
मुंबई : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमास १०० दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिली.
१५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणा आणि सेवाकर्मी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा, विभाग व मंत्रालय स्तरावरील अधिकारी यांना आपले काम दिनांक २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सादर करणे अपेक्षित होते. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पूरस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी यामध्ये अधिकारी महत्वाच्या आणि तातडीच्या कामकाजात व्यस्त असल्याने राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमास १०० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मंत्रालय आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी या स्पर्धेअंतर्गत आपले काम १० जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करावे. त्यानंतर त्यांच्या कामाचे मूल्यांकन करून २६ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.