मुंबई : बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक असून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २० सप्टेंबर रोजी केले.
कुलाबा येथील पोलिस मुख्यालयात इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या १० व्या स्थापना दिनानिमित्त 'भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना' या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे सामाजिक न्याय राज्यमंत्री असीम अरूण, इंडियन पोलीस फाउंडेशनचे प्रमुख तथा मेघालयचे माजी राज्यपाल आर.एस. माशारी, फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह विविध राज्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी कायम उच्च दर्जा टिकवून ठेवल्याचा अभिमान आहे. पोलीस आज भारताच्या आर्थिक विकासावर चर्चा करीत आहेत ही अभिनंदनाची बाब असून पोलीस दलात आणखी चांगले बदल घडविण्यासाठी आजच्या कार्यक्रमात होणारे विचार मंथन महत्वपूर्ण ठरतील. या विचारमंथनातून येणारे नवीन उपाययोजनांचा शासन सकारात्मक विचार करेल. पोलीस दल तसेच समाजातही एकात्मता असणे आवश्यक आहे. यामुळे समाजातील नकारात्मकता कमी होते आणि राज्य आणि देश शाश्वत प्रगतीकडे वाटचाल करू शकतो. काळानुरूप गुन्ह्यांचे स्वरूप बदलले असून जुन्या काळातील शाश्वत मुल्यांसह नव तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रगती शक्य आहे. त्यानुसार २०२३ मध्ये नवीन पोलीस संघटनात्मक रचना तयार केली आहे. गुन्ह्यांची जलद उकल करण्यास मदत व्हावी यासाठी अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी लॅब उभारण्यात आली आहे. इतर देशांनीही आपल्या राज्यासारखी लॅब बनविण्याची मागणी केली आहे. एआयच्या सहायाने गुंतागुंतीचे गुन्हे प्रकरणे अधिक वेगाने सोडविण्यात मदत होत आहे," असेही ते म्हणाले.
अमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांत झीरो टॉलरन्स महत्वाचे
"देश आणि राज्याची तिन्ही दल सक्षम असल्याने अमली पदार्थांच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढविणे आणि तरूणांना निष्क्रिय करण्यात येत आहे. आज अमली पदार्थांची गुन्हेगारी पोलीस दलासमोर एक आव्हान आहे. यामध्ये झीरो टोलरन्स असणे महत्वाचे आहे," असेही त्यांनी सांगितले.
सेवा क्षेत्राची परिभाषा समजून घेणे आवश्यक
"संविधानात पोलीस व्यवस्थेत चेक अँड बॅलन्सची तरतूद असून अनेक अधिकाऱ्यांनी उपलब्ध कायद्यांचा वापर करून परिवर्तनशील सुधारणा केल्या. आयपीसी, सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स अॅक्ट हे इंग्रजांच्या काळातील कायदे असल्याने लोकशाहीच्या अधिष्ठानावर त्यात आवश्यक बदल करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलीसांची भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि डिजीटल व्यासपीठांचा वापर करणे आवश्यक आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉमद्वारे गुन्हेगारी वाढत असून, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग आणि डिजिटल ट्रॅकिंग, ऑनलाईन गुन्ह्यांवर जलद प्रतिसादासाठी विशेष असे नव तंत्रज्ञान आणि पद्धती वापरणे आवश्यक आहे. आपली अर्थव्यवस्था कृषी आधारित होती. आताही कृषी क्षेत्र तेवढेच महत्वाचे असून बदलत्या काळानुरूप अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. राज्य किंवा देशाची अर्थव्यवस्था ५५ ते ६५ टक्के सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. या दोन्ही क्षेत्रावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेची आव्हाने वेगळी आहेत. त्यामुळे बदलत्या सेवा क्षेत्राची परिभाषा समजून घेणे आवश्यक आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासोबतच शाश्वत मूल्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न होणेही आवश्यक आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.