छत्रपती संभाजीनगर : (CM Devendra Fadnavis) 'ना बाण, ना खान राखू भगव्याची शान' असा नारा देत छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप बहुमताने जिंकून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात खान हवा की बाण? हा मुद्दा कायम राहिला आहे. या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा नारा दिला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. "संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र युती न होणे हे दुर्दैवी असले तरी भाजपा शिवसेनेत इथे मैत्रीपूर्ण लढत होईल असे त्यांनी सांगितले. सत्ता आल्यावर भाजप भगव्याची पाठराखण करणाऱ्यांना सोबत घेणार", असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती सरकारने केलेल्या विकासकामांना अधोरेखित केले. छत्रपती संभाजीनगर आता गुंतवणूकदारांच्या पसंतीचे ठिकाण बनत आहे. पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगर औद्योगिक विकासाचे केंद्र बनेल असे ते म्हणाले.
"छत्रपती संभाजीनगरसाठी महायुती सरकारने सोळाशे कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. परंतु, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ही योजना खोळंबली. मात्र, येत्या दोन महिन्यांत पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल", अशी ग्वाही त्यांनी दिली.
औरंगजेबाची कबर येथेच तयार झाली, पण हिंदवी साम्राज्य संपले नाही, म्हणून याचे नाव 'छत्रपती संभाजीनगरच'
औरंगजेब मराठ्यांना आणि हिंदवी स्वराज्य संपवायला आला होता. पण छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे तेज असे दाखवून दिले की औरंगजेबाची कबर इथे खोदली गेली. त्यामुळे या छत्रपती संभाजी नगराचं नाव हेच आहे आणि हेच राहिल.