पुरोगामी मनुवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2018   
Total Views |
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका संपून आता दहा महिन्यांचा काळ उलटला आहे. त्या निवडणुकीत भाजपाने अपूर्व यश संपादन केल्यावर एक नवी राजकीय मोहीमच सुरू झालेली होती. त्यात निवडणूक आयोग व मतदानयंत्रावरच शंका घेण्याची स्पर्धा चालू झालेली होती. सर्वात आधी गुडघ्याला बाशिंग बांधून मुख्यमंत्री व्हायला सज्ज असलेल्या मायावतींनी त्याचा उल्लेख केला. मुस्लिमबहुल भागातही भाजपा जींकूच कसा शकतो, याचे कोडे बहेनजींना उलगडले नव्हते. तर त्यांनी तिथली मते भाजपाला मिळण्याची तांत्रिक सुविधा यंत्रात करून मतांची चोरी झाल्याचा खुला आरोप केला होता. विनाविलंब तो आरोप आम आदमी पक्षाचे निराश नेते अरविंद केजरीवाल यांनी उचलून धरला. त्यांना पंजाब आपल्या खिशात असल्याचा भ्रम झाला होता. पण, तिथे सत्ताभ्रष्ट होऊनही अकाली दलाने समज दाखवली आणि प्रथमच लढूनही विरोधी पक्ष झालेल्या आम आदमी पक्षाने मतदान यंत्रात गडबड असल्याचा आक्षेप घेतला होता. पुढे जाऊन त्यांचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी प्रात्यक्षिकच सादर केले. पण, त्यात गडबड होते, असा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाहीत. त्याच्याही पुढे जाऊन निवडणूक आयोगाने यंत्र हाती दिल्यास त्यात गफलत करून दाखवण्याचे आव्हानही या पक्षाने दिलेले होते. अर्थात आयोगाने त्याचा जाहीर इन्कार केला. पण, ठरल्या दिवशी ज्यांना हवे त्यांच्यासाठी असे यंत्र लोकांच्या साक्षीने देऊ, असेही सांगितले होते. पराभव पचवण्याची शक्ती नसलेल्या बहुतेक पक्षांनी आपले आरोप चालू ठेवले. मात्र, आयोगाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचे आव्हान कोणी पेलू शकला नाही. आयोगाने ठरल्या दिवशी तशा प्रात्यक्षिकाची सुविधा दिलेली होती. पण, एकही पक्षाचा प्रतिनिधी तिकडे फिरकला नाही. मात्र त्यानंतरही असे आरोप प्रच्छन्नपणे चालूच राहिले. आज राजस्थान व बंगालच्या पोटनिवडणुकीत त्याच यंत्रांनी भाजपाचे उमेदवार पराभूत करून दाखवलेले आहेत.
पराभव पचवण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये नसते त्यांना यशही पचवता येत नाही. म्हणून तर आम आदमी पक्ष असो किंवा इतर पक्ष असोत, त्यांनी मतदान यंत्रासह थेट निवडणूक आयोगावरही आरोप केले होते. अर्थात, केजरीवाल हा मुळातच ताळतंत्र नसलेला माणूस आहे. २०१५ सालात दिल्ली विधानसभेची मध्यावधी निवडणूक चालली असतानाही त्याने असाच बेछूट आरोप केलेला होता. पण, प्रत्यक्ष मतमोजणी झाली तेव्हाचे निकाल धक्कादायक होते. कॉग्रेस सफाचाट झाली आणि काही महिने आधी सर्व आठही लोकसभा जागा जिंकणाऱ्या भाजपालाही कशाबशा तीन जागा जिंकता आल्या. उरलेल्या ६७ जागा एकट्या आम आदमी पक्षाला मिळाल्या. तेव्हा मात्र केजरीवालने यंत्राविषयी चकार शब्द उच्चारला नाही. पण, ती बाष्कळ बडबड कोणी मनावर घेतली नव्हती. मात्र, २०१७ च्या आरंभी उत्तरप्रदेश निकालानंतर मायावतींनी तोच उच्चार केला आणि बाकीच्या पक्षांनी तो आरोप उचलून धरला. कारणही स्पष्ट होते. लोकसभेत भाजपाने मिळवलेले यश अनेकांना चमत्कार वाटला होता. मग तीन वर्षांनंतर त्याचीच विधानसभेत पुनरावृत्ती झाल्याने सर्वांना त्याचे नवल वाटले होते. पण, असेच चमत्कार यापूर्वीही झालेले असताना अशी भाषा निराशाग्रस्त भावनेची साक्ष होती. २००७ सालात कोणाला मायावती स्वबळावर बहुमत मिळवतील असे वाटले नव्हते आणि त्यांना ते यश मिळाल्यावर त्याला सोशल इंजिनीयरिंगचे लेबल लावण्यात आले. त्याचीच पुनरावृत्ती समाजवादी पक्षाने २०१२ सालात केली, तेव्हा कोणाला मतदान यंत्राविषयी शंका आलेली नव्हती. मग भाजपाच्या २०१७ च्या यशाविषयी शंका घेण्याचे काय कारण होते? कारण सत्तेत असूनही गोव्यात भाजपाने मते व जागा गमावल्या होत्या आणि तेच पंजाबमध्ये घडलेले होते. पण, गोव्यात त्यांनी आपल्या हिकमतीने सरकार स्थापन केलेच. निराशाग्रस्तांना अपयश पचवता येत नसते. ते कोणीतरी बळीचा बकरा म्हणून शोधू लागतात.
उत्तरप्रदेश निकालानंतर त्या आरोपाची वारंवार पुनरावृत्ती होत राहिली. गुजरात विधानसभेच्या वेळी यंत्रावर शंका घेतल्या गेल्या. पण, भाजपाच्या जागा घटल्यावर मात्र कोणी यंत्राविषयी बोलायला तयार नव्हता. आधीच्या चर्चा ऐकल्या तर भाजपाला नेहमी इतक्या जागा मिळाल्या, तरी तो यंत्राचाच चमत्कार असेल, असली भाषा वापरली जात होती. म्हणजे तर्कशास्त्र एकाच निकषावर चालत होते. भाजपाचा पराभव झाला तरच मतदान यंत्र व निवडणूक योग्य झाली, असा तो तर्क आहे. एकूण लोकशाही वा तिच्या व्याख्या अशा केल्या जात आहेत, की त्यात भाजपाला भाग घेता येईल. पण, भाजपा जिंकू शकत नाही, त्याचे नाव लोकशाही असते. जिथे भाजपा जिंकेल तिथे लोकशाहीचा मुडदा पाडला जात असतो, हा आजकालचा पुरोगामी सिद्धांत झाला आहे. आताही राजस्थानमध्ये भाजपाने लोकसभेच्या दोन व विधानसभेची एक जागा गमावली आहे, तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कमालीचे सुखावले आहेत. त्यांनी भाजपाची विचारधारा संपूर्णपणे झिडकारली गेल्याचा दावा केला आहे. पण, तो तर्क व्यक्त करताना त्यांना आपणही बंगालमध्ये दोन मतदारसंघात कुठल्या कुठे फेकले गेलो, त्याकडे बघायची हिमत झालेली नाही. मागल्या खेपेस म्हणजे २०१६ च्या आरंभी दोन वर्षांपूर्वी नवापारा या काँग्रेसने जिंकलेल्या जागी आता पोटनिवडणूक झाली, त्यात काँग्रेसच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आहे. उलट तिथे भाजपाने मुसंडी मारून डाव्या आघाडीपेक्षा अधिक मते मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. मग त्याचा अर्थ, काँग्रेसला मतदाराने पूर्ण झिडकारले, असा घ्यायचा काय? आणि तसे असेल तर राजस्थानात त्या पक्षाने मिळवलेल्या विजयाचे काय करायचे? राहुलना राजस्थानातील आपल्या पक्षाचे यश पचवता आलेले नाही, इतकाच अशा प्रतिक्रियेचा अर्थ होऊ शकतो.
नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून देशातील एकूण पुरोगामी लोकांचे डोके किती फिरलेले आहे, त्याची साक्ष यातून मिळते. त्यांना आपला पराभव किंवा विजयही पचवणे अशक्य होऊन बसलेले आहे. त्यामुळेच अशा बाष्कळ प्रतिक्रिया दिल्या जात असतात. पण, म्हणूनच हे निमित्त धरून मतदान यंत्रावर संशय घेणाऱ्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे. उत्तरप्रदेश वा दिल्लीच्या पालिका मतमोजणीवर शंका घेत ज्यांनी यंत्राला दोष दिला होता, त्यांचा तर्क आता काय आहे? तेव्हा यंत्रांनी व आयोगाने गडबड केली असेल, तर आता त्यांनी भाजपाशी वैर पत्करले आहे काय? आता काँग्रेसला यश मिळत असेल, तर त्या पक्षाने निवडणूक आयोगाला खरेदी केले आहे काय? नसेल तर लाखाच्या फरकाने राजस्थानात काँग्रेस उमेदवार कसा जिंकू शकतो? उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी यंत्रात गडबड केलेल्या भाजपाने आताच त्यात गफलत करायचे का सोडलेले आहे? अशा प्रश्नांची उत्तरे या लोकांकडे मागितली पाहिजेत. पण ती मिळणार नाहीत. कारण त्यामागे एक साधा तर्क आहे आणि तोच पुरोगामी लोकशाहीचा निकष आहे. ज्यात पुरोगामी म्हणून लेबल लागलेल्यांनाच जिंकता येते आणि ज्यांच्यापाशी तशी पुरोगामी मान्यता नसेल, त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेता येईल, पण स्पर्धा जिंकता येणार नाही. कर्ण वा पुराणातल्या असल्या कथा आठवतात? ज्यात पक्षपात वा वर्चस्ववादाचे प्रभाव दिसतात त्याचा मनुवाद म्हणून निषेध करणारेच आज पुरोगामी म्हणून त्याचे अनुकरण करताना दिसतील. ते म्हणतात, आयडिया ऑफ इंडिया वा पुरोगामी वर्णव्यवस्थेमध्ये भाजपा वा qहदुत्वाला स्थान असू शकत नाही.हिंदुत्व अस्पृश्य आहे. त्याचा स्पर्शही निषिद्ध आहे. त्याचा स्पर्श होईल तेही आपली प्रतिष्ठा गमावून बसते. मग ते मतदान यंत्र असो किंवा निवडणूक आयोग असो. थोडक्यात, आता पुरोगामी मनुवाद उदयास आलेला आहे.
@@AUTHORINFO_V1@@