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशीच दोन हात करून शिवसेना विस्तारलेली आहे. नेत्यांचे आग्रह व अट्टाहास भागवण्यासाठी त्या स्थानिक पातळीवर शिवसैनिकांनी पत्करलेली भांडणे संपत नाहीत. मुंबईत नेत्यांची युती-आघाडी झाल्याने त्या गल्लीबोळातील कार्यकर्ते स्थानिक नेत्यांमधील वैरभावना संपुष्टात येत नाही. साहजिकच, अशा वरवरच्या आघाड्या जमवल्या जातात, तेव्हा त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची पुरती तारांबळ उडत असते. त्यांना हाती काहीही न लागता नुसती शरणागती पत्करणे रास्त वाटत नाही. म्हणूनच असे कार्यकर्ते अन्य मार्ग शोधू लागतात. जर नेते आपल्या मतलबासाठी पक्षाच्या भूमिका सोडून वाटेल ते करणार असतील, तर कार्यकर्तेही तसेच आपल्या सोयीचे पर्याय शोधू लागतात. म्हणूनच या नव्या आघाडीतील शिवसेनेतील चलबिचल महत्त्वाचा टप्पा आहे. त्या शिवसैनिकांची घुसमट वाढत जाणार आहे आणि त्यांची तगमग नव्या मार्गांचा शोध घेऊ लागणार आहे. असा वेगळा मार्ग थोडाफार परिचित असण्याला प्राधान्य आहे. तो परिचित मार्ग ‘मनसे’ आहे. कारण, हा पक्षच मुळात शिवसेनेतून बाहेर पडलेला गट आहे आणि त्याचेही नेतृत्व ठाकरेच करतो आहे. किंबहुना, अनेक शिवसैनिकांना राज यांच्यात आपले लाडके ‘साहेब’ दिसत असतात. त्यामुळे नाराज शिवसैनिकांसाठी ‘ट्रान्झिस्ट कॅम्प’ किंवा ‘पर्याय’ म्हणून मनसे असू शकते. एकीकडे शिवसेनेमधील चलबिचल हळूहळू कानी येऊ लागलेली आहे आणि दुसरीकडे भाजपने मनसेची मदत घेतलेली आहे. त्यात भविष्यात या दोन पक्षांमध्ये नवे काही समीकरण जुळण्याची शक्यताही आकारास येऊ शकते. अर्थात, तेही इतके सोपे काम नाही. कारण, लोकसभा व विधानसभेच्या काळात राज ठाकरे यांनी भाजपवर मुलूखमैदान तोफा डागलेल्या आहेत. त्यामुळेच भाजपच्या गोटात लगोलग दाखल होणे त्यांच्यासाठीही सोपे राहिलेले नाही, पण ज्या गतीने युती मोडून शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस गोटात जाऊ शकली, तसेच मनसेचे काम अवघड मानण्याचे कारण नाही.



अर्थात
, तत्काळ मनसे-भाजप एकत्र येण्याची शक्यता नाही. पण, दरम्यानच्या काळात शिवसेनेतील कुरबुरी जशा वाढत जातील, तसा मनसेकडे शिवसैनिकांचा ओढा वाहू लागणे शक्य आहे. केंद्रातील सत्ता हातात असताना व राज्यातही आपले बळ वाढलेले असताना, भाजप अशा घटनेला प्रोत्साहन देऊ शकतो. त्याला आज शिवसेनेने शत्रूच मानलेले आहे, तर शत्रुपक्ष खच्ची होण्याला भाजपने हातभार लावला, तर कोणी भाजपला दोषही देऊ शकणार नाही. पण जे कोणी सेनेतले नाराज असतील, त्यांना मनसेकडे वळवण्यासाठी भाजप आपली शक्ती लावू शकतो. भविष्यात सेनेऐवजी नवा प्रादेशिक पक्ष म्हणून भाजप मनसेला जवळ घेऊ शकेल. नाराज शिवसैनिक भाजपकडे येण्यात अडचण असली तर त्याला मनसेकडे वळवण्याची रणनीती भाजपही खेळू शकतो. शरद पवारांच्या नादी लागून तरी मनसेने काय मिळवले आहे? मग शिवसेनेतील नाराजी आपले हत्यार बनवून राज ठाकरे कामाला लागले, तर भाजप त्याला अप्रत्यक्षपणे हातभार लावण्याची मोठी शक्यता आहे. त्याची सुरुवात नाशिक येथील महापौर निवडणुकीत झाली नसेल, असे कोणी म्हणू शकेल का? एक निश्चित आहे. भाजपच्या युतीत राहून जी मस्ती शिवसेना दाखवत होती, ती नव्या समीकरणातले मित्र पक्ष अजिबात सहन करणार नाहीत. त्यातूनच शिवसेनेचा संवेदनशील उत्साही कार्यकर्ता अधिक दुखावला जाणार आहे आणि तोच तर मनसेच्या मेगाभरतीचा कच्चा माल असणार आहे. भाजपने त्याला फक्त खतपाणी घालायचे आहे. कारण, भाजपचे चाणक्य राज ठाकरे यांची क्षमता ओळखण्याइतके हुशार नक्कीच आहेत. त्यांना भविष्यातला एक नवा प्रादेशिक पक्ष घडवण्यात जुन्या मित्रपक्षाला धडा शिकवण्याचा डावही खेळता येणार आहे. म्हणूनच एका बाजूला सत्तेचे जे समीकरण जुळवले जात आहे, तेव्हाच सहसा नजरेत न भरणारे दुसरे समीकरणही काळजीपूर्वक तपासले पाहिजे व हिशोबात घेतले पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@