मुंबई : (Nitesh Rane) अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम राज्यातील निर्यात व्यवस्थेवर होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला.
विधानसभेत नाना पटोले यांनी जेएनपीए बंदरात राज्यातील फळे व भाज्यांनी भरलेले निर्यात कंटेनर अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची शक्यता निर्माण झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. आंतरराष्ट्रीय तणावामुळे निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, "सद्यस्थितीची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली असून केंद्र सरकारशी समन्वय सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. निर्यात साखळी सुरळीत राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आवश्यक ते निर्णय तातडीने घेतले जातील,” असे आश्वासन मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी दिले.
राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून निर्यातदार, शेतकरी व संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्कात आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.(Nitesh Rane)