उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात अकाली मृत्यू झाला. या घटनेला आज आठवडा उलटून गेला असला, तरी अजित पवार गेले हे सत्य स्वीकारणं आजही अनेकांच्या मनाला कठीण जात आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली असून, आता या अपघातामागील नेमक्या कारणांवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Ajit Pawar)
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. अपघातस्थळी पाहणीदरम्यान एका प्रत्यक्षदर्शीने त्यांना सांगितले की, अपघाताच्या काही सेकंद आधी विमानातून कुणीतरी उडी मारल्यासारखं त्यांना जाणवलं. या दाव्यामुळे संशय आणखी गडद झाला आहे. याशिवाय, अजित पवार यांनी अपघाताच्या काही मिनिटे आधी आपल्या पुतण्या श्रीजीत पवार यांना फोन केला होता. हा फोन कॉल सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी झाला आणि ८ वाजून ४४ मिनिटांनी विमानाचा भीषण अपघात झाला. या सहा मिनिटांत नेमकं काय घडलं, हा प्रश्न आता सर्वांनाच सतावत आहे. (Ajit Pawar)
हवाई तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही विमान प्रवासातील शेवटची ११ मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. यामध्ये टेकऑफचे ३ आणि लँडिंगचे ८ मिनिटे समाविष्ट असतात. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) आकडेवारीनुसार, २००५ ते २०२३ या कालावधीत ५३ टक्के विमान अपघात लँडिंगदरम्यान झाले आहेत. अजित पवार यांचा अपघातही लँडिंगच्या टप्प्यातच झाला असल्याने या ‘क्रिटिकल मिनिटां’कडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे. (Ajit Pawar)
फ्लाइट डेटा रडारनुसार, अजित पवार फोनवर बोलत असताना विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या वरच होतं. फोन कॉलमध्ये त्यांचा आवाज स्थिर आणि सामान्य असल्याचं ऐकू येतं. याचा अर्थ ८.३८ वाजेपर्यंत विमानात कोणतीही गंभीर तांत्रिक अडचण नव्हती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्यानंतरच्या काही मिनिटांत विमानाने एक घिरटी मारली आणि लगेच अपघात झाला. (Ajit Pawar)
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) जारी केलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर वैमानिकांनी एटीसीला शेवटचा प्रतिसाद दिला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्येही विमानाचं नियंत्रण हवेतच सुटल्याचं दिसून येतं. त्यामुळे शेवटच्या क्षणी वैमानिकांशी संपर्क तुटण्यामागचं नेमकं कारण काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. (Ajit Pawar)
या अपघाताची डीजीसीएकडून सखोल चौकशी सुरू असून, ब्लॅक बॉक्स आणि तांत्रिक तपासणीनंतरच सत्य समोर येणार आहे. तोपर्यंत शेवटच्या त्या सहा मिनिटांत नेमकं काय घडलं, हा प्रश्न कायम राहणार आहे. (Ajit Pawar)