मुंबई : (Raj Thackeray) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. (Raj Thackeray)
राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. अशा अनेक घटनांच्या चौकश्या होतात, पण त्यातून सरकार किंवा प्रशासन काही बोध घेतं का, हा खरा प्रश्न आहे.” (Raj Thackeray)
मंगळवार (३ फेब्रुवारी) रोजी संध्याकाळी सुमारे ५ वाजता गॅसचा टँकर उलटल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवण्यात आली, हे योग्यच असल्याचं सांगत त्यांनी पुढचा मुद्दा उपस्थित केला. “अशा घटना घडल्यास कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायच्या, याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का?” असा थेट सवाल त्यांनी केला. (Raj Thackeray)
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेल्या मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला आता २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या काळात संभाव्य आपत्तींचा विचार झाला नाही, ना संपूर्ण रस्त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. “मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली, ती म्हणजे टोल वसुली,” असा टोला त्यांनी लगावला. (Raj Thackeray)
मनसेचं टोल आंदोलन हे टोल घेण्याविरोधात नव्हतं, तर टोलच्या बदल्यात प्रवाशांना कोणत्या सुविधा दिल्या जातात, यासाठी होतं, असं स्पष्ट करत त्यांनी विचारलं की, “रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का?” (Raj Thackeray)
अलीकडील अर्थसंकल्पात मुंबई–पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा झाली असली, तरी ती कधी प्रत्यक्षात येईल याची खात्री नाही. “त्याआधी किमान मुंबई–पुणे प्रवास तरी सुरळीत करा,” अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. (Raj Thackeray)
“हल्ली मुंबई–पुणे प्रवास किती तासांत होईल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. एका बाजूला मुंबई आणि पुणे ही विकासाची इंजिनं आहेत असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला ३२ तास वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे पाहायचं, हा कोडगेपणा अनाकलनीय आहे,” अशी तीव्र टीका त्यांनी केली. (Raj Thackeray)
या काळात ज्या प्रवाशांकडून टोल वसूल करण्यात आला, तो सरकारने परत करावा, अशी मागणी करत राज ठाकरे यांनी चौकशीचा फार्स न करता भविष्यात अशा घटना घडल्यास तात्काळ उपाययोजना कशा केल्या जातील, याचा स्पष्ट कृती आराखडा लोकांसमोर ठेवावा, असं आवाहन केलं आहे. तसेच पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतानाही नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का निर्माण होते, याचा सरकारने आत्मपरीक्षण करावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Raj Thackeray)