गर्भाशय मुखाचा कर्करोग... भीती निर्माण करणारा हा आजार. पण, आज विज्ञानाने त्याविरोधात ‘एचपीव्ही’ लसीकरणाच्या माध्यमातून एक प्रभावी संरक्षण कवच प्रदान केले आहे. तरीही, माहितीपेक्षा अफवा वेगाने पसरत असल्याने, अनेक पालक अजूनही या लसीकरणाबाबत संभ्रमात आहेत. अशा वेळी समाजात विश्वास निर्माण करत, योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविणारी एक संस्था म्हणजे ‘छबी सेवा फाऊंडेशन.’ आज ही संस्था ‘एचपीव्ही’ लसीकरणाच्या माध्यमातून कर्करोगाविरुद्ध एक मजबूत ढाल बनल्याचे दिसते.
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी सुरू केलेली ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ‘राष्ट्रीय आरोग्य मिशन’ अंतर्गत प्रभावीपणे राबवली जात आहे. या मोहिमेला ‘छबी सेवा फाऊंडेशन’, Mon indigenous culture and welfare society' आणि अन्य सहयोगी संस्थांचा सक्रिय पाठिंबा मिळत आहे. ही आता केवळ सरकारी योजना राहिलेली नाही, तर हळूहळू ती जनतेची चळवळ ठरली आहे.
मात्र, या सकारात्मक उपक्रमासमोर सर्वांत मोठं आव्हान आहे, अफवा आणि गैरसमजांचं. ‘एचपीव्ही’ लस सुरक्षित नाही, मुलींच्या भविष्यातील मातृत्वावर त्याचा परिणाम होईल, अशा चर्चांमुळे अनेक कुटुंबे लसीकरणासाठी घाबरत आहेत. परंतु, माझ्या अनुभवातून आणि विविध वैद्यकीय अभ्यासांच्या आधारे मी हे ठामपणे सांगू शकतो की, ‘एचपीव्ही’ लस पूर्णपणे सुरक्षित आहे. जागतिक स्तरावर ‘जागतिक आरोग्य संघटना’ 'the BMJ2' आणि 'IAPSM3' मधील मोठ्या प्रमाणातील अभ्यासांनी या लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध केली आहे. ही लस भविष्यात गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करते. उलट, लसीकरण टाळल्यास हा धोका वाढतो, ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे.
या पार्श्वभूमीवर ‘छबी सेवा फाऊंडेशन’ने जनजागृतीसाठी पारंपरिक आणि आधुनिक माध्यमांचा प्रभावी संगम साधला आहे. ‘जागतिक महिला दिना’निमित्त देशभरात राबवलेल्या उपक्रमांनी याची साक्ष दिली. तज्ज्ञ डॉक्टर, प्रसुतीतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि ऑन्कोलॉजिस्ट यांनी थेट लोकांशी संवाद साधत त्यांच्या मनातील भीती दूर केली. महाराष्ट्रात मर्दानी खेळाच्या माध्यमातून धैर्याचा संदेश देण्यात आला, तर अरुणाचल प्रदेशात पारंपरिक- सांस्कृतिक नृत्यांच्या माध्यमातून आरोग्याची जाणीव निर्माण करण्यात आली.
विशेष म्हणजे, या संस्थेचं कार्य केवळ जागरूकतेपुरतं मर्यादित नाही. ईशान्य भारतात, विशेषतः अरुणाचल प्रदेशात ‘छबी सेवा फाऊंडेशन’ गेल्या काही वर्षांपासून कर्करोग जागरूकता आणि तपासणीसाठी सातत्याने कार्यरत आहे. दुर्गम आणि आरोग्यसेवेपासून वंचित भागांमध्ये पोहोचण्यासाठी संस्थेने ‘कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन’ सुरू केली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून गावोगावी जाऊन महिलांची तपासणी, लवकर निदान आणि योग्य मार्गदर्शन केले जात आहे. अनेक महिलांना वेळेवर निदान आणि उपचाराची संधी मिळत असून, हे कार्य प्रत्यक्षात जीव वाचवणारे ठरत आहे.
दरम्यान, या मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी ‘छबी सेवा फाऊंडेशन’च्या टीमने संचालक डॉ. विश्वनाथ गारगोटे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. या भेटीत ‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी व्यापक जनजागृतीसाठी सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. या बैठकीनंतर लगेचच प्रत्यक्ष कृतीला वेग देण्यात आला आणि पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरजवळील कडूस येथील डायनामिक इंग्लिश मिडियम स्कूल-ज्युनिअर कॉलेज येथे ‘एचपीव्ही अवेअरनेस ड्राईव्ह’ आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकांमध्ये भीती आणि संभ्रम स्पष्टपणे जाणवत होता. मात्र, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आणि समजावून सांगण्याच्या पद्धतीमुळे वातावरण हळूहळू बदलू लागले. शंका दूर झाल्या, विश्वास निर्माण झाला आणि अखेरीस अनेक पालकांनी आपल्या मुलींना शासनाकडून उपलब्ध मोफत ‘एचपीव्ही’ लस देण्याचा निर्णय घेतला.
या संपूर्ण चळवळीबद्दल लिहिताना, मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे, ही केवळ आरोग्य मोहीम नाही, तर समाजमन बदलण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक संवाद, प्रत्येक शंका निरसन आणि प्रत्येक लसीकरण हे सुरक्षित भविष्यासाठी टाकलेले ठाम पाऊल आहे. आज समाज एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. एका बाजूला भीती, अफवा आणि गैरसमज, तर दुसर्या बाजूला विज्ञान, माहिती आणि सुरक्षित भविष्य. निवड प्रत्येक पालकाला करायची आहे. ‘एचपीव्ही’ लसीकरण हे केवळ एक वैद्यकीय उपाय नाही, तर मुलींच्या आयुष्याला संरक्षण देणारी एक मजबूत ढाल आहे.
‘छबी सेवा फाऊंडेशन’ आणि तिच्या सहयोगी संस्था या कार्यात सातत्याने पुढाकार घेत असून, ईशान्य भारतापासून महाराष्ट्रापर्यंत त्यांनी उभारलेली ही जनजागृतीची लाट आता अधिक व्यापक होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिक सहकार्य मिळाल्यास ही चळवळ आणखी प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आज घेतलेला एक छोटासा निर्णय उद्याचे आयुष्य सुरक्षित करू शकतो आणि कदाचित याच निर्णयातून ‘कर्करोगमुक्त भारत’ या स्वप्नाची खरी सुरुवात होऊ शकते.
‘छबी’ची ही ढाल - प्रत्येक मुलीच्या भविष्यासाठी!
- पार्थ छबी बिमल चंद्र रॉय