Mohan Bhagwat: जगात सुरु असलेली युद्धं थांबवण्याची क्षमता भारताकडे : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

21 Mar 2026 17:51:52
 
Mohan Bhagwat
 
मुंबई : (Mohan Bhagwat) सध्या जगभरात अनेक युद्धं सुरू आहेत आणि ही युद्धं थांबवण्याची क्षमता भारताकडे आहे. या युद्धांच्या पार्श्वभूमीवर वारंवार भारताकडून आवाज उठत आहे आणि ही परिस्थिती संपवण्याची ताकद भारतात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. शुक्रवारी विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांत कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. (Mohan Bhagwat)
 
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, सनातन धर्माचा उत्थान हा ईश्वराचा संकल्प आहे. सध्या जग डगमगत आहे आणि ही परिस्थिती स्पष्टपणे दिसून येते. युद्ध का होतात, याचे मूळ कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची लालसा आहे. यातूनच मग पुढे संघर्ष निर्माण होतो. आपल्या उदाहरणातून आणि आपल्या शक्तीमुळे जग आपले ऐकेल. जेव्हा आपली भूमिका समजेल, तेव्हा जग त्याचे अनुकरण करेल आणि तेव्हाच परिस्थिती सुधारेल. जगातील विचारवंतांनाही हे जाणवते की ही युद्धस्थिती भारतच संपवू शकतो; मात्र त्यासाठी आपण स्वतः सक्षम आणि सज्ज होणे आवश्यक आहे. (Mohan Bhagwat)
 
पुढे ते म्हणाले की, या सर्व समस्यांच्या मुळाशी स्वार्थी वृत्ती आहे. गेल्या २००० वर्षांत विविध प्रयोग झाले, पण ना संघर्ष थांबले, ना कट्टरतेत घट झाली. एकमेकांबद्दलचा भेदभाव आणि वर्चस्वाची भावना अजूनही कायम आहे. काही चांगले घडले असले तरी त्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे जग आज विनाशाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे वाटते आणि यावर पर्याय शोधणे गरजेचे आहे. (Mohan Bhagwat)
 
भारत मानवतेचा कायदा मानतो
 
डॉ. मोहनजी भागवत यांनी पुढे म्हटले की, भारतात धर्माचे आचरण आवश्यक आहे आणि त्यामागे समाजाची शक्ती उभी राहिली पाहिजे. धर्म केवळ प्रवचन किंवा पुस्तकांत नसून तो आचरणातून प्रकट होतो. भारतातील लोक मानवतेच्या मूल्यांनुसार वागतात; मात्र जगातील इतर भागात ‘जंगलचा कायदा’ मानला जातो, असेही त्यांनी नमूद केले. (Mohan Bhagwat)
 
 
Powered By Sangraha 9.0