मुंबई : (CM Devendra Fadnavis) योग्यवेळी नीट इतिहास शिकवला असता तर या देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपाला हिरो म्हटले नसते. पण आपण खरा इतिहास कधी शिकवलाच नाही. या देशात अनेक राष्ट्रभक्त मुस्लिम आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठलाच आक्षेप नाही. पण जे लोक देशाच्या विरोधातील लोकांना आपला हिरो म्हणतील त्यांच्याविरुद्ध आम्ही लढाई करू, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "आ. विजय वडेट्टीवार आणि आ. भास्कर जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानचा विषय मांडला. टिपू सुलतान चांगले होते की, वाईट यावर आमचा आक्षेप नाही. पण ज्यावेळी कुणीतरी टिपू सुलतान हे छत्रपती शिवरायांऐवढे मोठे राजे होते, असे म्हणतो त्याला आमचा आक्षेप आहे. दुर्दैवाने, या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यात वर्षानुवर्षे आम्हाला टिपू सुलतान हे महान राजे होते हेच शिकवण्यात आले. पण ७५ हजार हिंदूंची आणि ३३ हजार नायरांची कत्तल करणारेही टिपू सुलतानच होते, हे आम्हाला कधीच शिकवले नाही. आता खरा इतिहास सापडतो आहे."
"या देशात सरकारने ७० वर्षे एनसीईआरटीच्या पुस्तकात मुघल साम्राज्याला १७ पाने दिली आणि छत्रपती शिवरायांना एक परिच्छेद दिला. आता मोदी सरकारने एनसीईआरटीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला एकूण २० पाने दिली," असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.