नवी दिल्ली : (Mir Yar Baloch Letter to India) गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव सुरू आहे. आता या तणावांदरम्यान पाकिस्तानतील बलुचिस्तानमधील निर्वासित बलुच नेते मीर यार बलोच यांनी थेट भारताला पाठिंबा दिला आहे. मीर यार बलोच यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना एक खुले पत्र लिहून पाकिस्तानशी संबंधित अंतर्गत माहिती दिली आहे. तसेच या पत्रात पाकिस्तान आणि चीनच्या योजनांचाही खुलासा केला आहे. (Mir Yar Baloch Letter to India)
या खुल्या पत्रात मीर यार बलोच यांनी भारत आणि बलुचिस्तानमधील ऐतिहासिक संबंधांबद्दल भाष्य केले आणि सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले. त्यांनी बलुचिस्तानच्या ६ कोटी नागरिकांच्या वतीने भारतातील १४० कोटी लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील शेअर केले आहे.(Mir Yar Baloch Letter to India)
पाकिस्तानला मुळापासून उखडून टाका
"मागील वर्षी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मोदी सरकारने केलेल्या धाडसी आणि ठाम कारवाईचे आम्ही मनापासून कौतुक करतो. पाकिस्तानच्या मदतीने चालवले जाणारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत, तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करत सरकारने दाखवलेली ही कारवाई अत्यंत साहसी आणि निर्धारपूर्ण होती. बलुचिस्तानमधील लोक गेल्या ७९ वर्षांपासून दहशतवाद आणि मानवी हक्कांचे घोर उल्लंघन सहन करत आहेत. बलुचिस्तानमधील लोकांसाठी कायमस्वरूपी शांतता आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करण्यासाठी या गंभीर समस्येला मुळापासून उखडून टाकण्याची वेळ आली आहे", असेही या पत्रामध्ये लिहिले आहे.(Mir Yar Baloch Letter to India)
"बलुचिस्तान प्रजासत्ताक पाकिस्तान आणि चीनमधील वाढत्या धोरणात्मक युतीला अत्यंत धोकादायक मानतो. पाकिस्तानच्या सहकार्याने चीनने चीन–पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्प अंतिम टप्प्यापर्यंत नेला असल्याचा आम्ही इशारा देतो. बलुचिस्तानच्या संरक्षण आणि स्वातंत्र्यासाठी लढवणाऱ्या शक्तींना जर अधिक बळ दिले गेले नाही आणि पूर्वीप्रमाणे त्यांच्याकडे दुर्लक्षच सुरू राहिले, तर येत्या काही महिन्यांत चीन आपल्या लष्करी फौजा बलुचिस्तानमध्ये तैनात करू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही", असा दावा मीर यार बलोच यांनी केला.
(Mir Yar Baloch Letter to India)