श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास कोषाध्यक्ष तथा महामंत्री, मुंबई भाजप आचार्य पवन त्रिपाठी यांचे परखड विश्लेषण
05-May-2026
Total Views |
भारतीय राजकारणाच्या कालखंडात काही क्षण असे येतात, जे इतिहासाची दिशा बदलून टाकतात. पण नरेंद्र मोदी यांनी भारताची धुरा सांभाळल्यापासून असे क्षण जणू रोजच घडताना दिसत आहेत. मोदींचा भारत आणि ‘भारतीय प्रथम’ ही संकल्पना दररोज अधिक बळकट होत आहे. ‘सबका साथ, सबका विकास’, सुशासन, पारदर्शकता आणि स्पष्टवक्तेपणा या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आज पश्चिम बंगाल विधानसभा आणि दक्षिण भारतातील निवडणुकांचे निकाल समोर आले असता हे स्पष्ट झाले आहे की, हा केवळ ‘सत्ता बदल’ नाही. हा त्या कोट्यवधी दडपल्या गेलेल्या स्वाभिमानांचा आवाज आहे, ज्यांना दशकानुदशके ‘वोट बँक’च्या राजकारणासाठी बळी दिले गेले होते.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील लाटेने आज ज्या प्रकारे विजय मिळवला आहे, त्यातून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. मुखर्जी यांनी ज्या बंगालच्या मातीतून ‘एक राष्ट्र, एक विधान’चा संकल्प मांडला होता, त्याच भूमीने आज त्यांच्या विचारांच्या सरकारला जवळपास दोन-तृतीयांश बहुमत देत नियतीचा एक चक्र पूर्ण केल्याचे दिसते.
या ऐतिहासिक जनादेशाची पायाभरणी केवळ विकासाच्या आश्वासनांवर नाही, तर गेल्या काही काळात धोक्यात आलेल्या सुरक्षिततेच्या भावनेवरही आधारलेली आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी शेजारील बांग्लादेश मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर घडलेल्या घटनांनी बंगालमधील हिंदू समाजाच्या मनात खोल परिणाम केला. तेथील राजकीय उलथापालथ आणि शेख हसीना यांना देश सोडावा लागलेला प्रसंग यामुळे सीमापारच्या समाजात अस्वस्थता निर्माण झाली. ‘शांततेचे दूत’ म्हणून ओळखले जाणारे नोबेल विजेते मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यानंतर सुरू झालेल्या घडामोडींनी भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतेवरही प्रश्नचिन्ह उभे केले.
तेथील प्रसिद्ध लोकसंगीतकार राहुल आनंद यांचे १४० वर्षे जुने घर जाळण्याची घटना ही केवळ एक प्रसंग नव्हती, तर एका संस्कृतीवर झालेला आघात होता. त्यांच्या हातांनी तयार केलेली वाद्ये जाळण्यात आली, त्याची झळ पश्चिम बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद आणि नदिया या जिल्ह्यांपर्यंत जाणवली. इस्कॉन च्या संतांवरील कारवाई आणि हिंदूंवरील अत्याचारांबाबत जेव्हा भारतातील ‘सेक्युलर’ गट आणि ममता बॅनर्जी यांचे प्रशासन मौन होते, तेव्हा सामान्य हिंदूंना परिस्थितीची गंभीरता जाणवली.
मतदान केंद्रांवरील लांबच लांब रांगा ही या ‘अस्तित्वाच्या लढाईची’ साक्ष देत होत्या. यावेळी मतदारांनी केवळ शांतपणे मतदान न करता, उघडपणे आपल्या हक्कासाठी मतदान केल्याचे दिसून आले. ‘संदेशखाली’सारख्या घटनांमुळे निर्माण झालेला रोष आणि महिलांवरील अत्याचार, तसेच स्थानिक पातळीवरील ‘सिंडिकेट राज’ यामुळे निर्माण झालेला असंतोष या सर्वांचा परिणाम म्हणून हा निकाल समोर आला.
आजचा निकाल हा या सामूहिक जागृतीचा परिणाम आहे. बंगालमधील ही लाट दक्षिणेकडेही तितक्याच वेगाने पोहोचली. एम. के. स्टालिन आणि उदयनिधी स्टालिन यांचा पराभव हा राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आसाम मध्ये भाजपच्या विजयाने हिमंता बिस्वा सरमा यांच्या धोरणांना जनतेचा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले. तसेच पुडुचेरी मध्ये भाजपचे सरकार स्थापन होणे हे पक्षाच्या विस्ताराचे द्योतक आहे. ही केवळ निवडणुकीतील विजय नाही, तर उत्तर ते दक्षिण असा एक वैचारिक प्रवाह आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश आहे.
- आचार्य पवन त्रिपाठी,
कोषाध्यक्ष, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास, महामंत्री, मुंबई भाजप