२८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत एक विमान कोसळले आणि त्यात अजित दादांचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून खरंच अख्ख महाराष्ट्र सुन्न झाला होता. आता या घटनेला काही काळ लोटला आहे आणि आपल्या हाती या अपघाताशी संबंधित काही कागदपत्रे, काही रिपोर्ट आणि संवाद हाती आले आहेत. आज आपण या सगळ्या माहितीच्या आधारे या अपघातामागे नेमकं काय घडलं याचा एक सखोल आढावा घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ही माहिती म्हणजे काही वरवरची नाही. यात अपघाताच्या दिवसाची मिनिटा मिनिटाची टाइमलाइन आहे, त्या विमान कंपनीचा एक वादग्रस्त इतिहास आहे. आणि असे काही तपशील आहेत जे थेट प्रश्न उपस्थित करतात की हा फक्त एक अपघात होता का? आपला हेतू या घटनेचे पैलू समजून घेणे आहे. असे रोहित पवार यांनी सांगितले.

सुरूवातीला घटनेच्या पूर्वीच्या माहितीकडे जाऊया. प्रवास होता मुंबई ते बारामती, साधारण २१० किलोमीटरचा. आणि व्हिएसआर कंपन्याच्या व्हीलजेट ४५ ने हे अंतर साधारण २७ मिनिटांत पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजांच्या टाइमलाइननुसार, या विमानाने सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून उड्डाण केले. आणि साधारण ८ वाजून ४२ ते ४५ मिनिटांच्या दरम्यान हा अपघात झाला. त्यानंतर जवळपास एका तासाने सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी दादांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. हे विमान काही साधे सरळ नव्हते. हे कॅनडाच्या बॉम्बार्डियर अॅरोस्पेसने २०१० मध्ये बनवलेले व्हीलजेट ४५ मॉडेल होते. ही विमाने साधारण विमानांपेक्षा जास्त वेगाने आणि साधारण ५१ हजार फुटांपर्यंत उंचीवर उडतात. म्हणजे ही एक प्रकारे आकाशातील स्पोर्ट्स कारच असतात. त्यामुळे व्हीआयपी लोकांना ते सोयीचे पडतात. पण इथेच या घटनेतील पहिली अडचण येते. असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे विमान ज्या कंपनीचे होते ती कंपनी होती व्हिएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि या कंपनीचा इतिहास तपासला तर या अपघाताची पार्श्वभूमी अधिकच गडद होते. या व्हिएसआर कंपनीचे दोन संचालक आहेत - विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग. दिल्लीत कार्यालय आहे आणि त्यांच्या ताफ्यात साठ व्हीलजेट ४५ विमाने आहेत. मात्र धक्कादायक म्हणजे या अपघाताच्या जवळपास दोन वर्ष आधी, १४ सप्टेंबर २०२३ रोजी याच व्हिएसआर कंपनीचे हेच विमान मुंबई विमानतळावर धावपट्टीवरून सर्ले होते. त्यावेळी त्यांनी कारण दिले होते की मुसळधार पाऊस होता आणि व्हिजिबिलिटी खूप कमी होती. पण मुंबई विमानतळावर आयएलएस (इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टम) नावाची अत्यंत प्रगत प्रणाली आहे, जी कमी व्हिजिबिलिटीमध्ये मदत करते. मग प्रश्न असा आहे की आयएलएस असताना हे विमान धावपट्टीवरून का सर्ले? याचे उत्तर आजही मिळालेले नाही. आणि आश्चर्य म्हणजे दोन वर्ष होऊनही त्या अपघाताचा अंतिम अहवाल एएआयबीने दिलेला नाही. असे रोहित पवार यांनी सांगितले.


पण आपल्या यंत्रणांनी जरी याकडे कानाडोळा केला असला तरी युरोपियन विमान सुरक्षा यंत्रणेची (ईएएसए) याची अत्यंत गंभीर दखल घेतली होती. व्हिएसआर सारख्या कंपन्यांना युरोपमध्ये उड्डाण करायचे असेल तर त्यांना ईएएसएकडून ईसीओ (थर्ड कंट्री ऑपरेटर) नावाचा परवाना घ्यावा लागतो. ईएएसाने २०२३ च्या अपघातानंतर व्हिएसआरकडून कागदपत्रे आणि स्पष्टीकरण मागितले. वारंवार मागणी करूनही व्हिएसआरने ते दिले नाही. त्यामुळे ईएएसाने आधी व्हिएसआरचा परवाना स्थगित केला आणि नंतर तो कायमचा रद्द केला. त्यानंतर ईएएसाने व्हिएसआरच्या विमानांमध्ये लेव्हल १ नावाची त्रुटी असल्याचे सांगितले. विमान सुरक्षेमध्ये ही अत्यंत गंभीर त्रुटी मानली जाते. याचा सरळ अर्थ असा होतो की या कंपनीची विमाने प्रवासासाठी धोकादायक आहेत आणि प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे याबाबतची अधिकृत माहिती डीजीसीएला कळवण्यात आली होती. एवढे असूनही ही कंपनी व्हीआयपी लोकांना घेऊन प्रवास करत होती. ही निष्काळजीपणाची साखळी नाही तर काय? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.

कंपनीचे संचालक विजय कुमार सिंग यांनी नेहमीप्रमाणे अपघाताचे कारण कमी व्हिजिबिलिटी आणि हवामान सांगितले. मात्र स्थानिक साक्षीदारांचे म्हणणे काही वेगळेच होते. अनेक साक्षीदारांनी सांगितले की विमानाचा आवाज नेहमीपेक्षा फार वेगळा, घरघरट्यासारखा येत होता. इतकेच नाही तर समोर आलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान जमिनीवर आदळण्याआधीच हवेत तिरके होऊन कोसळताना स्पष्ट दिसत आहे. म्हणजे यात यांत्रिक बिघाडाची शक्यता जास्त वाटते. मालकाचा दावा आणि वास्तव यात जमिनी-आसमानाचा फरक आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात - विमानाचा मेंटेनन्स नीट होत होता का? होय तर त्याची कागदपत्रे कुठे आहेत? उड्डाणापूर्वी विमानाचा नीट तपास झालेला का? ऐनवेळी पायलट का बदलले? दोन्ही पायलट ट्राफिकमध्ये एकाच वेळी अडकले हे कारण खरंच पटण्यासारखे आहे का? असं ही ते म्हणाले.

आपल्याकडे सकाळी सात वाजून दोन मिनिटांचा एक व्हॉट्सअॅप मेसेज आहे, ज्यात लिहिले आहे की सर्व क्रू विमानतळावर पोहोचले आहे. एवढ्या सकाळी विमानतळावर पोहोचलेला क्रू ट्राफिकमध्ये कसा अडकू शकतो? शिवाय ट्राफिकमध्ये अडकल्याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे हे ट्राफिकचे कारण बनावट असल्याची शक्यता आहे. मग खरे कारण काय असू शकते? असे रोहित पवार यांनी विचारले.

शिवाय या विमानाचे बदललेले कॅप्टन सुमित कपूर यांचा रेकॉर्ड धक्कादायक नाही तर भयावह आहे. २०१० मध्ये दिल्ली-बंगळुरू उड्डाणापूर्वी आणि २०१७ मध्ये दिल्ली-गुवाहाटी उड्डाणापूर्वी अशा दोन उड्डाणांपूर्वी ते प्री-फ्लाइट अल्कोहोल टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले होते. दुसऱ्यांदा हे केल्यामुळे डीजीसीएने त्यांच्यावर तब्बल तीन वर्षांचे निलंबन केले होते. मात्र गोष्ट इथेच संपत नाही. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी २०२६ रोजी म्हणजे अपघाताच्या केवळ २६ दिवस आधी कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांनीच एक व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता. त्यात त्यांनी लिहिले होते की आज एक महत्त्वाची फ्लाइट रद्द करावी लागली कारण पायलट दारू प्यायला होता. आणि त्या मेसेजमध्ये त्यांनी ज्या पायलटना ताकीद दिली होती त्यात सुमित कपूर यांचे नावही होते. कंपनीच्या मालकांना माहिती असूनही अशी चूक ही कंपनीच्या एकंदरीत सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सांगितले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीमध्ये पायलट्सच्या उड्डाणाच्या तासांमध्ये कागदोपत्री छेडछाड करणे यांसारख्या गोष्टी सर्रास घडत होत्या. एकंदरीत सगळा सावळा गोंधळ असल्याचं ते म्हणाले.
सूत्रांच्या माहितीनुसार विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टम कार्यरत नव्हती. कोणत्याही विमानात ही सिस्टम अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा विमान खाली कोसळण्याची शक्यता जाणवते तेव्हा हीच सिस्टम पायलटला आवाज करून सावध करते. म्हणजे धोक्याची सूचना देणारी यंत्रणाच बंद होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सांगितले.]

आता या सगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होते की हा अपघात केवळ दुर्दैवी घटना नव्हता, तर गंभीर दुर्लक्ष आणि नियमभंगाची साखळी होती. डीजीसीए आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची स्वतंत्र सीबीआय तपासाची घोषणा करावी. व्हीआयपी उड्डाणांसाठी वापरल्या जाणाऱ्या कंपन्यांची कठोर तपासणी व्हावी. अजित दादांसारख्या नेत्यांच्या जीविताला धोका पोहोचू नये म्हणून तात्काळ कारवाई करा. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, पण सत्य बाहेर येईलच. असा विश्वास रोहीत पवार यांनी व्यक्त केला आहे.