चार भिंतींच्या आत दिल्या जाणार्या, परकीय भाषेतील पुस्तकी माहितीच्या सभोवताल या देशातली तरुणाई गुंतवून ठेवायची आणि ज्ञानार्जनाच्या परिभाषेत त्याला तोलायचे, हे मान्य नव्हतेच कधी त्यांना. मुळात ही लढाईच त्यासाठी सुरू झाली होती. ‘स्टुडंटस् एज्युकेशनल अॅण्ड कल्चरल मुव्हमेंट’ त्यासाठीच तर अस्तित्वात आली. एका शाळेची उभारणी, ही त्या चळवळीची पायाभरणी होती. इमारतीच्या जगावेगळ्या रचनेपासून तर, टाकाऊ वस्तूंचा वापर करून स्वस्त दरात झालेल्या त्याच्या बांधकामापर्यंत... सारेच आगळे होते. सरकारी यंत्रणेपासून तर गावकर्यांपर्यंत... अगदी दूरवरच्या शहरी वस्त्यांमधील नागरिकांपर्यंत सर्वांचाच सहभाग नोंदवीत एक उपक्रम आरंभला होता. आज त्याचे स्वरूप दहा पटींनी वाढले आहे. चळवळीचे आयामही एव्हाना विस्तारले आहेत. अगदी, मॅगॅसेसे पुरस्कार जाहीर व्हावा इतके...
परवा दोन भारतीयांना मॅगॅसेसे पुरस्कार जाहीर झाला अन् सोनम वांगचूक हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. हिमालयाच्या पर्वतराजीत विखुरलेल्या छोट्या छोट्या गावांत जिथे अधीच व्यवस्थांची वानवा आहे, तिथे मुलांचे मातृभाषेशी नाते तोडून शिक्षण प्रणाली उभारणे म्हणजे त्यांची थट्टाच होती. पण, त्यांच्या अडचणींना वाकुल्या दाखवत तोच प्रघात तटस्थपणे सुरू राहिला होता- कित्येक वर्षं. त्याचे परिणाम खुद्द वांगचूक यांनीही भोगले होते. वडील सोनम वांगयाल काश्मीर सरकारमध्ये मंत्री झाले आणि त्यांच्यासोबत वांगचूक यांचीही रवानगी झाली, उलईटेक्पो नावाच्या छोट्याशा गावातून थेट श्रीनगरात. खरंतर लद्दाख याच प्रांताचा एक भाग. पण, इतका दूर फेकला गेलेला की, काश्मीरशी तुलनाही करता येऊ नये. पण, वांगचूक यांना तर क्षणाक्षणाला त्या तुलनेचा सामना करावा लागायचा. कालपर्यंत कधीही न ऐकलेली भाषा कानावर पडायची. काहीच उलगडा व्हायचा नाही. अकारण मूर्खात गणना मात्र व्हायची. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर अक्षरश: संक्रमणाचा काळाकुट्ट काळ होता तो. बहुधा तेव्हापासूनच मनात एका निर्धारानं आकार घेतला होता. भविष्यात जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा भाषेचं हे संक्रमण मोडून काढण्याचा...
लद्दाख भागातल्या, नाव कुणाच्या लक्षातही राहणार नाही, इतक्या छोट्या गावातून बाहेर पडलेले सोनम वांगचूक नंतर अगदी फ्रान्सपर्यंतचा प्र्रवास करून आलेत. नंतरच्या काळात इतरही कित्येक देशांची वारी झाली, पण पुन्हा गावाकडे फिरकणे काही चुकले नाही. त्यांनी, वेगळेपण जपत निर्मिलेल्या शाळेचा प्रयोग एव्हाना सर्वदूर मान्यताप्राप्त होऊ लागला. हळूहळू गावाकडच्या इतरही समस्या ध्यानात घेण्याचे अन् त्या सोडविण्यासाठी धडपडण्याचे केंद्र ठरू लागली वांगचूक यांची ही चळवळ. अलीकडे प्रसिद्धीस आलेला अन् जगातल्या इतरही अनेक देशांनी ज्याचे अनुकरण केले, तो ‘बर्फाचा स्तूप’ हा अशाच प्रकारे लोकसमस्येचे समाधान शोधण्याच्या प्रयत्नांतून साकारलेला एक प्रयोग. हिवाळ्यात पाणी भरपूर असते, पण तेव्हा तेवढ्या पाण्याची गरज नसते. उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता असूनही त्याची उपलब्धता नसते. म्हणून सोनम वांगचूक आणि त्यांच्या सहकार्यांनी हिवाळ्यातले पाणी बर्फाच्या स्वरूपात साठवून ठेवण्याचा आणि उन्हाळ्यात गरमीने वितळू लागले की त्याच पाण्याचा उपयोग करायचा. या परिसरात जवळपास दीड लाख लिटर पाणी बर्फाच्या स्वरूपात साठवले जाऊ लागले अन् नागरिकांची उन्हाळ्यातली पाण्याची समस्या सहज निकाली निघाली. या अफलातून उपक्रमाची ख्याती पंचक्रोशीतच नव्हे, तर जगभरात पसरली. स्वित्झर्लंड सरकारने त्यांच्या देशातही त्याचे अनुकरण करण्यासाठी म्हणून दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार झाला. लद्दाखमधील तरुणांची एक टीम तिथे पोहोचली. इथल्याप्रमाणेच तिथेही ‘आईस स्तूप’ उभा राहिला. फरक फक्त इतकाच की, इथे गरजेपोटी त्याची उभारणी झाली होती अन् तिथे मनोरंजनाकरिता...
हिमालयाच्या कुशीत विसावलेल्या लद्दाखची परिस्थिती, संस्कृती, भाषा, राहणीमान, गरजा, समस्या... सारंच वेगळं. अशा अवस्थेत प्रचलित म्हणून जे शिकवलं जायचं ते इथल्या कशाशीच मेळ खायचं नाही. पोरं ‘ढ’ ठरू लागली. नापास होऊ लागली. यातून एक बाब लक्षात आली होती ती ही की, चूक लोकांची नव्हतीच. तशा समस्या तर खूप होत्या. दळणवळणापासून तर वीज सुविधेच्या अभावापर्यंत. म्हणूनच, आवश्यकता होती ती, व्यवस्था बदलण्याची. पण, नेमकं तेच करायला कुणी धजावत नव्हतं. वांगचूक यांनी त्यासाठीचा विडा उचलला. लोकांना आवडेल अशी शाळा सुरू झाली. त्यांना भावणारे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यांना समजेल असे शिक्षण त्यांच्याशी संबंधित उदाहरणातून दिले जाऊ लागले. ‘पास’ कुणाला म्हणायचं याची परिभाषा बदलली. शिक्षकांनी शिकवलेलं कळत नसेल, तर विद्यार्थ्यांना दोष न देता, त्यांना कळेल अशा तर्हेने शिकवण्याची पद्धती अंमलात आली. परिणाम असा झाला की, इथल्या शाळांमधून उत्तीर्ण होणार्यांचे प्रमाण जे कधीकाळी पाच टक्क्यांच्या पुढे सरकत नव्हते, ते हळूहळू 75 टक्क्यांच्या घरात पोहोचले.
या शाळेत अंमलात येणारा एक प्रयोग आणखीच अनोखा आहे. इथे विद्यार्थ्यांचे ‘सरकार’ अस्तित्वात आहे. दर दोन महिन्यांनी त्यात बदल होतो. सरकारचा प्रमुख असतो. भोजन, उर्जा, स्वच्छता, वित्त असे विविध विभाग सांभाळणारे ‘मंत्री’ असतात. ते त्यांच्या त्यांच्या विभागाचं नियोजन करतात. योजना तयार करतात. त्याची अंमलबजावणी होते. शेवटी अहवाल सादर होतो. अधिक-उण्याची नोंद होते. अवलोकन होते. दूर बसून राजकारण्यांना शिव्याशाप देत राहण्याची सवय जडलेल्या समाजाला, स्वत: जबाबदार्या स्वीकारण्याची, समस्यांचा अभ्यास करण्याची सवय विद्यार्थिदशेपासूनच लावण्याची ही तर्हाही न्यारीच!
मुळात, जरा ‘हटके’ विचार करण्याची रीत हीच या चळवळीची ओळख ठरली आहे. उणे पंधरा डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद होणार्या परिसरात उभारल्या गेलेल्या या शाळेची संपूर्ण व्यवस्था सौर ऊर्जेवर चालते! आहे ना आश्चर्य? पण, हे खरे आहे. परिस्थितीशी लढायचे सोडून रडत बसायला फुरसत कुणाला आहे इथे? इथे तर पडणार्या बर्फाचे ‘मैदान’ तयार करून ‘आईस हॉकी’ खेळणारा मुलींचा संघ तयार केलाय् लोकांनी. ग्लोबल वार्मिंगच्या परिणामस्वरूप हिमालय वितळतोय्. हजारो फूट उंचीवर जागा मिळेल तिथे ग्लेसिअर्स तयार होताहेत. भविष्यात त्याचा धोका होऊ शकतो, ही बाब हेरून इथले विद्यार्थी साध्या, सोप्या अशा विज्ञानाचे प्रयोग स्वत:च्या कल्पकतेतून उपयोगात आणताहेत. सिक्कीम सरकारच्या निमंत्रणावरून लद्दाखच्या विद्यार्थ्यांनी ही कल्पकता अलीकडेच सिद्ध केली आहे... या शिवाय अर्थार्जनासाठी वेगवेगळ्या वस्तू, खाद्य पदार्थ तयार करण्याचा उपक्रम तर आहेच...
जवळपास तीन दशकं होताहेत. वांगचूक यांनी आरंभलेल्या चळवळीला वेगही येतोय् आणि आकारही. सार्या जगाने दखल घेतली त्यांच्या कार्यकर्तृत्वाची. सॅनफ्रान्सिस्कोपासून तर युनेस्कोपर्यंतच्या संस्थांनी पुरस्कृत केले. या कालावधीतला एक प्रयोग मात्र सपशेल फसला- राजकारण करून बघण्याचा. निवडणुकीत लोकांनी साफ नाकारले. नाही म्हटलं तरी त्याची सल घर करून राहिली होती मनात. पण, परवा मॅगॅसेसे पुरस्कार जाहीर झाला अन् सामाजिक कार्यासाठीचा हुरूप नव्याने दुणावला...
आसमां छूकर आने की जिद हैं मुझे
धूप है की छांव हैं, मुझे क्या पता
मुझे अपने उडानों से ही वास्ता
किस तरफ की हैं हवा मुझे क्या पता...