मुंबई, भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण -तरुणींनी घ्यावा असे आवाहनही मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३००व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. अर्थात, ही ई-निविदा प्रक्रिया ६ प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे ३० हजार वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.