दीक्षाभूमीला येणारा प्रत्येक भाविक आमच्यासाठी महत्त्वाचा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

30 Sep 2025 15:57:44

नागपूर, दीक्षाभूमीला येणारा प्रत्येक भाविक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणालाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरातील तयारी बाबत बैठक घेतली. यावेळी दीक्षाभूमी परिसरातील विविध कामांची माहिती घेत पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

बावनकुळे म्हणाले, दीक्षाभूमीत येणारा प्रत्येक भाविक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणालाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली असून प्रशासन सज्ज आहे. पाऊस आल्यास भाविकांच्या सोयीसाठी शाळा व वसतिगृहांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची सोय सुनिश्चित केली जाणार आहे.

तक्रारींवर तातडीने उपाय

बैठकीत माजी मंत्री व आमदार नितीन राऊत व माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्या सूचनांचा विचार करण्यात आला. पाणी साचणे, राहण्याची अपुरी सोय व शौचालयांची कमतरता या तक्रारींवर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विकास आराखड्यात बदल

दीक्षाभूमी विकास आराखड्याबाबत बावनकुळे म्हणाले, जुन्या आराखड्यावर आक्षेप नोंदवले गेले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानंतर सुधारित आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाईल.

शेतकरी नुकसानीचा अहवाल

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसंदर्भात बावनकुळे यांनी सांगितले, ५ ते ६ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरातील सर्वेक्षण पूर्ण होईल. ऑगस्ट महिन्यात २५ लाख हेक्टर तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत २२ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र हा अंतिम आकडा नाही. पुढील काही दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

मदतीचे आश्वासन

शेतकऱ्यांना मदतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “पूर्ण नुकसान भरपाई देता येणार नाही, मात्र शेतकऱ्यांना शासनाकडून निश्चितच मदत केली जाईल.

Powered By Sangraha 9.0