टिटॅनिक आणि अतींद्रिय दृष्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




 


२००० साली आलेला ‘टायटॅनिक’ हा या घटनेवरचा पहिला चित्रपट नव्हे. या अगोदरही त्यावर चित्रपट येऊन गेलेले आहेत. मात्र, संगणक युगात आलेला, ‘टिटॅनिक’च्या ऐवजी ‘टायटॅनिक’ हे फैनाबाज (म्हणजे फॅशनेबल) अमेरिकन नाव घेऊन आलेला हा नवा चित्रपट स्पेशल इफेक्ट्समुळे जगभर गाजला. टिटॅनिकच्या बुडण्याबाबत आजही ब्रिटनमध्ये संशोधन चालूच असतं. वेगवेगळे संशोधक वेगवेगळ्या अंगाने या घटनेचा वेध घेत असतात. काही वेगळे निष्कर्ष हाती आले तर ते आवर्जून प्रसिद्ध केले जातात.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
मॉर्गन रॉबर्टसन या लेखकाने ‘दि रेक ऑफ टायटन’ नावाचं पुस्तक लिहिलं. त्याचं कथानक साधारण असं होतं की, ब्रिटनमधली एक जहाजबांधणी कंपनी एक प्रचंड, अभेद्य, कधीच बुडणार नाही असं प्रवासी जहाज बांधते. त्या जहाजाची खूप जाहिरात करण्यात येते. परिणामी, जेव्हा ते जहाज ब्रिटन ते अमेरिका अशा त्याच्या पहिल्याच समुद्रसफरीवर निघतं, तेव्हा अनेक प्रसिद्ध,श्रीमंत व्यक्ती त्याच्यावरून प्रवासाला निघतात. आर्क्टिक महासागरातून मोठमोठे हिमनग प्रवाहांबरोबर वहात-वहात दक्षिणेकडे अटलांटिक महासागरात येणं हे नेहमीच घडत असतं. अशाच एक हिमनगाशी या जहाजाची टक्कर होते आणि ते फुटतं. अभेद्य म्हटलं गेलेलं जहाज फुटतं आणि अतिशय वेगाने बुडतं. त्याच्यावरील बावीसशे लोकांपैकी पंधराशे लोक बुडतात, सातशे कसेबसे बचावतात. जहाज बुडत असताना मानवी स्वभावाचे विविध पैलू प्रकट होतात. अनेक जण विलक्षण हिंमत दाखवून इतरांचे प्राण वाचवतात; तर अनेक जण भीतीने गळून जाऊन हातपाय न हलवताच मरतातकादंबरी एकंदरीत झकास जमली होती. पण, ब्रिटन-अमेरिकेतल्या एकापाठोपाठ एक अनेक मोठ्या प्रकाशनांनी ती लेखकाला साभार परत पाठवली. कारण एकच-अभेद्य जहाज हिमनगाच्या टकरीने फुटणं शक्यच नाही, म्हणून निराश होऊन लेखकाने हस्तलिखिताचं बाड बाजूला ठेवून दिलं. ते १८९८ साल होतं. 
 
 
तो काळ असा होता की, ब्रिटन-अमेरिकेतल्या जहाजबांधणी कंपन्यांना प्रचंड मोठ्या आणि अत्यंत अभेद्य अशा जहाजनिर्मितीच्या कल्पनेने झपाटून टाकलं होतं. १९१०-११ साली ब्रिटनमधल्या हारलँड अँड वोल्फ कंपनीने टिटॅनिक, ऑल्मिपिक आणि ब्रिटॅनिक अशी तीन भली प्रचंड जहाजं बांधायला सुरुवात केली. यापैकी टिटॅनिक एप्रिल १९१२ मध्ये अमेरिकेच्या सफरीवर निघालं. एकाच वेळी, खलाशी व प्रवासी सर्व मिळून दोन हजारांपेक्षाही जास्त लोकांना सामावून घेणारं ते त्या काळातलं सर्वात विशाल जहाज होतं. शिवाय ते नुसतंच आकाराने मोठं नसून, अत्याधुनिकही होतं. त्याची यांत्रिक, तांत्रिक अंगे अद्ययावत होती. त्याच्यावर सर्व प्रकारच्या सुखसोयींची रेलचेल होती. आर्क्टिक महासागरातून मोठमोठे हिमनग वाहून अटलांटिकमध्ये येणं आणि त्यांचा जहाजांना अडथळा होणं, ही नेहमीच घडणारी गोष्ट होती. हिमनगाचा एक दशांश भागच पाण्यावर दिसतो, पण नऊ दशांश भाग पाण्याखाली असतो, अशा आशयाच्या म्हणी, वाक्प्रचार इंग्रजी भाषेत निर्माण झालेत, ते याच भौगोलिक वस्तुस्थितीमुळे. तर अशा हिमनगाशी टक्कर झाली, तरीही टिटॅनिक बुडणार नाही, ते अभेद्य आहे, अशी भरपूर जाहिरात करण्यात आली होती. साहजिकच अनेक हौशी प्रवासी केवळ मौज म्हणून, समुद्रसफरीची मजा घेण्यासाठी म्हणून टिटॅनिकवरून अमेरिकेला निघाले होते. त्याशिवाय कंपनीला आणखीही एक विक्रम करून दाखवायचा होता. तो म्हणजे कमीत कमी वेळात अटलांटिक महासागर ओलांडणे. शक्य तितक्या जलद अमेरिकेला पोचा, अशी कंपनीची कप्तानाला सक्त सूचना होती. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात, जल्लोषात टिटॅनिकने ब्रिटनचा किनारा सोडला. अमेरिकेत त्याच्या स्वागताची अशीच टोलेजंग तयारी करण्यात आली. पण, टिटॅनिक अमेरिकेला पोहोचूच शकलं नाही. अटलांटिक महासागरात त्याची एका हिमनगाशी टक्कर झाली. अभेद्य म्हणून गवगवा केलं गेलेलं जहाज कागदाच्या होडीसारखं फाटलं-फुटलं आणि वेगाने समुद्राच्या तळाशी गेलं. खलाशी व प्रवासी मिळून बावीसशे लोकांपैकी पंधराशे लोक बुडाले; सातशे बचावले. ब्रिटनमध्ये या घटनेने अक्षरश: हाहा:कार उडाला. तो दिवस होता १४ एप्रिल १९१२. त्या काळात ब्रिटन ही स्वत:ला ‘समुद्रस्वामिनी’ म्हणवणारी जागतिक महासत्ता होती. आपल्या एका ख्यातनाम जहाजबांधणी कंपनीचे अभेद्य म्हटलं गेलेलं जहाज पहिल्याच फेरीत बुडावं, हे ब्रिटनला फार झोंबलं. त्यामुळे त्याबाबत चौकशी, कसून चौकशी, पुन: पुन्हा चौकशी वगैरे सगळं होऊन वेगवेगळे निष्कर्ष काढण्यात आले. अर्थात त्यामुळे वस्तुस्थिती बदलली नाही. तत्कालीन ब्रिटिश प्रसारमाध्यमांत आणि एकंदर समाजजीवनात मात्र या घटनेने जबरदस्त खळबळ उडवून दिली.

 

काही प्रकाशकांना मॉर्गन रॉबर्टसन आणि त्याच्या हस्तलिखिताची आठवण झाली. त्याचा शोध घेण्यात आला. पण, तो तर केव्हाच मेला होता. मग त्याच्या वारसांकडून ते हस्तलिखित मिळवून ’दि रेक ऑफ टायटन’ ही कादंबरी प्रसिद्ध करण्यात आली. प्रकाशक आणि नंतर वाचक ती वाचून कमालीचे चकित होऊन गेले. लेखकाने १८९८ साली रचलेल्या कथानकातील घटना जवळपास जशाच्या तशा १९१२ साली प्रत्यक्षात घडल्या होत्या. पण, हे कसं काय, का, या प्रश्नांची उत्तरं द्यायला मॉर्गन रॉबर्टसन जिवंत नव्हता. टिटॅनिक सफरीवर निघालं तेव्हा आणि ते ज्या दिवशी बुडालं त्या दिवशी ब्रिटनमध्ये अनेकांना काहीतरी अनिष्ट, विपरीत घडणार अशा मानसिक सूचना मिळत होत्या. एका माणसाला तर तो घराच्या गच्चीत उभा राहून खाली रस्त्यावरची रहदारी पाहात असताना, एकाएकी एक भलं प्रचंड जहाज बुडत आहे आणि प्रवासी मदतीसाठी ओरडत आहेत, असं दृश्यच दिसलं होतं. तो माणूस चकित झाला. भरदिवसा आपल्याला अशी विचित्र स्वप्नं पडावीत, या चिंतेने तो स्वत:च्या प्रकृतीबद्दल मनोमन घाबरलाही होता. पण, दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातल्या बातम्या वाचल्यावर तो हादरलाही नि पुन्हा एकदा चकितही झाला. हजारो कि.मी. अंतरावर घडत असलेली ती घटना आपल्याला का दिसली, हे त्याला कळेना. मागाहून त्याच्या या अनुभवाबद्दल संशोधन करणाऱ्या कोणत्याही मानसशास्त्रज्ञालाही याचं उत्तर देता आलं नाही.

 

मॉर्गन रॉबर्टसन हा लेखक होता. १८९८ साली त्याने कल्पनेने रचलेल्या कथानकातील घटना १९१२ साली जवळपास जशीच्या तशी घडून आली. त्या घटनेची सूचना मनाच्या पातळीवर अनेक सर्वसामान्य नागरिकांना मिळाली. या सर्व गोष्टींची रीतसर नोंदणी आणि वैज्ञानिक छाननी करण्यात आली. परंतु, त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकला नाही. मग जर सर्वसामान्य नागरिकांनाही भावी काळातल्या काही घटनांच्या पूर्वसूचना मिळू शकतात, तर तपश्चर्येने म्हणजे स्वत:लाच ‘प्युरिफाय’ करण्याच्या ‘सायंटिफिक प्रोसेस’ ने ज्यांचं मन, बुद्धी आणि चित्तवृत्ती अतिशय सूक्ष्म झालेल्या आहेत अशा व्यक्तींना भविष्यकालीन घटनांचे ज्ञान का बरं होऊ नये? महर्षी वाल्मिकी हे तर त्रिकालज्ञानी म्हणजे भूत, भविष्य, वर्तमान या तीनही काळाचे द्रष्टे होते. मग त्यांनी रामायण अगोदर लिहिलं आणि नंतर त्याप्रमाणे घटना घडल्या, ही हिंदू धारणा अशास्त्रीय समजण्याचं कारण नाही. तर ते असो. टिटॅनिक बुडणं ही घटना आजही पाश्चिमात्य मानसिकतेत खोल रुतून राहिलेली आहे. मॉर्गन रॉबर्टसनच्या पुस्तकाप्रमाणेच इतरही अनेकांची पुस्तकं आली. तीही गाजली. २००० साली आलेला ‘टायटॅनिक हा त्या घटनेवरचा पहिला चित्रपट नव्हे. या अगोदरही त्यावर चित्रपट येऊन गेलेले आहेत. मात्र, संगणक युगात आलेला, ‘टिटॅनिक’च्या ऐवजी ‘टायटॅनिक’ हे फैनाबाज (म्हणजे फॅशनेबल) अमेरिकन नाव घेऊन आलेला हा नवा चित्रपट स्पेशल इफेक्ट्समुळे जगभर गाजला. टिटॅनिकच्या बुडण्याबाबत आजही ब्रिटनमध्ये संशोधन चालूच असतं. वेगवेगळे संशोधक वेगवेगळ्या अंगाने या घटनेचा वेध घेत असतात. काही वेगळे निष्कर्ष हाती आले तर ते आवर्जून प्रसिद्ध केले जातात.

 

नुकताच असाच एक नवा संशोधन निष्कर्ष प्रसिद्ध झाला. विशेष म्हणजे तो जहाजबांधणी कंपनीच्याच कागदपत्रांवरून काढण्यात आला आहे. टिटॅनिक का बुडाली? या प्रश्नाचा शोध घेणारा एक संशोधन गट सरळ उत्तर आयर्लंडमधल्या बेलफास्ट शहरातल्या हारलँड अँड वोल्फ शिपबिल्डिंग कंपनीच्या दफ्तरीच दाखल झाला. आपल्याकडची एखादी कंपनी असती तर अशा शोधगटाला दरवाजातूनच हाकलून देण्यात आलं असतं. पण, हारलँड कंपनीने चक्क या शोधगटाला आपले कागदपत्र खुले करून दिले. त्या कागदपत्रांच्या छाननीवरून या शोधगटाने असा निष्कर्ष काढला की, कंपनीने हलक्या दर्जाचे रिव्हेट्स वापरले. हिमनगाच्या टकरीने ते निखळले. परिणामी, जहाजाच्या फळ्या सुटल्या आणि पाणी आत घुसलं.

 

रिव्हेट म्हणजे फळ्या सांधणारा एक विशिष्ट प्रकारचा खिळा. आपल्याकडे याला सर्रास ‘रिबेट’ म्हणतात. कंपनीला लवकरात लवकर जहाज बांधून पूर्ण करायचं होतं. टिटॅनिक, ऑल्मिपिक आणि ब्रिटॅनिक या जहाजांची बांधणी हा कंपनीचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. इतकी प्रचंड, इतकी अत्याधुनिक, अद्ययावत जहाजं आतापर्यंत जगात कुणीही बांधलेली नव्हती. त्यामुळे इतर कुणी ती बांधण्यापूर्वी आपण ती पूर्ण करायचीच, असा चंग कंपनीने बांधला होता. हा व्यावसायिक स्पर्धेचा भाग होता. एकाच वेळी तीन जहाजं बांधायला घेतल्यामुळे सुटे भाग पुरवणार्‍या संस्थांवर कामाचा ताण आला. एका जहाजाला किमान ३० लाख रिव्हेट्स लागत होते. म्हणजेच कंपनीला एकूण ९० लाख ते १ कोटी रिव्हेट्स लागणार होते. एवढा पुरवठा करणं एकाच फाऊंड्रीला शक्य नव्हतं. मग वेगवेगळ्या छोट्या फाऊंड्र्यांना कंत्राटे देण्यात आली. त्यांच्या कारागीरांना या कामाचा अनुभव नव्हता. फळ्यांना रिव्हेट्स मारणं हेही कौशल्याचे काम आहे. ते करू शकणारे कसबी कारागीर पुरेसे नव्हते. या सगळ्या गडबडीत कामाचा दर्जा खालावला आणि पुढची दुर्घटना घडली, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. आता या संदर्भात कंपनीची प्रतिक्रिया अजून प्रसिद्ध झालेली नाही. आपल्या दृष्टीने तर हा सगळा प्रकारच आश्चर्यकारक आहे. कारण, सार्वजनिक कामं लो-स्टँडर्ड, सब-स्टँडर्डच करायची, असा आपल्याकडचा शिरस्ता आहे. तरीही भारत देश चालतो आहे, हीच दैवी कृपा आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@