नवी दिल्ली : (ECI issues 'fact check' clarification on Rahul Gandhi's allegations) काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १८ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. मतचोरीच्या प्रकरणात कुमार हे गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले.
मतं ऑनलाइन डिलीट करता येत नाहीत : निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाईन डिलिट केले गेलेले नाही. याबाबत नागरिकांनी दिशाभूल होऊ नये, यासाठी आयोग जबाबदारीने स्पष्टीकरण देत आहे. त्यांनी पुढे माहिती दिली की, २०२३ मध्ये आलंद मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे अयशस्वी प्रयत्न नक्की झाले होते. काही व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या मतदारांची नावे काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आयोगाने तत्काळ कारवाई करत तो प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणी संबंधितांवर एफआयआरही दाखल करण्यात आला होता.
निवडणूक आयोगाने यावेळी राजकीय उदाहरण देत स्पष्ट केले की, २०१८ साली आलंदची जागा भाजपच्या सुभाष गुट्टेदार तर २०२३ मध्ये ही काँग्रेसच्या बीआर पाटील यांनी जिंकली होती. यावरून निवडणूक प्रक्रियेवर कुणाचाही प्रभाव नसल्याचे अधोरेखित होते. आयोगाचे काम निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच केले जाते, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.