श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. हा सण हिंदू धर्मातील एक पवित्र सण मानला जातो. श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी सर्प म्हणजेच नाग देवतेची पूजा केली जाते.
पावसाळा म्हणजे श्रावणाची सुरूवात असे मानले जाते, वैज्ञानिकदृष्टया पाऊस पडल्यानंतर नागांच्या बिळात पावसाचे पाणी शिरते त्यामुळे नाग बिळांच्या बाहेर पडतात, ज्यामुळे नागांचे वास्तव्य जमिनीवर होते.
सर्पांना हिंदू धर्मात देव मानले जाते. पुरातण काळात शेषनाग, वासुकी, तक्षक, कालिया सारख्या नागांचा उल्लेख केला आहे. भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नाग, तर विष्णू भगवान हे शेषनागावर विराजमान करतात. म्हणून नागांचे पूजन म्हणजे देवांचे पूजन असे मानले जाते.
महाभारतात परिक्षित राजाने शमीक ऋषींचा अपमान केल्यामुळे तक्षक नावाच्या नागाने त्याला विष दिले होते. त्याच्या नंतर जनमेजय राजायाने ‘नाग’ यज्ञ करून अनेक नाग मारले. तेव्हा अस्तिक ऋषीने यज्ञ थांबवला, त्यादिवशी पंचमी होती. म्हणून त्या दिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी नागाचे चित्र किंवा मूर्ती तयार करून दूध, फुले, हळदीकुंकू, अक्षता वाहून त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी नागाच्या बांधावर किंवा नागदेवतेच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते. दूध-लाह्यांचा प्रसाद दिला जातो. या दिवशी सर्पदंशाचा धोका टाळण्यासाठी मंत्रोच्चार आणि नाग मंत्र देखील उच्चारले जातात आणि काही घरांमध्ये भिंतीवर नागाचे चित्र काढून पूजा केली जाते.
नाग मंत्र, राहू-केतू शांति, महामृत्युंजय सारखे जप नागपंचमी दिवशी केल्यास सर्पदोष नष्ट होतो असे मानले जाते. कालसर्प दोष थांबवण्यासाठी नागपंचमी हा दिवस फार शुभ मानला ही जातो.