मुंबई : राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार बुधवार, ६ ऑगस्ट रोजी ही नियुक्ती करण्यात आली.
राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले असून या आराखड्यांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी याकरिता पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, श्री क्षेत्र घृष्णेश्वर येथे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला आणि श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज यांची नियूक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यातील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करतील. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध कामांना गती मिळावी, ही कामे दर्जेदार आणि गतीने व्हावीत, यासाठी संबंधित अधिकारी समन्वय साधणार आहेत.
उच्चाधिकारी समित्यांच्या बैठकांमध्ये या पाच ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी शासन निर्णय देखील काढण्यात आले आहेत. त्यानुसार श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १४८ कोटी ३७ लाख रुपयांच्या सुमारे ११ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. श्रीक्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखडा १५६ कोटी ६३ लाख रुपयांचा आहे. श्री श्रेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यातील २७५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. श्री. क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा १५ कोटी २१ लाख रुपयांचा आहे. तर, श्री श्रेत्र परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील २८६ कोटी ६८ लाख रुपयांच्या ९२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.