Dr. Jaysingrao Pawar : मराठेशाहीचा इतिहासकार काळाच्या पडद्याआड! डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

26 Mar 2026 12:53:15

jaysinghrao pawar

मुंबई :(Dr. Jaysingrao Pawar) आपल्या लेखणीतून मराठेशाहीचा इतिहास मांडणारे ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज दि. २६ मार्च रोजी पहाटे निधन झाले.वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ पदभर सांभाळला होता. त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधनाच्या विश्वामध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

प्रख्यात इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, करवीर संस्थापिका ताराराणी, यांच्या विषयी अत्यंत मोलाचे संशोधन केले. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडलेली प्रकृती बिघडली होती त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म हडसर (जिल्हा सांगली) येथे ३० डिसेंबर १९४१ येथे झाला. शिवाजी विद्यापीठात त्यांच्या शैक्षणिक संशोधन कार्याचा पाया रचला गेला. एम.ए. मध्ये सर्वप्रथम आलेले पवार यांनी येथेच आणि पीएच.डी. पदवी संपादन केली तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम केले, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगराव पवार यांच्या संशोधन कारकिर्दीची मुहूर्तमेढ १९६४ मध्ये रोवली गेली.

डॉ. जयसिंगराव पवार हे मराठ्याची इतिहासाचे बिनीचे संशोधक होते. विशेषतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज, करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या विषयी त्यांनी मोलाचे संशोधन केले त्याविषयी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यांचा इतिहास नव्या पिढीसाठी यावा यासाठी ते सातत्याने व्याख्याने, शिबिरांना उपस्थिती लावत असत त्यांच्या ओघवत्या शैलीतील शाहू चरित्र ताराराणीचे चरित्र ऐकणे ही अभ्यासकांसाठी मोठी संधी असे.

कोल्हापूरच्या इतिहासावर टाकला प्रकाश
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'ऐतिहासिक व प्राकृतिक' या खंडामध्ये कोल्हापूरच्या सुमारे २५०० वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विविध विषयतज्ज्ञांनी १७ लेखांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहासासह प्राकृतिक इतिहासाचाही वेध घेतला आहे. यामध्ये ब्रह्मपुरी, करवीर नावाची व्युत्पत्ती, कोल्हापूरचे कोट, जिल्‌ह्यातील किल्ले, शिवकाळ, महाराणी ताराबाई, करवीरकर महाराणी जिजाबाई, १८५७ चा स्वातंत्र्यलढा आणि चिमासाहेब महाराज, करवीर रियासत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती घराण्यातील कुलाचार, संस्थानातील स्वातंत्र्यलढा, कोल्‌हापूर भूगोल, वनस्पतीसंपदा, प्राणिसंपदा आणि पक्षीसंपदा या विषयांवरील लेखांचा समावेश सदर खंडात आहे.

तत्तवनिष्ठ संशोधक हरपला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे. इतिहासाचा केवळ अभ्यास न करता तो जिवंत ठेवण्याचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, महाराणी ताराराणी आणि इतर थोर व्यक्तिमत्त्वांचा त्यांनी घेतलेला सखोल वेध पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखनाला नवी दिशा दिली. त्यांच्या संशोधनातून आणि लेखनातून महाराष्ट्राच्या इतिहासाला एक समृद्ध, संदर्भपूर्ण भक्कम पाया मिळाला.असा तत्वनिष्ठ, व्यासंगी आणि शांतपणे मोठं काम करणारा संशोधक हरपणं ही राज्यासाठी मोठी पोकळी आहे.



Powered By Sangraha 9.0