डॉ. मोहनजी भागवत : ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा साधक, राष्ट्रनिर्माणाचा मार्गदर्शक

    11-Sep-2025
Total Views |

आजपासून ठीक १३२ वर्षांपूर्वी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो’ असे संबोधत स्वामी विवेकानंदांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा संदेश दिला. स्वामीजींच्या याच विश्वबंधुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन आपले संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन तसेच बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित करणारे रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मोहनजींच्या अभीष्टचिंतनार्थ शब्दबद्ध केलेला हा लेख...

आज दि. ११ सप्टेंबर. खरे तर हा दोन परस्परविरोधी घटनांचे स्मरण करून देणारा दिवस. यापैकी पहिली घटना म्हणजे १८९३ सालची. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये आपले ऐतिहासिक भाषण केले होते. ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो...’ आपल्या भाषणातील या अवघ्या काही शब्दांनी त्यांनी सभागृहात उपस्थित हजारो लोकांची मने जिंकली होती. त्यांनी भारताच्या शाश्वत आध्यात्मिक परंपरेची आणि विश्वबंधुत्वाच्या तत्त्वाची जगाला ओळख करून दिली. आता दुसरी घटना म्हणजे ९/११च्या क्रूर दहशतवादी हल्ल्यांची. खरे तर, दहशतवाद आणि कट्टरतेच्या धोयामुळे याच विश्वबंधुत्वाच्या तत्त्वावर हल्ला झाला होता. या दिवसाची दखल घ्यायला लावणारी आणखी एक बाब म्हणजे, आज एका अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे, ज्यांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या तत्त्वाने प्रेरित होऊन आपले संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन तसेच, सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले लाखो लोक, त्यांचा ‘परमपूज्य सरसंघचालक’ असाच आदरभावपूर्ण उल्लेख करतात. होय, मी डॉ. मोहनजी भागवत यांच्याबद्दलच बोलतोय. महत्त्वाचा योगायोग असा की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शताब्दी साजरी करत असलेले वर्ष मोहनजींच्याही ७५व्या वाढदिवसाचे वर्ष आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.

माझे मोहनजींच्या कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध आहेत. मोहनजींचे वडील कै. मधुकरराव भागवत यांच्यासोबत मला जवळून काम करण्याचे अहोभाग्य लाभले. माझ्या ‘ज्योतीपुंज’ या पुस्तकात मी त्यांच्याबद्दल अगदी सविस्तर लिहिले आहे. कायद्याच्या क्षेत्राशी संबंधित असूनही, त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी स्वतःला वाहून घेतले होते. गुजरातमध्ये संघाला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मधुकरराव यांची राष्ट्रनिर्माणासाठीची तळमळ इतकी होती की, त्यांनी आपला मुलगा असलेल्या मोहनजींची जडणघडणच भारताच्या पुनरुत्थानासाठी केली होती, जणू काही स्वतः पारसमणी असलेल्या मधुकररावांनी मोहनजींच्या रूपात दुसरा पारसमणीच घडवला होता.

मोहनजी हे १९७० सालच्या दशकाच्या मध्यात संघाचे प्रचारक बनले. ‘प्रचारक’ हा शब्द ऐकल्यावर एखाद्याला, कदाचित ‘प्रचारक’ म्हणजे केवळ प्रचार करणारा किंवा मोहीम चालवणारा, विचारांचा प्रचार-प्रसार करणारी व्यक्ती असे वाटू शकते. परंतु, जे कोणी रा. स्व. संघाच्या कार्यपद्धतीशी परिचित आहेत, त्यांना याची जाणीव आहे की, प्रचारकांची ही परंपरा संघटनेच्या कार्याचा गाभा आहे. गेल्या १०० वर्षांमध्ये देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन हजारो तरुणांनी ‘भारत प्रथम’ हे ध्येय साध्य करण्यासाठी आपले घरदार आणि कुटुंबाचा त्याग करत, आपले आयुष्य समर्पित केले आहे.

रा. स्व. संघातील त्यांची सुरुवातीची वर्षे भारतीय इतिहासातील एका अतिशय काळ्या कालखंडाशी मिळतीजुळती आहेत. याच काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर कठोर आणीबाणी लादली होती. लोकशाही तत्त्वांना महत्त्व देणार्‍या आणि भारत समृद्ध व्हावा, अशी इच्छा असणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी आणीबाणीविरोधी चळवळ बळकट करणे स्वाभाविक होते. मोहनजी आणि असंख्य स्वयंसेवकांनी नेमके हेच केले. त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि मागास भागात, विशेषतः विदर्भात व्यापक प्रमाणात काम केले. यामुळे गरीब आणि दलितांना भेडसावणार्‍या आव्हानांची त्यांना जाणीव झाली.

गेल्या काही वर्षांमध्ये भागवतजींनी रा. स्व. संघात विविध पदे भूषवली. यातील प्रत्येक कर्तव्य त्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडले. १९९०च्या दशकात अखिल भारतीय शारीरिक प्रमुख म्हणून मोहनजींच्या कार्याचे आजही अनेक स्वयंसेवक स्नेहपूर्वक स्मरण करतात. या काळात त्यांनी बिहारच्या गावांमध्ये काम करताना अमूल्य वेळ व्यतीत केला. या अनुभवांमुळे तळागाळातील समस्यांशी ते अधिक खोलवर जोडले गेले. २००० साली ते सरकार्यवाह झाले आणि येथेही त्यांनी आपल्या कामाच्या अनोख्या शैलीने कठीण परिस्थिती सहजतेने आणि अचूकतेने हाताळली. २००९ साली ते सरसंघचालक बनले आणि आजही ते अतिशय उत्साहाने कार्यरत आहेत.

सरसंघचालक असणे ही केवळ संघटनात्मक जबाबदारी नाही. असाधारण व्यक्तींनी वैयक्तिक त्याग, उद्देशाची स्पष्टता आणि भारतमातेप्रति अतूट समर्पणासह ही भूमिका पार पाडली आहे. मोहनजींनी जबाबदारीच्या विशालतेला पूर्ण न्याय देण्याबरोबरच, स्वतःची ताकद, बौद्धिक खोली आणि सहृदय नेतृत्व याचीही जोड दिली आहे, जे सर्व ‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वाने प्रेरित आहे. जर मोहनजींनी त्यांच्या हृदयात जपलेल्या आणि त्यांच्या कार्यशैलीत आत्मसात केलेले दोन गुण मी आठवायचे म्हटले, तर ते आहे सातत्य आणि जुळवून घेणे. त्यांनी नेहमीच अतिशय कठीण प्रसंगांमध्ये संघटनेचे नेतृत्व केले आहे, आपल्या सर्वांना अभिमान असलेल्या मुख्य विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही आणि त्याचवेळी समाजाच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण केल्या. त्यांचे तरुणाईशी अगदी सहज नाते आहे. आणि म्हणूनच, त्यांनी नेहमीच अधिकाधिक तरुणांना संघ परिवारात सामील करण्यावर लक्ष केंद्रित केले. ते अनेकदा सार्वजनिक भाषणात आणि लोकांशी संवाद साधताना दिसतात, जे आजच्या गतिमान आणि डिजिटल जगात खूप लाभदायक ठरले आहे.

व्यापकपणे सांगायचे, तर संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील भागवतजींचा कार्यकाळ हा सर्वांत परिवर्तनकारी कालखंड मानला जाईल. गणवेशातील बदलापासून ते शिक्षा वर्गांमध्ये (प्रशिक्षण शिबिरांमध्ये) सुधारणा करण्यापर्यंत, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. खासकरून ‘कोविड’ काळात मोहनजींनी केलेले प्रयत्न मला आठवतात, जेव्हा मानवजातीने आयुष्यात पहिल्यांदाच अशा महामारीचा सामना केला होता. त्या काळात, रा. स्व. संघाचे पारंपरिक उपक्रम सुरू ठेवणे आव्हानात्मक बनले होते. मोहनजींनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला. जागतिक आव्हानांच्या संदर्भात, संस्थात्मक चौकटी विकसित करताना ते जागतिक दृष्टिकोनांशी निगडित होते. त्यावेळी सर्व स्वयंसेवकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करताना गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शय तितके प्रयत्न केले. अनेक ठिकाणी वैद्यकीय शिबिरे भरवण्यात आली. आम्ही आमचे अनेक कष्टकरी स्वयंसेवकदेखील गमावले. परंतु, मोहनजींची प्रेरणा अशी होती की, त्यांचा दृढनिश्चय कधीही डगमगला नाही.

मोहनजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक प्रशंसनीय गुण म्हणजे, त्यांचा मृदुभाषी स्वभाव. श्रवणाची अपवादात्मक क्षमता त्यांना लाभली आहे. हा पैलू सखोल दृष्टिकोन सुनिश्चित करण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि नेतृत्वात संवेदनशीलता आणि प्रतिष्ठेची भावनादेखील आणतो. ‘स्वच्छ भारत मिशन’पासून ते ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’पर्यंत सर्वच चळवळींद्वारे जोम वाढवण्याचे आवाहन ते नेहमीच संपूर्ण संघ परिवाराला करतात. सामाजिक कल्याणाला चालना देण्यासाठी, सामाजिक सुसंवाद, कौटुंबिक मूल्ये, पर्यावरण जागरूकता, राष्ट्रीय स्वार्थ आणि नागरी कर्तव्ये यांचा समावेश असलेले ‘पंचपरिवर्तन’ मोहनजींनी मांडले. हे सर्व क्षेत्रातील भारतीयांना प्रेरणा देऊ शकतात. प्रत्येक स्वयंसेवक एक मजबूत आणि समृद्ध राष्ट्र घडण्याचे स्वप्न पाहतो. हे स्वप्न साकार करण्यासाठी स्पष्ट दृष्टिकोन आणि निर्णायक कृती दोन्ही आवश्यक आहेत. मोहनजी या दोन्ही गुणांनी परिपूर्ण आहे. ते नेहमीच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या तत्त्वाचे खंदे पुरस्कर्ते राहिले आहेत, भारताच्या विविधतेत आणि आपल्या भूमीचा एक अविभाज्य भाग असलेल्या अनेकविध संस्कृती आणि परंपरांवर त्यांना गाढ विश्वास आहे. तसेच त्यांच्या अत्यंत व्यस्त अशा वेळापत्रकातदेखील मोहनजी संगीत आणि गायन हे आपले छंद जोपासण्यासाठी खास वेळ काढतात. कित्येक भारतीय संगीत वाद्ये वाजवण्यात ते पारंगत असल्याचे फार थोड्या लोकांना माहीत असावे. त्यांची वाचनाची आवड त्यांच्या अनेक भाषणांमधून आणि संवादातून दिसून येते.

यावर्षी अवघ्या पुढील काही दिवसांत रा. स्व. संघ शताब्दी पूर्ण करणार आहे. यावर्षी विजयादशमी, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणि रा. स्व. संघाचा शताब्दी सोहळा एकाच दिवशी येत असून हा उत्तम योगायोग आहे. रा. स्व. संघाशी निगडित असलेल्या भारतातील आणि परदेशातील लाखो लोकांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल आणि आम्हाला या काळात संघटनेला मार्गदर्शन करणारे अतिशय सूज्ञ आणि कठोर परिश्रम करणारे सरसंघचालक म्हणून मोहनजी लाभले आहेत. मोहनजी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या विचारधारेचे जिवंत उदाहरण असून, जेव्हा जेव्हा आपण या सीमारेषा ओलांडतो आणि सर्वांना आपले मानतो, तेव्हा समाजात विश्वास, बंधुभाव आणि समता वाढीस लागते, हे सांगून मी या लेखाचा समारोप करतो आणि मी पुन्हा एकदा मोहनजींना मातृभूमीच्या सेवेसाठी दीर्घ आणि आरोग्यमय आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा देतो!

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी