पंडित नेहरूंचा दलाई लामाकृत उद्धार...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2018   
Total Views |

 

 
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंना या देशातल्या कॉंग्रेस समित्यांची पसंती नव्हतीच कधी. त्या समित्यांनी तर पहिल्या क्रमांकाचे मत सरदार पटेलांना दिले होते. पण, गांधीजींच्या आग्रहावरून पटेलांनी माघार घेत नेहरूंचा मार्ग मोकळा केला. दरम्यान, मोतीलाल नेहरूंनीही एव्हाना गांधींचे मन वळविण्यासाठी नाना क्लृप्त्या करून झाल्या होत्या. दुसरीकडे देशाच्या फाळणीचा गंभीर प्रश्न संपूर्ण देशासमोर उभा ठाकला होता. मोहम्मद अली जिन्ना यांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होऊ द्यावे. नेहरूंना त्यानंतर संधी द्यावी, असाही प्रस्ताव खुद्द महात्मा गांधींनी मांडला होता. पण, पंतप्रधान बनण्याच्या त्यांच्या स्वत:च्या खुमखुमीपुढे फाळणीचा मुद्दा फार छोटा ठरला. देशाचे तुकडे करणे सहज मान्य झाले अन्नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले- बहुमताचे दान पारड्यात नसतानाही...!
 

हा इतिहास कालपर्यंत जे लोक सांगत होते, त्यांना विचारांच्या एका विशिष्ट पठडीत तोलून बेदखल ठरविणार्यांची गर्दी कमालीची प्रभावी ठरली होती. पण, परवा खुद्द दलाई लामा यांनीच हा इतिहास जगासमोर मांडत, नेहरूवादाच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या अन्त्या घराण्याच्या आरत्या ओवाळणारे सारेच एकजात तोंडघशी पडले. मोतीलाल यांचा अपवाद सोडला, तर नेहरू घराण्याचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातीलप्रत्यक्ष योगदानकधीच वादातीत राहिले नाही. इतर नेत्यांच्या, विशेषत: पटेलांच्या तुलनेत त्यांचे नेतृत्व सर्वमान्य राहिल्याचीही वस्तुस्थिती नव्हती कधी. पण, तरीही जवाहरलालांनी देशाचे पंतप्रधान होणे ही अपरिहार्यता ठरली. सत्ता हातात आल्यानंतरच्या काळात पणाला लागलेले त्यांचे राजकीय चातुर्य आणि व्यवस्थितपणे मिळवलेली जनमानसावरील पकड मात्र कमालीची ठरली. इतकी, की अगदी परवापरवापर्यंत या देशाच्या सत्तेची सूत्रं त्यांच्या वारसदारांकडे कायम राहिलीत.

 

हस्तगत केलेल्या सत्तेच्या दोर्या कायम आपल्याच ताब्यात राहतील यासाठीची खेळी, ही राजकीय गरज म्हणून मान्य करता येईलही एकवेळ, पण त्या काळात झालेल्या चुकांचे, धसमुसळ्या धोरणांचे, धरसोड वृत्तीचे समर्थन कसे करायचे? तिबेटचा जो प्रदेश ब्रिटिशांनी केलेल्या करारानुसार भारताच्या अधिपत्याखाली राहिला होता, तो विनासायास चीनच्या चरणी अर्पण करण्याची भूमिका, हे तर त्याचे धडधडीत उदाहरण आहे. ब्रिटिश सरकारच्या धर्तीवर स्वतंत्र भारत सरकारनेही आपली बाजू घ्यावी आणि तिबेटवरचे चिनी आक्रमण परतावून लावण्यास मदत करावी, ही दलाई लामांची अपेक्षा नेहरूंनी उडवून लावली. तसे करणे म्हणजे दुसर्या देशावर साम्राज्यवादी पद्धतीने अधिकार गाजविण्याची प्रवृत्ती असल्याचा साक्षात्कारही त्यांना त्या वेळी झाला होता. मग चीनने तिबेटच्या बाबतीत केले ते काय होते, याचे उत्तर मात्र ना नेहरूंना देता आले, ना त्यांच्या समर्थकांना. जे सार्या जगाला अपेक्षित होते, त्याच्या नेमके उलट नेहरूंनी तिबेटबाबत केले... जगाच्या दृष्टीने शांतिदूत ठरण्याच्या त्यांच्या अट्टहासानंतरही त्यांच्या कार्यकाळात तीन तीन युद्धे भारताच्या वाट्याला आलीत. जगाने मान्यता दिलेले भारतातील विलीनीकरण अमान्य करून जनमताचा अफलातून आग्रह धरत, काश्मीरच्या प्रश्नाचे त्यांनी जे भिजत घोंगडे ठेवले ते अजूनही निस्तरणे जिकिरीचे होऊन बसले आहे भारतासाठी.

 

नक्षलवादी असोत की मग देशांतर्गत फोफावलेल्या अनेकानेक फुटीरतावादी संघटना, या नेमक्या कुणाच्या चुकीच्या धोरणांचा परिपाक होत्या, हेही आता लपून राहिलेले नाही. स्वत:च्या कुठल्याशा जगावेगळ्या संकल्पनांचा आग्रह धरत अन्त्यामागे सारा देश फरफटत नेण्याचा दुराग्रह करीत पळत राहण्याच्या त्यांच्या अनाकलनीय कार्यपद्धतीमुळे हा देश परिपूर्ण असल्याचेही त्यांनी कधी मानले नाही. वैश्विक पातळीवरही त्याच हास्यास्पद प्रमेयांची मांडणी ते करीत राहिले. ‘वुई आर द नेशन इन मेकिंगचा त्यांनी कायम चघळलेला धोशा हादेखील त्याचाच परिणाम आहे. इंग्रजी शिक्षण, त्याच वातावरणात झालेले पालनपोषण, यामुळे इंग्रजीच्या तुलनेत भारतीय भाषा त्यांनी कायम कमी मापातच तोलल्या. भाषावार प्रांतरचनेपासून तर स्वत:च्या इच्छेखातर सारा देश रशियाच्या दावणीला बांधण्यापर्यंतच्या कितीतरी निर्णयांची लांबलचक अशी यादी तयार होईल, जी देशहितापेक्षाही पंडित नेहरूंना व्यक्तिश: हवीत म्हणा वा आवडलीत म्हणा, म्हणून स्वीकारली गेलीत. आजही त्याचे नकारात्मक पडसाद सर्वदूर उमटलेले दिसताहेत. त्यासाठी कुणाला दोष द्यायचा आणि कुणाला जबाबदार ठरवायचे, हे नेहरूभक्तांनीच सांगितले पाहिजे.

 

असं म्हणतात की, तत्कालीन हिंदू नेते इतक्या सहजासहजी पाकिस्तानचे दान पदरात टाकतील, याची तर खुद्द बॅरिस्टर जिन्नांनाही अपेक्षा नव्हती. केवळ धर्माच्या आधारावर एखादा देश तोडणे एवढे सोपे थोडीच असते, इतके साधे गणित त्यांनी त्यांच्या मनाशी मांडले असावे. त्यामुळे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनण्याचा प्रस्ताव जिन्नांनी सहज स्वीकारला असता, हा कयास अगदीच चुकीचा नव्हता. एरवी मुस्लिमांचे हित अन्तेवढ्यासाठी चक्क एका वेगळ्या देशाची निर्मिती, या बाबी त्यांच्यातरी अजेंड्यावर कुठे होत्या? पण, झाले उलटेच. मागणी मान्य झाली त्यांची. पण, देश फाळणीच्या उंबरठ्यावर असतानाही, कुणाच्यातरी हट्टापोटी, पंतप्रधानपदासाठीचा जिन्नांच्या नावाचा प्रस्ताव बारगळला... हेच कटु सत्य आहे. पण, नेहरू घराण्यातील सदस्यांनी आणि बाहेरच्या जगातील त्यांच्या चेल्याचपाट्यांनी हे सत्य दडपत, नेहरू घराण्याची भलावण करण्यात धन्यता मानली. स्वत: पंडित नेहरूही त्यात कधी मागे राहिले नाहीत. विद्यमान पंतप्रधानांच्यामन की बातची टर उडविणार्या तमाम जनांनी एकदा प्रसिद्धीचे नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी अनुसरलेले तंत्र ध्यानात घ्यावे. तत्कालीन रेडिओ, प्रकाशित झालेली पुस्तकं आदी बाबींचा धांडोळा घेतला की, स्वत:ची स्वच्छ, चारित्र्यवान, शांततावादी अशी प्रतिमा तयार करवून घेण्यासाठीची पंडितजींची धडपड आपसूकच उघडी पडते.

 

ज्यांनी इतिहासाची ही काळी पाने चाळत, वास्तव समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला, ते बेमालूमपणे गद्दार ठरवले गेले. नेहरूंची निंदानालस्ती म्हणजे देशाचा स्वातंत्र्यलढा लढणार्या कॉंग्रेसवर गदा आणण्याचे षडयंत्र असल्याच्या थाटातला देखावा बेमालूमपणे करण्यात आला. बरं, कालपर्यंतची परिस्थिती अशी होती की, हिंदुत्ववादी, संघवाले म्हटलं की, रान मोकळे असायचे सर्वांना शिवीगाळ करायला. आता नेहरूंविरुद्ध ब्र काढायचा म्हटलं तर लोक बिनदिक्कतपणे मोदीभक्त ठरवून टाकतात. त्यामुळे सत्य मांडले गेले तरी हवेत उडवला जायचा मुद्दा. खिल्ली उडविली जायची. खरा असूनही बेदखल राहायचा आरोप! नेहरूंनी घालून ठेवलेल्या घोळाचे गांभीर्य कधी देशाच्या ध्यानातच येऊ दिले नाही कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट विचारांच्या राज्यकर्त्यांनी. परिणामी, करूनसवरून झाकलेलेच राहिले त्यांचे सारे कारनामे!

 

पण, परवा दस्तुरखुद्द दलाई लामांनी जिन्नांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा चर्चेत आणला. या पदावर विराजमान होण्यासाठीची नेहरूंची लगीनघाईही त्यांनी नको तितक्या उघडपणे मांडली. त्या वेळी महात्मा गांधी काय म्हणाले होते, हे सांगण्याचा प्रयत्नही दलाई लामांनी केला. याचा परिणाम असा झाला की, कालपर्यंत जे झाकून ठेवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसजनांनी केला होता, तेच पितळ उघडे पडले. एका नेत्याच्या हट्टापायी फाळणी स्वीकारावी लागलेला देश हा. तरीही त्या नेत्याला, त्याच्या कुटुंबीयांना देव मानून बसलेला. निदान, दलाई लामांनी केवळ सत्य उघड केलेले नाही, पुरता उद्धार केलाय्नेहरू घराण्याचा. परवाच्या त्यांच्या विधानानंतर तरी डोळे उघडावेत भारतीय समाजाचे...

@@AUTHORINFO_V1@@