नववर्षातील नवीन पद्धतीची भरती!

09 Jan 2026 10:46:28
Business Management
 
गेली सुमारे दोन वर्षे भारतातील मध्यम व मोठ्या स्वरूपाच्या उद्योगाचे नेतृत्व करून, त्यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीव व्यावसायिक संदर्भात अधिक उपयुक्त व्हावे, यादृष्टीने काम करणार्‍या जागतिक व्यवसाय विकास केंद्रांनी आपलेकार्य-कर्तव्य यापूर्वीच सिद्ध केले आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, २०२६ मध्ये प्रशिक्षित व्यवस्थापकांच्या संख्येत ४० टक्के वाढ अपेक्षित आहे. त्याविषयी सविस्तर...
 
भारतातील व्यवसाय-व्यवस्थापन विकास केंद्रांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे, त्याठिकाणी देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरांवरील उद्योगांच्या वाढत्या आणि बदलल्या गरजा आणि प्राधान्यक्रमांवर प्रामुख्याने विचार करून त्यानुरूप कृतिशील प्रयत्नांची जोड देण्यात आली आहे. याचे सक्रिय व सकारात्मक परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत.
 
याच्याच परिणामी, आज आपल्याकडील व्यवसाय-व्यवस्थापन विकास केंद्रांमध्ये परंपरागत व आवश्यक स्वरूपातील उद्योग-व्यवसाय वाढीच्या संदर्भात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवरील आवश्यक विषय, त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण यांच्याच जोडीला उद्योजक-व्यवस्थापकांना आवश्यक अशा व्यवस्थापकीय शैली व कौशल्यांचा आवर्जून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच आज त्याठिकाणी उत्पादन प्रक्रिया व विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, विकसित नेतृत्वक्षमता व निर्णयक्षमता विकास, जागतिकसंदर्भात व्यवसायासाठी आवश्यक माहिती-तंत्रज्ञान व त्याचे विश्लेषण करणे, संपर्क-संवाद प्रक्रियेला अधिक गतिमान व प्रभावी बनविण्यासाठी आवश्यकतेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश व वापर करणे, दर्जात्मक सुधारणेसाठी आंतरराष्ट्रीय कार्यपद्धती व मापकांचा अवलंब करणे इ. सक्रिय व अनुभवांवर आधारित पद्धतीने भर दिला जात आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
 
आपल्या व्यवसाय-व्यवस्थापन विकास केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षितांच्या संख्येत लक्षणीय स्वरूपात वाढ झालेली आहे. संख्यात्मकदृष्ट्या सांगायचे झाल्यास, २०२४ मध्ये व्यवसाय विकास केंद्रांच्या माध्यमातून २०२४ मधील प्रशिक्षित व्यवस्थापकांची संख्या सहा हजार, ५०० होती, ती २०२५च्या अखेर आठ हजार, ५०० एवढी वाढली आहे, असा एक प्राथमिक अंदाज आहे. या संख्येत प्रचलित वर्षी, म्हणजेच २०२६ मध्ये सुमारे ४० टक्के अशी लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. या वाढीमध्ये जागतिक स्तरावरील उद्योजक-व्यवस्थापकांचा प्रामुख्याने समावेश असून, यावरून आपल्या व्यवसाय विकास केंद्रांची वाढती उपयुक्तताच सिद्ध झाली आहे.
 
व्यवसाय विकास केंद्रांच्या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या व्यवस्थापकांच्या प्रशिक्षणासाठी ज्या उद्योग - व्यावसायिक कंपन्या मोठ्या प्रमाणात करतात, त्यामध्ये प्रामुख्याने ‘अ‍ॅलबर्स्टच’, ‘मॅक-डोनाल्ड’, ‘फेडेक्स’, ‘स्टॅण्डर्ड चार्टर्ड’ व त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर किरकोळ विक्री करणार्‍या विक्री कंपन्या, पूरक आरोग्यसेवा देणार्‍या कंपन्या इ. समावेश असून, यामध्ये व्यवस्थापनपदावरील नेमणुकीसाठी अशा प्रशिक्षितांचा प्रामुख्याने समावेश केला जातो.
 
यावर्षीच्या म्हणजेच २०२६ मधील पहिल्याच टप्प्यापासून भारतातील व्यवसाय विकास केंद्रांच्या विकासात्मक स्वरूपात दिसून आलेली बाब म्हणजे, व्यवसाय-विकासाच्या नव्या व वाढत्या उद्योगांच्या व्यवस्थापनविषयक गरजांची प्राधान्य तत्त्वावर व प्रामुख्याने पूर्तता करण्यासाठी अशा पदांवरील उमेदवारांच्या भरतीसाठी भारतात प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे. यामागचे मोठे व महत्त्वाचे कारण म्हणजे, आपल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये दिल्या जाणार्‍या व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये प्रगत तंत्रज्ञान व पद्धतींनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता व त्यावर आधारित जागतिक व्यवसाय-व्यवहारांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, सद्यस्थितीतील आर्थिकदृष्ट्या वेगाने विकसित होणार्‍या विकसित भारताचे प्रतिबिंब पण यानिमित्ताने जगापुढे येत आहेच.
नव्या वर्षातील नव्याने होणार्‍या वा नजीकच्या काळात होऊ घातलेल्या व्यवसाय-व्यवस्थापक वा तत्सम पदावरील भरतीच्या संदर्भात व्यवस्थापकीय पदांवरील उमेदवारांच्या निवड-भरतीच्या संदर्भात प्रामुख्याने काम करणार्‍या ‘एक्सफेनो’ कंपनीच्या नव्या अभ्यासातसुद्धा वर नमूद केलेले मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. याच अभ्यासात भारतातील व्यवसाय-व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षित उमेदवारांची व्यवस्थापन व व्यवस्थापकीय पदांवर निवड करण्यासाठी प्राधान्यक्रमाने निवड करण्यावर जागतिक स्तरावर आज भर दिला जात आहे.
 
अभ्यासात पुढे नमूद केल्यानुसार, उद्योग -व्यवसायाचे व्यवस्थापन यशस्वी पद्धतीने हाताळण्यासाठी प्रभावी व्यवस्थापकांची नेहमीच गरज असते. जागतिक स्तरावरील वाढत्या व्यवसायाला यशस्वी नेतृत्व प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज असते. नेमकी हीच गरज, भारतातील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांची मोठी व नेमकी मदत होत असल्याने या प्रशिक्षणाचा फायदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय उमेदवारांना होत असलेल्या दिसून येतो. आपल्या या अभ्यासाच्या संदर्भात ‘एक्सफेनो’च सहसंस्थापक कमल कारंथ यांनी नमूद केल्यानुसार, अभियांत्रिकी-तंत्रज्ञानासह प्रगत व्यवसायांना पुढे नेण्यासाठी व्यावसायिक नेतृत्व व निर्णयक्षमतेसह व्यवस्थापनासाठी आवश्यक गुणांची मोठी गरज असते व याच गरजेची पूर्तता भारतातील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांतर्फे जागतिक स्तरावर होत आहे.
 
याच्याच जोडीला विविध प्रकारच्या स्पर्धांवर मात करून यशस्वी व्यवसाय-व्यवस्थापनाला कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानासह आर्थिक- व्यावहारिक व व्यवस्थापन क्षेत्रासाठी अत्यावश्यक अशा विक्री व्यवस्थापन वा संसाधन व्यवस्थापनाचीसुद्धा तेवढीच गरज असते.व्यवसाय- व्यवस्थापनाच्या संदर्भातील या महत्त्वाच्या गरजांची एकत्रित व एकात्मिक स्वरूपात पूर्तता करणे, ही बाबसुद्धा देशांतर्गत व्यवसाय-व्यवस्थापन मार्गदर्शन केंद्रांच्या संदर्भात विशेष जमेचीठरली आहे. व्यवसाय-व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रांना मिळणारा वाढता यशस्वी प्रतिसाद पाहता, आम्ही आमच्या व्यवसायात आगामी तीन वर्षांत तिपटीने वाढ करण्याचा संकल्प सोडला असून, त्यादिशेने आमचे प्रयत्न सुरू असल्याची बाब भारतातील प्रमुख अशा व्यवसास-व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र असणार्‍या ‘अबर्स अ‍ॅण्ड मार्सल’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनीश गोयल यांनी व्यक्त केली आहे.
 
याशिवाय, देशातील इतर व्यवसाय-व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रांनी पण देश-विदेश पातळीवर वाढत्या व्यावसायिक गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आपली प्रशिक्षण क्षमता व सिद्धता यावर्षी लक्षणीय स्वरूपात वाढविली असून त्यामुळे अर्थातच, विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय व्यवस्थापकांना मोठ्या संधी व विविध देशांतील उद्योगांना मोठे लाभ होणार आहेत.
 
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक आणि सल्लागार आहेत.)
 
 
 
Powered By Sangraha 9.0