अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ : नितेश राणे

25 Sep 2025 15:18:26

मुंबई : राज्यात यंदाच्या वर्षी अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पाहणी करून आणि मत्स्य व्यवसाय संस्थांशी संपर्क करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

दरम्यान, बुधवार,दि.२४ रोजी मंत्रालयात अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस मत्स्यव्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व मत्स्य व्यवसाय उपायुक्त दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, स्वतः अधिकाऱ्यांनी मत्स्य शेतकऱ्यांना संपर्क केल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घ्यावी. पंचनामे करताना वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी. ज्या जिल्ह्यात पंचनामे करण्यासाठी अधिकारी कमी आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी न झालेल्या इतर जिल्ह्यातील अधिकारी नियुक्त करून पंचनामे लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. पंचनाम्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून त्याची प्रत मंत्रालय स्तरावर सादर करावी. मत्स्य बिजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची सविस्तर माहिती सादर करावी. माहिती सादर करत असताना बाब निहाय आकडेवारी द्यावी, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.

मंत्री राणे म्हणाले की, तलावातील गाळ काढला गेला नसल्याने मत्स्य शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे या वर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करावे. या कामासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी. अधिकाऱ्यांनी रोज किमान 8 ते 10 तलावांना भेट द्यावी. दिलेल्या भेटीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयामार्फत सादर करावा असेही मंत्री राणे यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0