वसईच्या नागरिकांनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हावे, महानगरपालिकेचे आवाहन

07 Aug 2025 20:29:41

खानिवडे: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून हर घर तिरंगा ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे हा या मोहिमेचा मूळ उद्देश आहे. यंदा सुद्धा हर घर तिरंगा ही मोहीम राबविणेत येत असल्याने वसई विरार च्या नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिका कडून करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी ०२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत भारताचा तिरंगा ध्वज आपल्या घरावर, इमारतींवर, आस्थापनांवर फडकऊन तिरंग्यासोबत स्वफोटो घेऊन harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करून अपलोड झाल्यानंतर मोहिमेत सहभागी झाल्याबाबतचे प्राप्त होणारे प्रमाणपत्र #HarGharTiranga, #Har Ghar Tiranga2025 या टॅगसह शेअर करावे.

नागरिकांनी ध्वज फडकविताना ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारे जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याबाबत सर्व नागरीकांनी दक्षता घ्यावी.या माहितीसाठी www.harghartiranga.com यावर Flag Hoisting Guidelines या सदराखाली राष्ट्रध्वज कसा फडकवावा याबाबतचे व्हिडीओ (videos) उपलब्ध आहेत.

त्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असून “हर घर तिरंगा” या राष्ट्रभक्तीने प्रेरित अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपले तिरंग्याविषयीचे प्रेम अभिव्यक्त करण्याचे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0