मुंबई : चोरांच्या वाटा चोरालाच माहिती असतात म्हणून राहुल गांधी मतचोरीचा आरोप करतात का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, "उठसूठ मतचोरीचा आरोप करणारे राहुल गांधी हेच मतचोरीचे बादशाह आहेत. कोणताही पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे. मतचोरीचा खोटा आरोप केल्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. तसेच मतमोजणी आणि मतदारयादीबाबत काही आक्षेप असतील तर निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे याबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारायचे धाडस दाखवणार का?" असा सवाल त्यांनी केला.
कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेसचे पितळ उघडे पाडले
"कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेस आमदाराची आमदारकी रद्द करून मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश देऊन काँग्रेसचे मतचोरीचे पितळ उघडे पाडले आहे. निवडणूक निकालावर आक्षेप असेल तर न्यायालयाच्या कसोटीवर उतरणारी कायदेशीर लढाई कशी लढायची आणि न्याय कसा मिळवायचा याचे उदाहरण म्हणजे कर्नाटकमधील मालूर मतदारसंघातील भाजपचे के. एस. मंजुनाथ गौडा आहेत. त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करत काँग्रेस आमदार के. वाय. नंजेगौडा यांच्या आमदारकीला आव्हान दिले होते. कालच उच्च न्यायलयाने निकाल देत नंजेगौडा यांची निवड अवैध घोषित करत २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील मतांची मतमोजणी पुन्हा करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या निकालाने काँग्रेसचे मतचोरीचे आरोप त्यांच्यावरच बूमरँग झाले," असे ते म्हणाले.
काँग्रेसची दुटप्पी भूमिका
"राहुल यांच्या बिनबुडाच्या मतचोरीच्या आरोपांची री ओढत चक्क नक्षलवाद्यांकडून ११ पानी पत्रक काढले जाते यावरून काँग्रेसचा डाव किती घातक आहे याची कल्पना येते. एकीकडे मतचोरीचा आरोप करत अराजक पसरवायचे आणि दुसरीकडे बिहार मतदारयादी पुनर्निरिक्षणाला विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसची आहे. मतदारयादी पुनर्निरिक्षणानंतर १ ऑगस्टला प्रकाशित करून त्यावर आक्षेप असल्यास एक आठवड्यात तक्रार करा असे जाहीरपणे आयोगाने सांगून देखील काँग्रेसकडून एकही आक्षेप घेतला गेला नाही. कायदेशीर कार्यवाही न करता प्रसारमाध्यमांमध्ये खोटे आरोप करून संशय निर्माण करण्याचा हा कुटील डाव आहे," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली.