मरीन ड्राइव्हचे सौंदर्य अधिक खुलणार ;महानगरपालिका आयुक्तांचा पाहणी दौरा

Total Views |

मुंबई
: मुंबईकरांची पहाट आरोग्यदायी आणि सायंकाळ आल्हाददायक करणारा मरीन ड्राइव्ह अधिक सुंदर ठेवायला हवा. नरिमन पॉईंटपासून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी)पर्यंत आणि त्यापुढील परिसराचे सौंदर्य अधिक खुलविण्यात सातत्य ठेवा, अशा सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केल्या आहेत.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवार,दि. ६ ऑगस्ट रोजी नरिमन पॉईंट ते स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) पर्यंत संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसराची सकाळी पायी फिरून पाहणी केली. या पाहणीप्रसंगी त्यांनी महानगरपालिका अधिकारी, पोलिस अधिकारी यांना विविध सूचना केल्या. यावेळी महानगरपालिकेच्या उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, पोलिस उप आयुक्त प्रशांत परदेशी, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, महानगरपालिकेचे संबंधित सहायक आयुक्त, अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

या परिसराला मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. त्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसर अधिक सुटसुटीत आणि स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा. अनावश्यक असलेले सूचनाफलक काढून टाकावेत. मरीन ड्राईव्ह परिसरात पायी चालण्याची जागा, नागरिकांसाठी आसन व्यवस्थेकरिता बाकडे सुस्थितीत ठेवावे, जेणेकरून पायी चालून दमलेले नागरिक येथे काही वेळासाठी विसावा घेवू शकतील. परिसरातील विजेच्या खांबांवर वाहिन्या लोंबकळणार नाहीत, याची काळजी घ्या. या खांबांची वेळोवेळी रंगरंगोटी करा. दिव्यांग नागरिकांच्या व्हिलचेअरसाठी असलेली जागा अधिक सुटसुटीत ठेवा याकडे आयुक्त गगराणी यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. मरीन ड्राइव्ह परिसरातील प्रसाधनगृह व्यवस्थेचीही आयुक्त गगराणी यांनी पाहणी केली. मरीन ड्राइव्ह परिसरात खूप उपाययोजना केल्या तरी देखील काही नागरिक दुभाजक ओलांडतात. या समस्येवरही तोडगा काढण्याबाबत गगराणी यांनी महानगरपालिका आणि पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) परिसरातील छोटी चौपाटी येथील बांधकाम साहित्य काढून तेथे स्वच्छता राखावी. तसेच या ठिकाणी रस्त्यालगत असलेली पोलिसांची चौकी तेथून हटवून मागील छोटी चौपाटी येथील बांधकामात स्थलांतरीत करावी, असे निर्देश श्री. गगराणी यांनी दिले. याच बांधकामात प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी, तसेच गिरगांव चौपाटीकडून येणाऱ्या नागरिकांसाठी येथे येण्यासाठी छान पायवाट साकारावी, इत्यादी विविध सूचना त्यांनी केल्या.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.