मुंबई : (Amol Mitkari) उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यभर शोककळा पसरलेली असतानाच, या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत या अपघाताच्या तपासाबाबत गंभीर शंका व्यक्त केल्या असून, “अपघात सहा जणांचा झाला, मग प्रत्यक्षात मृतदेह पाचच का सापडले?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Amol Mitkari)
अमोल मिटकरी यांनी आपल्या भावनिक ट्विटमध्ये अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला आहे. “आदरणीय दादा गेले, हे अजूनही मन स्वीकारायला तयार नाही,” असं म्हणत त्यांनी देवगिरीवरील त्या दोन खुर्च्यांचा उल्लेख केला आहे. त्यातील एक खुर्ची सामान्य माणसाच्या तक्रारी शांतपणे ऐकणाऱ्या नेतृत्वाची, तर दुसरी अजित पवार यांची असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्या खुर्च्या पाहून डोळे पाणावल्याचं त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं आहे. (Amol Mitkari)
हेही वाचा: Praful Patel: ‘माझी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेली नाही’: प्रफुल्ल पटेल यांचे ट्विट करत स्पष्टीकरण
मिटकरी यांच्या मते, अपघाताच्या आदल्या दिवशी दुपारनंतर अजित पवार यांचा कोणताही अधिकृत कार्यक्रम नव्हता. मात्र त्याच ठिकाणी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याचं नंतर समजलं. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून ते बारामतीकडे रवाना झाले आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. गेल्या तीन दिवसांपासून मनात शंकेचं काहूर माजल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Amol Mitkari)
ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी काही ठोस प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असताना प्रत्यक्षात पाचच मृतदेह का सापडले? सहावी व्यक्ती नेमकी कुठे आहे? टेक-ऑफपूर्वी प्रवासी यादी डिजिटल स्वरूपात नोंदवली जाते, तर मग या यादीत विसंगती कशी निर्माण झाली? एवढ्या भीषण आगीत एकही कागदाचा तुकडा जळालेला का आढळला नाही? तसेच वारंवार पायलट बदलण्यामागचं कारण काय, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. (Amol Mitkari)
ट्विटमध्ये नेमकं काय?
आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले
त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.
आणि दुसरी – आदरणीय दादांची!!
मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.
प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.
मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—
• अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
• सहावी व्यक्ती कुठे गेली?
• Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
• एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
• एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.