एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे जगभरातील रोजगारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, जवळपास सर्वच क्षेत्रांत ‘एआय’चा वापर हा प्रकर्षाने होताना दिसतो. हरितऊर्जा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. त्यानिमित्ताने हरितऊर्जेला प्राप्त होणार्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पाठबळाचा ऊहापोह करणारा हा लेख...
नव्याने प्रचलित झालेल्या व तुलनेने अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) या नव्या व अनेकार्थांनी उपयुक्त कार्यपद्धतीचा यशस्वी वापर आता हरितऊर्जा क्षेत्रातसुद्धा यशस्वी ठरला आहे. हरितऊर्जा क्षेत्र हे पर्यावरणरक्षणापासून आर्थिक संदर्भातील प्रमुख व क्षमतावान क्षेत्र असून, त्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळाल्याने, सर्वच क्षेत्रांतील उद्योग-व्यवसायांना आता नावीन्यासह नवी दिशा प्राप्त झाली, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
सकृतदर्शनी स्पष्ट होणारी बाब म्हणजे, आज देशांतर्गत ऊर्जेची गरज व त्याच्या वाढत्या प्रमाणावर चर्चा होत असतानाच, कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढ होत आहे व त्याचा प्रसार-प्रचारपण होत आहे. त्याचवेळी देशांतर्गत ऊर्जा क्षेत्रात हरितऊर्जेला प्रेरणा, प्रोत्साहन व सरकारी स्तरावर समर्थनदेखील मिळत आहे. ही धोरणात्मक बाबसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरासाठी पूरक ठरणारी आहे.
यासंदर्भातील मूलभूत व महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी व उपयुक्त वापरासाठी सतत वीज वापराची आवश्यकता असते. ऊर्जेची ही मुख्य गरज पवनऊर्जा व सौरऊर्जा यांसारखे ऊर्जास्रोत सहजगत्या व तुलनेने कमी खर्चात पूर्ण करू शकतात, ही बाब महत्त्वाची आहे. एका आकडेवारीनुसार, पुढील पाच वर्षांत जागतिक पातळीवरील ऊर्जावापरातील सुमारे पाच टक्के वीज ही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी व सतत उपलब्ध होण्याच्या तत्त्वावर वापरली जाईल. त्यादृष्टीने पण नजीकच्या भविष्यात हरितऊर्जेचे यासंदर्भातील महत्त्व पुन्हा स्पष्ट होते.
सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार-प्रचार आणि वापर वाढत्या प्रमाणावर होत असून, त्यासाठी आवश्यक वीज हरितऊर्जा क्षेत्रातून सहजगत्या व अधिक परिणामकारक वीजनिर्मिती होऊ शकते, याचे एक प्रमुख कारण म्हणजे, सौर वा पवन ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील नव्या प्रकल्पांची उभारणी परंपरागत ऊर्जानिर्मिती क्षेत्राच्या उभारणीच्या तुलनेत कमी वेळात होऊ शकते. या कमी खर्चिक व वेळ वाचवणार्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचा फायदा प्रगत व नव्या स्वरूपातील कृत्रिम बुद्धिमत्ता व त्यावर आधारित विशेष व्यावसायिक क्षेत्राला सहजगत्या व किफायतशीर स्वरूपात होऊ शकतो. भारतीय स्तरावर यासंदर्भात सांगायचे म्हणजे, आपल्याकडे तर 2030 सालापर्यंत हरितऊर्जा क्षेत्रातील वीजनिर्मिती व त्याच्या उपयोगामध्ये 50 टक्के वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
आज भारताचे प्रकल्प व्यवस्थापन त्याच्या क्षमता व कार्यक्षमतेच्या आधारे जगात अव्वल ठरले असून, याचा लाभ हरितऊर्जानिर्मिती क्षेत्राला सहजगत्या व निश्चितपणे होणार आहे. ही एक जमेची बाजू म्हणायला हवी. याच्याच जोडीला आपल्याकडे संकरित स्वरूपातील म्हणजेच, पवन-सौरऊर्जा एकत्रित स्वरूपात निर्मिती व कार्यरत आहेत. सौरऊर्जेच्या संदर्भातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, आपल्याकडील भौगोलिक रचना व वातावरणीय स्थितीनुसार वर्षातील सुमारे 300 दिवस सौरऊर्जेसाठी आवश्यक असा सूर्यप्रकाश सहजतेने व सुलभपणे उपलब्ध होतो. जागतिक ऊर्जा क्षेत्राच्या संदर्भात भारताच्या दृष्टीने विशेष जमेची ठरली आहे. याच्याच जोडीला पूर्वीच्या प्रादेशिक वा राज्यस्तरीय वीज पारेषण म्हणजेच ऊर्जा संचाराला आता राष्ट्रीय ऊर्जा पारेषण पद्धतीची जोड मिळाली असून, ही बाब हरितऊर्जा क्षेत्रासाठीसुद्धा लाभदायी ठरली आहे.
दरम्यान आपल्याकडील कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित व्यवसायवाढीने आता गती पकडली आहे. सध्या देशांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्टार्टअपची संख्या एक हजारांवर पोहोचली असून, आजमितीस या क्षेत्रात कार्यरत असणार्यांपैकी 20 टक्के संख्या भारतात आहे, हे विशेष! याला साथ मिळत आहे ती वाढत्या संगणकीय सेवा आणि शिक्षणाची.
याचवेळी वाढत्या व्यावसायिक गरजा आणि मागणीनुसार आपल्याकडील डेटा मॅनेजमेंट व्यवसायालापण अनेकार्थांनी ‘अच्छे दिन’ आले आहेत. यासंदर्भात ‘मार्केटस अॅण्ड मार्केट्स’तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पुण्यातील त्यांच्या माहिती संकलन व प्रक्रिया केंद्रामध्ये पूर्णपणे सौरऊर्जेचा वापर केला जात आहे. या अनेक ग्राहकांनी सौरऊर्जेच्या संदर्भात त्यांचे अनुकरण करण्यामध्ये रुची दाखविली आहे. त्यांच्या अनुभवानुसार संगणक प्रक्रिया केंद्रांसारख्या महत्त्वाच्या व सतत प्रक्रिया स्वरूपात चालणार्या व्यवसायांमध्ये सौरऊर्जेचा वापर आर्थिकदृष्ट्यासुद्धा किफायतशीर ठरणारा आहे. असाच यशस्वी अनुभव हैद्राबाद येथील जागतिक माहिती प्रक्रिया केंद्राच्या ऊर्जा वापरासाठी सौरऊर्जा वापराद्वारे करण्यात येत आहे.
यातूनच आता भारतातील इतर ठिकाणच्या प्रमुख व अन्य ठिकाणच्या माहिती संकलन प्रक्रिया केंद्रांचे संचालन सौर वा हरितऊर्जेच्या वापरातून करण्यावर आता भर दिला जात आहे. असे केल्याने पर्यावरण संरक्षणापासून कृत्रिम बुद्धिमता वापरासाठी आवश्यक असा सतत वीजपुरवठा व मुख्य म्हणजे माफक खर्चामध्ये ऊर्जेची उपलब्धता यांसारखे प्रमुख विविध फायदे होत असून, त्याकडे जगातील प्रमुख व प्रगत व्यवसाय उत्सुकतेसह आशावाद घेरून पाहत आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. अर्थात, देशांतर्गत हरितऊर्जा प्रयोग आणि उपयोगाच्या या पहिल्याच व यशस्वी प्रयोगावरच संपूर्ण समाधान मानणे योग्य ठरणारे नाही.
अर्थात, ही तर एक अनुभवसिद्ध बाब आहे की, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन यांसारख्या क्षेत्रांत कुठलीही नवी बाब वा नवे तंत्र विकसित करून, त्यांचा प्रथमच व विशेषतः व्यावसायिक स्तरावर व यशस्वीपणे वापर करण्यासाठी संबंधित विषयातील अद्ययावत माहिती व ज्ञान यांच्या जोडीलाच त्या विषयातील कुशल-कौशल्यांची वेळेत जोड मिळणे तेवढेच महत्त्वाचे असते. या कौशल्यांमध्ये माहिती, तंत्रज्ञान, माहिती संकलन व प्रक्रिया या विशेष व नव्या कौशल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ही विशेष कार्य-कौशल्यांशी संबंधित कामकाज असणारी क्षेत्रं नवी असल्याने, या क्षेत्रांमध्ये काम करणारे कसबी व अनुभवी लोक अत्यल्प संख्येत उपलब्ध असल्याने अनुभवी व कौशल्ययुक्त कर्मचार्यांची उणीव भासणे स्वाभाविक आहे.
मात्र, यासंदर्भातील भारताच्या दृष्टीने महत्त्वाची व विशेष जमेची बाब म्हणजे, सौरऊर्जेसह पवनऊर्जा त्याद्वारे हरितऊर्जा क्षेत्रात अव्वलता व गुणवत्तेसह चांगलेच बस्तान बसविले आहे. स्टार्टअपपासून सरकारी क्षेत्रातील व कॉर्पोरेट ऊर्जा कंपन्यांनी हरितऊर्जा क्षेत्राचे व्यावसायिक महत्त्व यापूर्वीच समजून घेतले आहे. या व्यावसायिक प्रयत्न आणि पुढाकाराला आता नव्याने सरकारी मदत व प्रोत्साहन मिळावे, यासाठी धोरणात्मक निर्णय झाले असून, या निर्णयांची केंद्र व राज्यस्तरांवर अंमलबजावणी सुरू झाली आहे. याचा फायदा हरितऊर्जेच्या वापरातून या सार्या उत्साहवर्धक व फलदायी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, भारतासाठी प्राधान्य तत्त्वावर आणि पुढाकारासह कार्य करण्यासाठी बाब म्हणजे, भारतातील प्रस्थापित हरितऊर्जा क्षेत्राच्या गती आणि प्रगतीच्या पार्श्वभूमीवर, त्याचा उपयोग प्रगत स्वरूपातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा व्यावसायिक विकास करणे, भारत आणि भारतीयांसाठी फलदायी व जागतिक संदर्भात नव्याने मार्गदर्शक ठरणार आहे.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक आणि सल्लागार आहेत.)
9822847886