मारकडवाडी प्रकरणाचे सूत्रधार शरद पवारच ; आ. गोपीचंद पडळकर

17 Sep 2025 16:41:02

मुंबई : मारकडवाडी प्रकरणाचे सूत्रधार शरद पवारच आहेत. मारकडवाडीतील जनतेची दिशाभूल करून निवडणूक आयोगाची बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवार, १७ सप्टेंबर रोजी केली.

मारकडवाडीचे सरपंच रणजित मारकड, उपसरपंच आबाराजे मारकड, ग्रामपंचायत सदस्य शहाजी वाघमोडे, पवार गटाचे कार्यकर्ते दत्तात्रय मारकड, अभिजित देवकाते, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मारकडवाडी प्रकरणाचा पर्दाफाश केला.

आ. गोपीचंद पडळकर म्हणाले की, "मारकडवाडीत फेरमतदानासाठी झालेल्या आंदोलनाचे कुटील कारस्थान शरद पवार आणि त्यांच्या हस्तकांचे आहे, हे मारकडवाडीच्या सरपंच, उपसरपंचांनी उघड केल्यामुळे या प्रकरणातील पूर्ण सत्य समोर आले आहे. त्यामुळे शरद पवारांचे पितळ उघडे पडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये मविआच्या उमेदवाराला मिळालेल्या कमी मतांमुळे सैरभैर झालेल्या शरद पवार आणि मविआ नेत्यांनी मारकडवाडीत इव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा खोटा बिनबुडाचा आरोप करत राज्यात आणि देशभरात रान उठवले. संविधानानाने निर्माण केलेल्या निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर, इव्हीएमवर शंका उपस्थित करण्याचे पाप शरद पवार करत आहेत. विधानसभा निकालाने व्यथित होऊन निकालाचे आणि मविआला मिळालेल्या कमी मतांचे खापर निवडणूक आयोग आणि इव्हीएमवर फोडायचा कुटील डाव शरद पवार, काँग्रेस आणि विरोधकांचा होता."

तसेच यावेळी मारकडवाडीचे सरपंच रणजित मारकड म्हणाले की, "मारकडवाडी ग्रामस्थांना बळीचा बकरा करण्याचे काम शरद पवार आणि त्यांच्या टीमने केले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना त्यांच्याच गावात अपेक्षेप्रमाणे मतदान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चलबिचल होती. त्यामुळे निकालानंतर मारकडवाडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात कुठे कुठे मतदान झाले ते विस्तृत सांगा अशी विचारणा शरद पवारांच्या टीमने केली. ग्रामस्थांवर दबाव टाकत खोटे शपथपत्र घेतले. दिशाभूल करीत आम्हाला महायुती आणि निवडणूक आयोगाविरोधात खोटी प्रतिक्रीया देण्यास भाग पाडले," असेही त्यांनी सांगितले.

"मारकडवाडीत इव्हीएम घोटाळा झाला असा कांगावा करत लोकशाही, निवडणूक आयोग आणि गावाला बदनाम करण्याचा कट केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही याबाबतची वस्तुस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेतला. ४० वर्षे विकासापासून वंचित असलेल्या गावात महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांचा धडाका लावत गावाचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळे अनेक वृद्ध आणि युवा मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले होते," असेही त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना सल्ला देऊ नये

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत. त्यांना सल्ला देण्याची उठाठेव सुप्रियाताईंनी करू नये. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते मात्र, पाण्यापायी वणवण करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी काहीही दिले नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी हजारो कोटींचा भरघोस निधी देऊ केला," असे आ. पडळकर यांनी सांगितले.

शरद पवार हा कारस्थानांचा कारखाना

विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन माणसे मला भेटायला आली होती, त्यांनी १६० जागांवर मतांमध्ये फेरफार करून निवडणूक जिंकवण्याची गॅरंटी दिली होती, असे शरद पवारांनी सांगितले होते. शरद पवार हा कारस्थानांचा कारखाना आहे. देशाच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात विघातक कृत्य करण्यासाठी जर ते दोघे तुमच्याकडे आले होते, तेव्हा तुम्ही गृहमंत्र्यांना फोन करून का कळवले नाही? त्या दोघांना अटक करण्याची मागणी तुम्ही का केली नाही? पवारांनी असे काहीही न करता त्या दोघांना घेऊन ते राहुल गांधींकडे गेले. ज्यांच्या स्मरणशक्तीचे गोडवे गायले जातात त्या पवारांना त्या दोन माणसांची नावे आठवत नाहीत हे सगळेच संशयास्पद आणि हास्यास्पद आहे," असेही आ. गोपीचंद पडळकर म्हणाले.


Powered By Sangraha 9.0