कार रो-रो सेवेला सिंधुदुर्गात थांबा कोकण रेल्वेकडून घोषणा

Total Views |

मुंबई
: कोकण रेल्वेने सुरू केलेल्या भारतातील पहिल्या 'कार ऑन रो-रो' सेवेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. कोलाड ते गोवा (वेरणा) दरम्यान धावणाऱ्या या विशेष ट्रेनला कणकवली तालुक्यातील नांदगाव स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधून आपल्या कारने गावी येणाऱ्या हजारो चाकरमान्यांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकण रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या कारसह रेल्वेने प्रवास करता यावा, या उद्देशाने कोलाड ते वेरणा (गोवा) अशी 'कार-ट्रेन' सेवा सुरू केली होती. या अभिनव प्रयोगाला प्रवाशांकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, या सेवेला कोकणच्या मध्यवर्ती ठिकाणी थांबा नसल्यानेच प्रवासी याकडे पाठ फिरवत असल्याचे निरीक्षण कोकण रेल्वेने नोंदविले. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्टेशनवर थांबा मिळाल्याने या सेवेला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा फायदेशीर ठरेल असा कोकण रेल्वेचा अंदाज आहे.

कोकण रेल्वेने मंगळवार,दि.५ रोजी केलेल्या घोषणेनुसार, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव रोड स्टेशनवर थांबा देण्यात येणार आहे. यामुळं नागरिकांचा आणखी प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्रवासी आता नांदगाव रोडवर त्यांच्या गाड्या लोड आणि अनलोड करू शकतात. ज्यामुळे प्रवास अधिक सूकर होणार आहे. रो-रो कार ट्रान्सपोर्टेशन सेवेसाठी कार बुकिंगसाठी नोंदणी 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे," असे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

कार ऑन रो-रो सेवा आणि दरपत्रक

या सेवेमुळे प्रवाशांना मुंबई-पुण्याहून थेट कोलाडपर्यंत गाडी चालवून, तिथून पुढे रेल्वेने आपल्या कारसह नांदगाव स्टेशनवर उतरता येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि शीण दोन्ही वाचणार आहे. कोलाड ते नांदगाव स्टेशनपर्यंत कार नेण्यासाठी 5 हजार 460 + जीएसटी इतका खर्च येईल. थ्री-टायर एसी (3AC): प्रति व्यक्ती 690 रुपये (एका कारसोबत दोन व्यक्ती प्रवास करू शकतात). सेकंड सिटिंग (2S): प्रति व्यक्ती १४० रुपये इतका खर्च येईल.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.